माझ्याच बरोबरीच्या मित्राने , एकदा मला त्याची किमान जीवनमर्यादा सांगितली , तो म्हणाला, आपल्याला २०४७ चा भारत पाहूनच जायचे आहे. आणि मलाही ते पटले . आपल्या देशाला स्वातंत्र मिळून २०४७ ला शंभर वर्षे पूर्ण होतील,आणि ह्या अमृत महोत्सवाचे अमृत प्राशन करण्याचे स्वप्न , आपण सहज पाहू शकतो,असे मला वाटते . आपल्या पिठीचे आजचे वय लक्षात घेता , आपल्या स्वतः ला अजून फक्त २१ वर्षे सुदृढ , शशक्त आणि निरोगी ठेवायचे आहे,आणि श्री गणेशाच्या कृपेने, ते सहज शक्य आहे,ते कसे साध्य करायचे , ते आता आपण पाहूया.
१ ) चालते फिरते रहा: २०४७ चा भारत पहायचा असेल , तर आपल्याला फिरते व्हावे लागेल, अन्यथा मोबाईलमधेच पहावा लागेल . रोज नियमाने जितके जमेल तितके चालत रहा, घरातील दैनंदिन कामे स्वतः पायी चालून करा, जिन्याच्या पायऱ्या चढा आणि उतरा, मनसोक्त प्रवासाला जा आणि नियमित व्यायाम आणि योगासने करा .
२ ) समतोल आहार घ्या : २०४७ ला सशक्तपणे उभे राहायचे असेल तर समतोल आहार घ्या. ताजी हंगामी फळे,सलाद,हिरव्या भाज्या,सुका मेवा, दूध, दही , मोड आलेली कडधान्ये ,उसळी ,वा अन्य खाद्य पदार्थे आणि पेय आपापल्या आवडीनुरूप यथाशक्ती घेत रहा
३ ) मानसिक आरोग्य सांभाळा : मानसिक आरोग्य टिकवायचे असेल तर नको ते वाद घालणे टाळा,सर्वांशी विचारपूर्वक संवाद करा, योग्य ठिकाणी मौन बाळगणे शिका, योगासोबतच प्राणायाम, योगनिद्रा घ्या.
४ ) छंद जोपासा: दिर्घ आयुष्यासाठी छंद जोपासणे खूप गरजेचे असते. मनात असूनही करता न आलेले छंद आता पूर्णत्वाला न्या. नवनवीन शिकायला वयाचे बंधन नसावे, हे लक्षात ठेवा
५ ) कुटुंबासोबत घट्ट संबंध ठेवा : आपले कुटुंबच आपल्याला दिर्घ आयुष्यात सोबत देणार आहे. आपण एकटेही राहू शकतो ,असा बालहट्ट धरू नका. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि तो त्याच्या समूहातच सुरक्षित असतो,हे सत्य ध्यानात ठेवा
६ ) मित्रांच्या थव्यात रहा : मित्र हेच दीर्घ आयुष्याची खरी संजीवनी आहेत . आपले कुटुंब आणि आपले नातलग जेथे कमी पडतात, तेथे आपले मित्र कामाला येतात . मैत्री ही कधीही ऑनलाइन नसावी, व्यक्तिगत भेटीगाठीतील ऊब जागृत असू द्या .
७ )संपत्तीचे नियोजन करा : आपल्या संपत्तीचे नियोजन जबाबदारीपूर्ण पद्धतीने करा. घरातील आणि परिवारातील व्यक्तीला न कळविता ऑनलाइन आमिषे पाहून त्याला बळी पडू नका. आपला जोडीदाराला नेहमी विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घ्या. आपल्या सर्व संपत्ती किव्हा संसाधनांची योग्य अशी लिखित नोंद ठेवा , त्यांचे वाटप करायची घाई करु नका, जे वाटप करायचे ते इच्छापत्रानुसार करा.
ह्या सर्व बाबी जर पटल्या असतील तर , तुमचे भारताच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे तिकीट नक्की झाले आहे , असे समजा . तेव्हा आपण भेटून म्हणू या “ जय हिंद ,जय भारत “ भेटायचे ना मग नक्की. !!!!