चोर म्हटलं की थोडी भीतीच वाटते. काय चोरून नेईल आणि केव्हा नेईल, याचा काही नेम नसतो. काही ठिकाणी तर चक्क एटीएम चोरीला जातात; कुठे पैसे, कुठे सोनं, तर कुठे लॅपटॉप, टीव्ही किंवा हाताला लागेल ती वस्तू. अंगणात एखादी वस्तू निष्काळजीपणे ठेवली, तर ती दुसऱ्या दिवशी तिथे असेलच याची खात्री देता येत नाही.
पण आमच्या कॉलनीत मात्र तसं कधी घडत नाही. बाहेर ठेवलेल्या अनेक वस्तू महिनोनमहिने तशाच पडून असतात. म्हणूनच काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना माझ्यासाठी खरोखरच आश्चर्याची होती.
चार दिवसांपूर्वी मी घराजवळ, अगदी कुंपणालगत, कडुलिंबाचं एक बरंच मोठं रोप लावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पाणी घालायला गेलो. पाईप सुरू केला आणि बघतो तर काय—कडुलिंबाचं रोप गायब!
क्षणभर मला वाटलं, कदाचित एखाद्या जनावराने ते खाल्लं असेल. पण कडुलिंब कोणता प्राणी खातो? मग वाटलं, रोप उडून तर गेलं नसेल? पण त्याच्या शेजारी लावलेलं छोटंसं कडुलिंबाचं रोप मात्र जागच्या जागी होतं. म्हणजे हे कुणीतरी मुद्दाम उपटून नेलं होतं. तरीही विश्वास बसत नव्हता.
दोन दिवसांनी मी तुळशीचं एक रोप लावलं. संध्याकाळी अगदी उत्साहात आमचा छोटेखानी वृक्षारोपण सोहळा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास पाणी घालायला गेलो, तर तुळशीचं रोपही गायब!
आजकाल तुळशीची रोपंसुद्धा चोरीला जाऊ लागली आहेत, हे पाहून खरंच आश्चर्य वाटलं.
याच संदर्भात मागच्या वर्षीची एक घटना आठवली. आमच्या परिसरातील एका वृक्षप्रेमीने मुख्य रस्त्याच्या दुभाजकावर अनेक तुळशीची रोपं लावली होती. दुर्दैवाने चार-पाच दिवसांतच ती सगळी गायब झाली. योगायोग असा की काही दिवसांत तुळशीविवाहही होता!
शेवटी त्यांनी एक फलक लावला—
“तुळशीचं रोप चोरी करून नेऊ नका. हवं असेल तर माझ्या दुकानात मोफत उपलब्ध आहे.”
दुर्दैव म्हणजे, रोप घ्यायला दुकानात कोणीच गेलं नाही!
आता यंदाही ते पुन्हा तुळशीची रोपं लावण्याचा प्रयोग करत आहेत. बघूया, यावेळी तरी चोरांना तुळशीकडून थोडी सुबुद्धी मिळते का!
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६