' विद्या विनयेन शोभते '
मनुष्य कितीही विद्वान असला तरी त्याच्या स्वभावात किंवा वागण्यात विनयशीलता असली पाहिजे मनुष्याच्या स्वभावात विनम्रता असली पाहिजे.
विनम्र असणे म्हणजे स्वतःच्या गुणांबद्दल माहिती असूनही त्याबद्दल अहंकार वाटू न देणे,आपल्याजवळ
असलेल्या पैशांचा गर्व न वाटता सर्वांशी आदराने वागणे, कितीही यश मिळाले तरी हुरळून न जाता
पाय जमिनीवर असणे.
विनम्र हा एक भाव आहे .विशेषण आहे. त्यापासूनच विनम्रता हा शब्द तयार होतो .त्यामुळे सभ्यता, एकाग्रता, स्वतंत्रता पात्रता यांसारखे शब्द तयार होतात. आपल्या वागण्या बोलण्यात तो दिसून येतो समोरच्याचा मान राखून मग तो वयाने वा कर्तृत्वाने लहान असो वा मोठा ,त्याच्यातील गुणांचा आदर करणे सन्मान करणे म्हणजे विनम्र असणे.उदा.
एखादे गवताचे पाते वादळ आलं,वारा आला की ते भुईसपाट होते पण पाऊस ओसरल्यावर मात्र ते चिवटपणे उभे रहाते.नाजूक पण कणखर असते.' मोडेन पण वाकणार नाही या भूमिकेत जरी आपण आपला स्व-आदर सांभाळत असलो तरी तो कधी दाखवायचा, कधी माघार घ्यायची की ज्यामुळे माझेच नाही तर इतरांचेही नुकसान टळेल अशी भूमिका घेणे यालाच विनम्रता म्हणतात. विनम्रता वागण्यातून बोलण्यातून विशेषतः संवाद साधताना आणि आपल्या देहबोलीतून समजते.जसं कोणी मानाने अथवा वयाने मोठं असेल तर आपण हात जोडून,मान वाकवून शुभेच्छा देतो.
विनम्र असणे गरजेचं आहे.कबीरजींचे दोहे याबाबत प्रसिद्ध आहे.तसे सर्व संत लोकांनी विनम्र रहाण्याची शिकवण आपल्याला दिली आहे.
-कबीरा नवै सो आपको,पर को नवै न कोय।
घालि तराजू तौलिये,नवै सो भारी होय।।
अर्थात्- जो वाकून दूस-याला नमस्कार करतो
तो दूस-याला कमी पण स्वत:साठी लाभदायक आहे . ज्याप्रमाणे तराजूचा परडा जो वजनदार असतो तोच खाली असतो.
गोस्वामी तुलसीदासांनी पण रामचरितमानस मध्ये सांगितले आहे
-बरसहि जलद भूमि नियराते। जया नवहिं बुध विद्या पाये।।
अर्थात ज्याच्याजवळ ज्ञान व विद्या नसते तो फक्त स्वतःला विद्वान दाखवायचा प्रयत्न करतो. 'थोथा चना बाजे घना।' सारखं मोठमोठ्या गोष्टी करतो . ज्याप्रमाणे अर्धी भरलेली कळशी पाणी सांडत जाते तसं मनुष्य आपलं अर्धअधुरं ज्ञान वाटत फिरतो.परंतु जो खरा ज्ञानी असतो तो विनम्र असतो ज्याप्रमाणे फळांनी लगडलेला वृक्ष.तो आपल्याला नेहमी हीच शिक्षा देतो की जे विद्वान , ज्ञानी आहेत त्यांनी विनम्र रहायला हवे.काही महान लोकांचे विनम्र शब्दासंबंधी चे उद्धरण खाली देत आहे.
अष्टावक्र- ज्या व्यक्तीत विनम्रता नाही तो विद्वान नाही.
चाणक्य- जे विनम्र आहेत तेच विश्वाला जिंकू शकतात.
प्रेमचंद- जिथे विनम्रतेने काम होऊ शकते तिथे अहंकार दाखवणं उचित नाही.
महात्मा गांधी- महानतम विजयाची वेळ ती असते जेव्हा एखादी व्यक्ती जास्तीत जास्त विनम्र असते.
बेंजामिन फ्रँकलिन–आपल्याहून जास्त गुणसंपन्न किंवा ज्ञानी व्यक्तींशी नेहमी विनम्र रहाणं हे आपलं कर्तव्य आहे.बरोबरीच्या लोकांच्या सोबत विनम्रता दाखवणे सभ्यतेचे लक्षण आहे आणि आपल्याहून कमी ज्ञानी व्यक्तींच्या सोबत विनम्रता दाखवणं ही उदारता आहे.
चयर्सोस्टाम -विनम्रता ही सर्व गुणांचे मूळ आहे,त्यांची आई आहे ,पाया आहे आणि बंधन आहे.
अंटोनी ब्लूम- व्यक्तीचा व्यवहार विनम्र असणं म्हणजे तो सदैव ईश्वराला प्रिय असतो आणि ईश्वर त्याला मदत करतो.
रस्किन-महान व्यक्तीचा प्रथम निकष विनम्रता आहे.
अगस्तिन – कुठल्याही धर्मात विनम्रते ला सर्वश्रेष्ठ मानलं जातं आणि तोच व्यक्ती यशाच्या शिखरावर पोचतो,जो नेहमी विनम्र असतो किंवा ज्याला विनम्रतेची सवयच असते.
एक प्रसंग आहे . दक्षिण अफ्रिका चे राष्ट्रपती ' नेल्सन मंडेला 'यांना सकाळी उठल्यावर स्वतःचे अंथरूण पांघरुण नीट घडी करून ठेवण्याची सवय तुरूंगात असल्यापासून होती.त्यात नंतर कधी खंड पडला नाही. एकदा ते चीनला गेले असताना एका अलिशान हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था असते.चीनमध्ये अशी समजूत आहे की ' जो मनुष्य तुमची खोली स्वच्छ करेल तोच अंथरूण वगैरे आवरेल .त्याचे काम तुम्ही केल्यास तो एक अपमान समजला जातो.' ही माहिती त्यांचा मदतनीस त्यांना देतो,आणि विनंती करतो की त्यांनी काम करू नये.तेव्हां मंडेला त्या कर्मचाऱ्याला बोलावून सांगतात की त्यांना त्यांचे अंथरूण घालण्याची सवय आहे आणि ती ते मोडणार नाही पण त्यात कर्मचाऱ्यांचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नाही.' दूस-यांच्या भावना न दुखावता त्यांनी आपली सवय पण सोडली नाही.
केवढी ही विनम्रता!
सौ.ऐश्वर्या डगांवकर.पुणे.
भ्रमणध्वनी ९३२९७३६६७५.