पाच-सहा दिवस असेच चालू राहिले. रोज वेगवेगळी गाणी असायची. कधी अतिशय वेगवान, तर कधी संथ लयीतली. कधी मध्येच भजन असायचे. कधी मराठी, कधी बंगाली, तर कधी इतर भाषांतील गाणी. प्रत्येक गाण्यावर आम्हाला नृत्य करायचे असे.
कित्येकदा मनात यायचे की स्वामीजींना विचारावे, “हे सगळे कशासाठी?” पण गुरुची आज्ञा म्हणजे आज्ञा. त्यांनी सांगितले की करायचे, म्हणजे करायचे. त्यात किंतु-परंतु करण्याचा प्रश्नच नव्हता.
स्वामीजी दिसायला अतिशय शांत, संयमी आणि धीरगंभीर होते. पण त्यांच्या त्या शांत व्यक्तिमत्त्वातही एक विलक्षण दरारा होता. ते रागावले तर काय होईल, अशी नकळत भीती वाटायची. त्यामुळे त्यांनी सांगितले तसे मी निःसंकोचपणे करत राहिलो.
सहाव्या-सातव्या दिवसापासून एका विशिष्ट लयीत नृत्य करत असताना माझ्या शरीरात काहीतरी वेगळे जाणवू लागले.
त्या दिवशी संध्याकाळी मी माझा अनुभव स्वामीजींना सांगितला. ते हसले आणि म्हणाले,
“हा… आता वेळ आली आहे.”
मला कळेना, कोणती वेळ? म्हणून मी लगेच विचारले,
“स्वामीजी, शरीरातून असे वेगवेगळे कंप का जाणवतात? आणि सुरुवातीची गाणी व आताची गाणी यांत इतका फरक का आहे?”
स्वामीजी म्हणाले,
“हे अगदी स्वाभाविक आहे. सुरुवातीची गाणी तुझ्या मनात साचलेला राग, चीड, ताण आणि दडपलेल्या भावना बाहेर काढण्यासाठी होती. तुला आठवतंय? तू इतरांसोबत मोठ्याने आरोळ्याही ठोकल्या होत्या.”
“हो.”
“आरोळी आपण दोन प्रसंगी देतो. एक म्हणजे अत्यानंद झाला की आणि दुसरे म्हणजे दुःख, राग, संताप किंवा असह्य वेदना झाल्या की. त्या वेळी मोठ्याने ओरडल्यामुळे मनात साचलेला ताण बाहेर पडतो.
पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा राग दाबून ठेवायला शिकतो. भावना व्यक्त करण्याऐवजी त्या मनातच साठवत राहतो. याच दडपलेल्या भावना शरीरावर परिणाम करतात आणि शरीरात विविध ठिकाणी ऊर्जेच्या गाठी तयार होतात.”
मी लगेच विचारले,
“पण या ऊर्जेच्या गाठी पडतात म्हणजे नेमके काय? आपल्या शरीरात अशी कोणती ऊर्जा असते?”
स्वामीजी म्हणाले,
“एखादे लहान मूल पाहिलेस? ते सतत सळसळत असते. त्याच्यात इतकी ऊर्जा असते की ते सहज थकत नाही. कारण त्याची ऊर्जा मुक्तपणे व्यक्त होत असते.
पण जसजशा भावना विकसित होत जातात, तसतसे आनंद, दुःख, तिरस्कार, चीड, राग, मत्सर… असे षड्रिपू मनावर प्रभाव टाकू लागतात.”
“तुला षड्रिपू माहिती आहेतच ना?”
आता कुठे माझ्या डोक्यात थोडासा प्रकाश पडू लागला होता.
स्वामीजी पुढे म्हणाले,
“ही ऊर्जा आपल्या शरीरात सतत प्रवाहित होत असते. तिलाच आपण प्राणशक्ती म्हणतो. ही प्राणशक्ती अथांग विश्वातून वैश्विक ऊर्जेच्या (कॉस्मिक एनर्जी) स्वरूपात सर्वत्र वाहत असते. योग्य पद्धतीने आपण ती आपल्या शरीरात ग्रहण करू शकतो.
पण त्यासाठी आपले शरीर एखाद्या रेडिओच्या रिसिव्हरसारखे असले पाहिजे. जसा अँटेना अधिक सक्षम असेल, तितक्या अधिक प्रमाणात तरंग पकडता येतात. तसेच शरीर जितके सक्षम असेल, तितकी अधिक प्राणशक्ती त्यातून प्रवाहित होऊ शकते.
यासाठी शरीर हे ऊर्जेचा उत्तम वाहक बनले पाहिजे. ऊर्जेचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी शरीर तयार करावे लागते.
यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम, योगासने आणि प्राणायाम आहेत. पण त्यातल्या त्यात सर्वांत सोपा, आनंददायी आणि मनोरंजक मार्ग म्हणजे नृत्य.”
क्षणभर थांबून ते म्हणाले,
“दुर्दैवाने आपल्या समाजात नृत्याला फारसे महत्त्व दिले गेले नाही. शास्त्रीय नृत्य इतके अवघड करून ठेवले आहे की ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
सामान्य माणूस सहसा नाचतच नाही. फार तर एखाद्या लग्नात किंवा गणेशोत्सवात थोडेफार नाचतो.
पण तुला माहिती आहे का? नृत्यामुळे शरीरातील या ऊर्जेच्या गाठी हळूहळू विरघळू लागतात आणि प्राणशक्तीचा प्रवाह अधिक मुक्त होतो.”
मी मध्येच विचारले,
“स्वामीजी, याचा चक्रांशी किंवा कुंडलिनीशी काही संबंध आहे का?”
स्वामीजी हसले.
“अर्थातच! केवळ संबंधच नाही, तर चक्रांचे जागरण आणि कुंडलिनी जागृत होण्यासाठी नृत्य व त्यातून निर्माण होणारा ऊर्जेचा प्रवाह अत्यंत महत्त्वाचा असतो.
योग, ध्यान, प्राणायाम, योगासने, मुद्रा यांचे फायदे आपल्याला माहिती असतात; पण त्यात आनंद कमी असल्यामुळे आपण सातत्य ठेवत नाही.
नृत्यात मात्र आनंदही आहे आणि साधनाही आहे.
म्हणूनच मी तुला नृत्य करायला लावले. त्यामुळेच तुझी चक्रे जागृत होऊ लागली आहेत. म्हणूनच तुला शरीरात त्या सूक्ष्म संवेदना जाणवत आहेत.
आपल्याला फक्त शरीरातील सात चक्रे माहीत असतात. पण शरीरात अशी अनेक सूक्ष्म ऊर्जा केंद्रे असतात. तीही हळूहळू जागृत होऊ लागतात.”
स्वामीजी बोलत होते आणि मला माझ्या शरीरातील त्या सूक्ष्म संवेदना स्पष्टपणे जाणवत होत्या. हळूहळू माझे संपूर्ण शरीर प्राणशक्तीने भरून जात असल्याचा अनुभव येत होता.
त्यानंतरच्या चार-पाच दिवसांत नृत्यानंतर ध्यान करण्याची सूचना मला देण्यात आली.
नृत्यानंतर जेव्हा मी ध्यान करत असे, तेव्हा पाठीच्या कण्यातून प्राणशक्तीचा प्रवाह स्पष्टपणे जाणवू लागला.
आणि मग तो दिवस उजाडला…
त्या दिवशी मी अंधाऱ्या खोलीत ध्यानस्थ बसलो होतो. अचानक माझ्या डोळ्यांसमोर अत्यंत तेजस्वी प्रकाश प्रकट झाला.
त्या प्रकाशात स्वामी स्वरूपानंद दिसले. त्यांच्या शेजारी त्यांचे गुरू सरस्वती महाराजही उभे होते.
माझ्या डोळ्यांतून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहू लागला.
तो अनुभव इतका विलक्षण आणि दिव्य होता की तो शब्दांत मांडणे अशक्य आहे.
क्षणोक्षणी तो अनुभव अधिक गहिरा होत गेला. शरीर अगदी हलके वाटू लागले. मन एका अवर्णनीय आनंदाने भरून गेले.
खरोखरच… स्वामीजींनी मला एका वेगळ्याच मार्गाची ओळख करून दिली होती.
अण्णा बोलायचे थांबले.
माझ्या मनात असंख्य प्रश्न होते; पण नेमका कोणता प्रश्न विचारावा, हेच सुचत नव्हते.
इतक्यात काकू आल्या आणि हसत म्हणाल्या,
“चला, अनुभवकथन संपलं असेल तर आता जेवणावर ताव मारा. तिकडे जेवणरूपी ऊर्जा तुमची वाट पाहते आहे.”
त्यांच्या त्या मिश्कील वाक्यावर अण्णा आणि मी दोघेही मनापासून हसलो.
#30 दिवसात 30 #प्रयोग 2026 #सुरपाखरू