मानवी जीवन हे हरिप्राप्ती करिताच देवाने दिलेले आहे.त्याकरता जी-जी साधना केली जाते तिच्यामध्ये पंढरपूर ची वारी,योग आणि भजन शक्ती असा हा त्रिवेणी संगम.याचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारे महत्वाचे स्थान म्हणजे पालखी सोहळा.त्यामध्ये सुद्धा सर्व साधनांचा ज्यात समावेश होतो ते यच्चयावत साधनांचे फळ देणारे असे हे एकमेव समर्थ साधन होय.त्याचे स्वरूप श्री संत तुकारामांनी एका अभंगात सांगितले तो असा —
होय होय वारकरी।पाहे पाहे रे पंढरी॥
काय करावी साधने।फळ अवघेची येणे॥
अभिमान नुरे।कोड अवघेची पुरे॥
तुका म्हणे डोळा ।विठो बैसला सावळा॥
अरे मानवा, तू वारकरी हो आणि पंढरी पहा . पंढरपूर बघ.वारकरी होऊन पंढरपूर पहाण्यात जी मजा आहे ती सामान्य माणसासारखे नुसते पंढरपूर ला जाण्यात नाही.वारकरी झाल्याशिवाय तुला पंढरपूर चे सौख्य लाभणार नाही.कारण जे वारीला जातात त्यांची जीवनाकडे पहाण्याची दृष्टीच बदलते.त्यांना ठायी ठायी विठ्ठल च दिसतो .त्यांचे जीवन हे विठ्ठलमय होऊन जाते.आणि मग आतापर्यंत आपण जे जीवन भोगलं ते केवळ ऐहिक सुख असून खरं सुख तर विठ्ठलाच्या भक्तीत आहे.त्याचे ज्ञान होताच त्या ज्ञानचक्षुंनीच तो जगाकडे पाहू लागतो आणि त्याला सर्व काही प्राप्त होते.हे त्याच्या साधनेचे फळ आहे..हा पालखी सोहळा म्हणजे चालते बोलते विद्यापीठच आहे कारण पायी चालल्याने शारीरिक तप होते तर मुखाने अभंग गायल्याने तेही वेगवेगळ्या ताला सूरात आणि वेगवेगळ्या राग-रागिणींच्या स्वरूपात.त्यामुळे नादब्रह्माचे
मूर्तिमंत स्वरुपच अवतरलेले असते.त्यात मनाची एकाग्रता आणि पंढरीला जाऊन श्री
विठ्ठलाचे दर्शन घेण्याची मनाला लागलेली ओढ यात वाचिक आणि मानसिक असा दोन्हीचा समावेश होतो.ज्यामुळे आपले शरीर,वाणी मन इतकेच नव्हे तर जीवनही श्री विठ्ठलास अर्पण करतो तो खरा ‘ वारकरी ‘ होय.
काय करावी साधने।फळ अवघेची येणे॥ अभिमान धुरे।कोड अवघेची पुरे॥
वारकरी होऊन पंढरीला गेलो तर कोणताच अभिमान उरत नाही.साधकाच्या सर्व इच्छा पुर्ण होऊन देहाभिमान समूळ नष्ट होईल.तो सावळा विठोबा एकदा का डोळ्यात साठवला की तुझ्या बुद्धीच्या डोळ्यात तो कायमचा येऊन बसेल याचाच अर्थ असा की एकदा का तो मनात डोळ्यात साठवला की मग सर्व जगच बदलून जाईल तुझ्या अंतर्मनाचे चक्षू खुलतील आणि तुला सर्व काही विठ्ठल च वाटेल.विठ्ठलच दिसेल.संत तुकाराम म्हणतात,
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं।
विठ्ठल विश्रांती भोग जया॥
विठ्ठल आसनी। विठ्ठल शयनीं।
विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी॥
विठ्ठल जागृती स्वप्न -सुषुप्ती।
आन दुजें नेणति विठ्ठलाविण॥
भूषण अलंकार सुखाचे प्रकार।
विठ्ठल निर्धार जयां नरां॥
तुका म्हणे तेही विठ्ठलची झाले।
संकल्प भुयारे दुजेपणे॥
विठ्ठल माता -पिता,सखा ,स्नेही आणि सर्वकाही.गीतात आणि चित्रात एकच विठ्ठल सामावलेला आहे.विठ्ठलच विश्रांतीचा ठाव आहे
आणि विठ्ठलच सुखाचा भोग आहे. आसनी,शयनी , भोजनाच्या घासाघासात विठ्ठल आहे .जागृती ,स्वप्न आणि सुषुप्ति या
तिन्ही अवस्थांमध्ये विठ्ठलच भरून राहिला आहे.भक्तांना अलंकार भूषणे किंवा सुखाचे नाना प्रकार विठ्ठल स्वरुपातच सामावलेले वाटतात.ध्यानी मनी ,जागेपणात, स्वप्नात फक्त विठ्ठलच दाटला आहे.संत नामदेव म्हणतात तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल।देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल॥ सा-यांचे साररुप एकच आहे.