*स्वप्नामधील गावा*… *भाग —१*
हे शब्द ऐकताच आशाबाईंनी हळुवार आवाजात संथलयीत म्हटलेलं *ही वाट दूर जाते*….. हे गीत आणि नकळतच आपण त्या गाण्यासोबत कुठल्यातरी अज्ञात वाटेवर हरवून जातो आणि अजाणतेपणानेच कोणत्यातरी गावाशी येऊन थांबतो. हे गीत संपेस्तोवर त्या गावातील वाटांमध्ये आणि त्यातील स्वप्नरंजीत दृश्यांमध्ये रंगून एक फेरफटका मारून येतो. असे कदाचित आपल्यापैकी प्रत्येकानेच अनुभवलेले असेल.
वरील गाणे ऐकल्यानंतर मी मात्र ज्या गावात हरवून जाते किंवा ज्या गावातील वाटा डोळे बंद केल्यावरही मला स्पष्टपणे दिसतात, मला साद घालतात आणि मला खेचून नेतात आपल्या जगात, त्या गावाबद्दल आज मी सांगणार आहे.
२०१७ साली त्या गावात मी पहिल्यांदा गेले होते. तब्बल १५ महिने मी त्या अनोळखी प्रांतात राहू शकले ते केवळ तेथील प्रेमळ माणसांच्या आपुलकीमुळे!
वास्तविक पाहता भौगोलिकदृष्ट्या, भाषिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या किंबहुना प्रत्येकच बाबतीत म्हणाना, मला तिथला कणअन् कण नवलाईचा होता. कारण तिथली भाषा तुळू, प्रांत कर्नाटक व संस्कृती कोकण आणि दक्षिण प्रांताशी मिळती जुळती अशी होती. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी नेमकं कोणत्या गावाबद्दल बोलणार आहे. होय बरोबर! जुन्या नव्याचा मेळ साधणारे, शहरी आणि ग्रामीण जीवनाशी समरस होणारे, देवळांचे गाव म्हणून ख्याती असणारे तरीही राज्यातील उपराजधानीचा डौल सांभाळणारे, छोटेसे, टुमदार समुद्रकिनारी वसलेले शहर म्हणजे मंगलुरु.
काही लोक त्याला मंगलोर म्हणतात तर काही लोक चक्क बंगलोरच समजतात असं ज्ञात अज्ञाताच्या मध्ये स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणारं आणि प्रत्येकाला सामावून घेण्यास तत्पर असणारं गाव म्हणजेच मँगलोर होय.
२०१७&सली एका प्रोजेक्ट अंतर्गत माझी तिथे नेमणूक झा.ली त्यावेळी या गावात लहानग्या मुलाला घेऊन राहण्या इतपत हे शहर सुरक्षित असेल की नाही अशी शंका मनात आली. त्यावेळी एका सद्गृहस्थाने असे सांगितले की तो प्रांत काही वर्षे महाराष्ट्राचे अविभाज्य अंग होता, त्यामुळे तिथे आजही अनेक मराठी कुटुंबे राहतात. हे वाक्य ऐकल्यावर बराच दिलासा मिळाला.
मग भारताच्या नकाशावर या प्रदेशाचा शोध घेणे सुरू झाले तेव्हा लक्षात आले की गोव्याच्या खालोखाल अरबी समुद्राच्या किनारी हे शहर वसलेले आहे. नोकरी लागली असल्यामुळे तिथे जाणे भाग होते आणि पहिल्यांदा तिकीट काढतानाच लक्षात आले की नागपूरहून डायरेक्ट मंगलोरला जाणारी एकच गाडी अस्तित्वात आहे. इतर दिवशी जायचे असल्यास नागपूर ते मुंबई अर्थात दादर आणि तिथून दादर ते मंगलोर असा ब्रेक जर्नी करावा लागेल. अशा प्रकारच्या प्रवासाचा देखील हा पहिलाच अनुभव होता. अशावेळी परमेश्वर जे करेल ते उत्तम असे मानून त्याच्यावर विसंबून मंगलोर शहरात राहण्यासाठी नव्या उमेदीने तयार झाले.
आता तुम्ही म्हणाल की प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरही मी या गावाला स्वप्न मधील गाव असे का म्हटले असेल? तर त्याचे उत्तर असे आहे की, आज जवळपास दहा वर्षांहून अधिक काळ लोटल्यावरही या गावातील वाटा, माणसं, मंदिरे आणि समुद्र असं सगळं आजही लख्ख डोळ्यासमोर उपस्थित आहे.
एखाद्या निवांतक्षणी शांतपणे डोळे बंद केले असता आजही या शहरातील हे सर्व घटक माझ्या डोळ्यासमोर तरळतात आणि जणू काही मला बोलावत आहेत, साद घालत आहेत असे वाटते. म्हणून मी या शहराला स्वप्नातले गाव म्हणते.
हे स्वप्नातले गाव का आहे याची इतरही अनेक सबबी पुढच्या लेखातून आपल्यासमोर येतीलच तोवर हा भाग इथेच संपवते.
।।जय श्रीराम।।