#सूरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
फार पूर्वी “मामाचं पत्र हरवलं, तेच आम्हाला सापडलं” असा एक खेळ विरंगुळा म्हणून खेळला जायचा. “फार पूर्वी” म्हटलं ते यासाठी की सध्या ऑनलाईन गेम्स चा जमाना आहे ना त्या तुलनेत मामाच्या हरवलेल्या पत्राचा काळ तसा जुनाच. आता मामाचंच कशाला, एकूण पत्रंच हरवली आहेत. नाही म्हणायला मध्यंतरी “चला हवा येऊ द्या” कार्यक्रमात अरविंद जगताप यांनी लिहिलेली विविध विषयांवर अंतर्मुख करणारी, हृदयाला हात घालणारी पत्र वाचली जायची.
तसा भाषेवर उपकार म्हणून परीक्षेत एक पत्र नावाचा प्रकार लिहायला सांगतात. पण त्यालाही इतर पर्यायी प्रश्न असतातच त्यामुळे त्यालाही फार गांभीर्याने घेण्याची गरज उरली नाही.
आमच्या लहानपणी – आम्ही अजून वयाची तिशी सुद्धा ओलांडली नाही बरं का! नाही तर वाचकांना वाटेल की एखादे आजोबा आपल्या नातवंडांना उद्देशून बोलत आहेत – तर आमच्या लहानपणी साधारण मराठी भाषेत लिहिता वाचता येऊ लागलं की घरी पोस्टकार्ड आणलं जायचं. दर महिन्यात एका पोस्टकार्ड वर फुटपट्टी ने आडव्या रेषा आखून (तेव्हा आम्हाला सरळ रेषेत लिहिता येत नव्हतं ना म्हणून) आपल्या किडुक मिडुक अक्षरात आपल्या मनाचा कसा जमेल तसा अहवाल मांडायचा अन् तो आजोळी कधी आजी आजोबांना तर कधी मामा मावशीला पाठवायचा. पलीकडून सुद्धा फार कौतुकाने पत्राचं उत्तर येत असे. आमची आई हे सगळं आम्ही पहिल्या दुसऱ्या वर्गात (मराठी माध्यम) असल्यापासून आमच्याकडून अगदी सक्तीने करवून घेत असे. आता ती पत्र सापडली की जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.
त्याहीपूर्वीच्या काळात तर दूर राहणाऱ्या जवळच्या माणसांची ख्यालीखुशाली कळण्याचं हेच एक माध्यम होतं. त्यातही पोस्टमन फक्त पत्र पोहचवण्याचंच काम करायचे असे नाही तर अगदी बोटांवर मोजण्याइतके लोक साक्षर असल्याने ते वाचून दाखवण्याचं काम ही त्याचंच असे. मुख्य म्हणजे वाचून दाखवण्याचे वेगळे पैसे तो आकारत नसे. आताच्या काळात हे सुद्धा नवलच. सर्वांसाठी तो कुटुंबाचाच भाग असल्यासारखा होता.
खरं तर पत्र फक्त संदेशवहनाचं साधन असण्यापुरती मर्यादित नाहीत. माणसांच्या अंतरंगाचा लेखी पुरावा आहेत. बदलत जाणाऱ्या भाषाशैलीचं दर्शन घडवणारी साधनं आहेत. त्या त्या काळातील सामाजिक स्थितीचा आरसा ही पत्र आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली आज्ञापत्रं ह्याचं उत्तम उदाहरण. पंडित नेहरुंनी इंदिराजींना लिहिलेली पत्रेही प्रसिद्ध आहेत. साने गुरुजींच्या “सुधास पत्रे” नी सुद्धा एक वेगळी उंची गाठली.
आज डिजिटल युगात जग जवळ येत चाललंय तशी माणसं दुरावत चालली आहेत. त्यामुळे मानवी मनातल्या ओलाव्याचं दर्शन घडवणारी पत्रंही दुर्मिळ होत आहेत. फक्त बोटांनी टिकटिक करून मोबाईल वर कीचाडलेले चॅट्स तेवढे ओसंडून वाहत आहेत. आपल्या वेगाने धावणाऱ्या जगात जोपर्यंत पोस्ट खातं कार्यरत आहे तोवर कामाच्या धावपळीतून वेळ काढून आपल्या जिवलगांना एखादं पत्र लिहून बघा, छान वाटेल!