सध्या क्रिमिनल मुव्हीज, क्राईम सिरीज याचा ट्रेंड सुरु आहे. त्याचप्रमाणे फिक्शनल – रियलिस्टिक अशा चित्रपटांना पेक्षक दाद देऊ लागले आहेत. याच दरम्यान २०२५ वर्ष सुरु होताच ‘ब्लॅक वॉरंट: कन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर’ ही वेब सिरीज ओटीटीवर आली. एक अतिशय सामान्य मुलगा- सुनील, घरातली बेताची परिस्थिती समजून, कामाची गरज म्हणून थेट जेलर पदाची मुलाखत देण्यासाठी जातो. हे जेल म्हणजे सुप्रसिद्ध तिहार जेल. कुठल्याही नोकरीच्या मुलाखतीमधला पेटंट आणि गेम चेंजर प्रश्न, “तुम्हाला ही नोकरी का हवी आहे?” असं विचारल्यावर सुनील आधी ‘देश कार्य, समाजासाठी’ असे उत्तर देतो नंतर मात्र ‘घरची परिस्थिती हालाखीची आहे, नोकरीची गरज आहे आणि ह्या पदासाठी कमी लोक असल्यामुळे मला नोकरी मिळण्याचे जास्त चान्सेस आहेत’ असे खरे उत्तर देतो. शिवाय, मी प्रामाणिक आहे. माझ्याकडे दोन डिग्र्या आहेत, म्हणून मी ह्या पदासाठी उत्तम आहे अस आत्मविश्वासाने बोलतो. एपिसोड बघताना, मी असे साधे, सरळ आणि योग्य वेळेस योग्य उत्तर माझ्या मुलाखतीच्या वेळेस देऊ शकेलं का? असा प्रश्न मला लगेच पडला. हे उत्तर देऊन सुनील मात्र जेलरच्या पदासाठी निवडल्या जातो.
या सीरिजमधल्या पहिल्याच एपिसोड मधला एक प्रसंग:
तिहार जेलमध्ये दोन गटातल्या कायद्यांच छोट्याश्या विषयावरून मोठ भांडण होतं आणि त्याचा निवाडा करण्याची जबाबदारी जेलरची असते. दोघांपैकी कोण बरोबर? हे शोधण्याचे काम या नवख्या जेलरला दिले जाते. वेगवेगळ्या पद्धतीने तो हे शोधण्याचा प्रयत्न करतो. पुढे काही प्रसंग येतात आणि नुसते कायद्यांचेच नाही तर त्याच्याबरोबर काम करणाऱ्या सहकारी जेलरचे, अधिकाऱ्यांचे सुदधा राजकारण आहे असं त्याला दिसून येते आणि त्यात फसून लगेचच तो सस्पेंड होतो. सिरीजच्या ह्या टप्प्याला त्याच्या मनातली विवंचना कळते. कधीतरी आपल्याही आयुष्यात असा प्रसंग आला असेल जेव्हा आपण संपूर्ण जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि नेहमी आपण करत असलेल्या पद्धतीने एखादी गोष्ट करतो. मात्र बॅकग्राऊंडला काहीतरी वेगळेच सुरु असते ज्याचा थेट संबंध आपल्याशी नसला तरी परिणाम मात्र अतिशय प्रभावीपणे आपल्यावरती होत असतो. अशा वेळेस आपले विचार, आपली वागण्याची पद्धत हे सगळे बदलून नव्याने काम करणे, पण त्याचबरोबर अप्रामाणिकपणाची साथ न देणे, हा समन्वय साधणे हे बऱ्याच वेळा त्रासदायक होत असतं. मात्र जशी परिस्थिती येते तशाप्रकारे उत्तर देणे ही परिस्थितीची गरज असते. अश्यात जर नेतृत्व करायची वेळ आली असेल तर स्वतःला बदलता बदलला आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांनाही सोबत घेऊन चालणे, हे अजूनच मोठे दायित्व होऊन बसते. पण यातला मूळ मुद्दा – परिस्थितीचे आकलन हे आहे, अस मला वाटत. या सिरीजमध्येही सुनील नावाच पात्र परिस्थितीची जाणीव करून घेत त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणताना दिसून येतो.
1980 च्या पुढे भारतात काही कैद्यांना फाशी ची शिक्षा देण्यात आली. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या व्यक्तीला फाशी देण्यास अधिकृत करतो तो दस्तऐवज म्हणजे “ब्लॅक वॉरंट” किंवा ‘डेथ वॉरंट’. हा निर्णय कितीही कायद्याच्या चौकटीत बसवून घेतला असला, तरीही अनेक प्रकारचे प्रश्न पुढे उद्भवतात. ‘त्या माणसाला कैदी म्हणून न बघता माणूस म्हणून बघितले गेले पाहिजे’,हा त्यातला एक प्रमुख मुददा. वेब सिरीजमध्ये यावर एक प्रसंग दाखवला आहे. रंगा-बिल्ला या कायद्यांच्या विरोधात जेव्हा ब्लॅक वॉरंट निघत तेव्हा एक अतिशय प्रख्यात पत्रकार त्यांना भेटण्याची मागणी करतात. मात्र हा विषय अतिशय संवेदनशील असल्यामुळे टाळण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच दरम्यान सस्पेंड झालेल्या जेलर सुनील, यांना पुन्हा नोकरीत घेतल जातं आणि दुसर महत्वाचं टास्क दिल जातं – ते म्हणजे या पत्रकाराचा मुद्दा हाताळणे. जर कैदयांची आणि पत्रकारांची भेट झाली, त्यात मानव अधिकारा विरोधात काही पुरावे मिळाले, तर फासी ची शिक्षा रदद होऊ शकले. हे न होण्याची जबाबदारी आता नवख्या नसलेल्या जेलर साहेबाना दिली जाते. अतिशय हुशारीने ते हा प्रसंग हाताळतात. स्वतःच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना तो ठामपणे सामोरे जातो अखेर रंगा-बिल्ला यांना फाशी ची शिक्षा होते पण जेलर पुढची आव्हाने मात्र अजून मोठी मोठी होत जातात.
याच वेब सिरीज मध्ये एक दुसरे पात्र आहे. त्याच्या कौटुंबिक, वैयक्तिक, मैत्री, कामाच्याठिकाणी असलेल्या अनेक अडचणींनी तो ग्रासलेला असतो. त्याचे व्यक्तिगत विचार, कामाच्या ठिकाणी असलेला ताण या सगळ्या गोष्टी सहन न झाल्यामुळे चुकीचा मार्ग पत्करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता किंवा पर्याय असला तरी तो त्याला निवडता आला नाही. म्हणून, माणूस म्हणून तो वाईट होता का? तर नाही. साधारणपणे व्यसनात बुडालेला माणूस, चुकीचा मार्ग पत्करलेला माणूस हा आपल्या लेखी वाईट, कमकुवतीचा, कमी बुद्धी असलेला असा आपल्याला वाटत असतो. मात्र त्याची बलस्थाने हे कधीकधी एखादा मोठा विषय सोडवण्यात मदत करतात. या जेलरला फार काही तिहार मध्ये करता येत आलं नसलं, तरीही सुनील आणि त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये झालेल्या वाद, याचा मात्र त्याच्यावर खूप परिणाम झाला आणि तो सोडवण्यात तो यशस्वीही ठरला. माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा पैलू हा नातेसंबंध जपणं आणि समाजात संबंध वाढवत जाणार हा असतो. एखादी गोष्ट सतत होत राहिली तर तितकाच मोठा परिणाम दिसतो तो परिणाम सकारात्मक हवा असेल तर मनात शुद्ध भाव आणि शब्दांवर नियंत्रण हवे. हे ह्या-सिरीजमधून कळतं.
ब्लॅक वॉरंट सारख्या अनेक चित्रपटांकडे आपण कथा म्हणून, ऐतिहासिक प्रसंग म्हणून तर बघतोच पण त्याच्यातल्या व्यक्तिरेखांकडे लक्ष दिल तर वेगवेगळे स्वभाव, परिस्थिती, कृती लक्षात येतात. एकच प्रसंग प्रत्येकासाठी कसा वेगवेगळा असतो हे हि लक्षात येत. कदाचित यातूनच आपल्याला पडलेल्या कितीतरी प्रश्नांची उतरही मिळू शकतात…..
०१.०१.२०२६
सार्थता