राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रचारकी जीवन पद्धती अनेक दृष्टीने एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल. मला १९८३ ते १९८८ च्या दरम्यान ती जगण्याचे भाग्य लाभले. मी नुकताच एमबीबीएस झालो होतो आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ह्या सातपुडा पर्वत पायथ्याशी वसलेल्या गावासाठी , वैद्यकीय सेवा प्रकल्प प्रमुख म्हणुन, मी काम करणार होतो. प्रचारकी जीवनाची जवळून ओळख व्हावी , यासाठी आम्ही सर्व नव्याने प्रचारक म्हणून भविष्यात काम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांचा तीन दिवसीय अभ्यास वर्ग अकोला जवळ आयोजित केला होता .त्यात बरेचसे जेष्ठ आजीवन संघ प्रचारक मार्गदर्शन करणार होते .
संघ प्रचारक म्हणून काम करताना काय करावे आणि काय करू नये , ह्यावर मनमोकळी चर्चा वेगवगळ्या सत्रात सुरू असायची.ह्या सत्रांचे, उदबोधन वा मार्गदर्शन असे स्वरूप कधीच नसायचे. संघ प्रचारकाला सहसा कोणत्यातरी स्वयंसेवकांच्या घरी घरच्या सदस्यासारखे रहावे लागते.त्यात त्या घरातील प्रत्येक सदस्याशी कसे वागावे, कसे बोलावे, कसे झोपावे,आपली सर्व व्यक्तिगत कार्ये कशी पार पाडावीत , असे खूप काही सांगितले जायचे. ह्या सर्व कार्यासाठी धनाचे नियोजन, त्याचा हिशोब ठेवण्याची पद्धती, प्रवासात येणाऱ्या अडचणी इत्यादी अनेक गोष्टीवर सखोल चर्चासत्र सुरू असायचे .एकंदरीत हे कार्य किती कंटकाकीर्ण आहे , ह्याची जाणीव सर्वांना असावी , हाच त्या अभ्यास वर्गाचा उद्देश असावा .आणि हे सर्व प्रचारकी कार्य करताना वर्तमानात किंवा भविष्यात, निःस्वार्थ तसाच निरपेक्ष भाव ठेवावा लागेल, हे सुद्धा ठणकावून सांगितले जाते. आता ह्या अग्निदिव्यात स्वतःला झोकायचे किंवा नाही , हे ठरवायचे आहे, अन्यथा आता येथूनच वापस जाता येईल , असेही सांगितले जायचे.
अश्या ह्या भारावलेल्या सत्रात प्रश्नोतरांचा पाऊस पडत असायचा . तेव्हा ते सत्र माननीय मोहनजी भागवत घेत होते. तेव्हा ते अकोला विभाग प्रचारक म्हणून कार्यरत होते. आमच्यातील एकाने एक प्रश्न विचारला, जो मला जन्मभर लक्षात राहील असा आहे. त्याने विचारले, की, असे प्रचारकी जीवन आजन्म केल्यानंतर जेव्हा तो वयोवृद्ध प्रचारक काही कारणामुळे संघकार्य करू शकणार नसेल , तेव्हा त्याची जबाबदारी कोण घेणार ? ह्या प्रश्नानंतर त्या सत्रात भयाण शांतता पसरली , आणि त्यावर काय उत्तर येणार , ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले.
माननीय मोहनजी आता काय बोलणार ? सहसा हसतमुख असणाऱ्या मोहनजीच्या चेहऱ्यावर एव्हाना थोडा गंभीर भाव दिसत होता . आणि उत्तरादाखल त्यांनी त्यांच्या प्रचारकी जीवनाच्या अश्याच अभ्यास वर्गातील अनुभव सांगितला. असाच प्रश्न त्यांचा त्या वर्गात विचारला गेला होता, तेव्हा त्याकाळी असलेल्या जेष्ठ प्रचारकाने ,बहुतेक मा.श्री. गुरुजीनी, दिलेले ते उत्तर होते. ते म्हणाले होते, की हे कार्य आजन्म पूर्ण केल्यानंतर तुम्ही जर परत स्वगृही जाणार असाल तर तुमच्या घरी तुमचा कोणीही स्वीकार करणार नाही. संघ , संगठना म्हणून तुमची ही जबाबदारी घेणार नाही, कारण हे कार्य निरपेक्ष आणि निःस्वार्थ पणे करायचे आहे, हे तुम्ही सर्वांनी जाणावे. मग तुमचे काय होणार, तर ऐका, एखाद्या गावाबाहेर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तहान आणि भूकेने व्याकुळ होऊन हात पाय घासत प्राण सोडावे लागतील, असे हे व्रत आहे . त्यांचे हे उत्तर आजही माझ्या स्मरणात ताजे आहे.
आज संघ कार्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, आणि अश्या असंख्य कर्मठ कार्यकर्त्यांनी आपआपली समिधा देऊन ह्या वटवृक्षाचे जे सिंचन केले आहे ,त्यामुळेच हा वटवृक्ष अमर राहणार, ह्याची मला मनोमन खात्री आहे.