एक बालस्वयंसेवक असतांना माझी ह्या कच्चा चिवड्याशी जी दोस्ती झाली आणि ती आज पर्यंत अजूनही तशीच टिकून आहे .जसे एका झालमुडीने मोदींना पश्चिम बंगालला त्यांच्या ताब्यात दिले, तसेच काहीसे ह्या कच्या चिवड्याने आम्हाला नेहमीकरिता संघाच्या ताब्यात दिले आहे . ह्या कच्चा चिवड्यालाच बंगालवाले झालमुडी म्हणत असतील , असे मला वाटते . संघाची कोणतीही बैठक असो, ती ह्या चिवड्यानेच संपत असे, एव्हाना ह्या चिवड्याच्या मोहापायी ती असायाची,असे ही म्हटले तरी वावगे ठरणार नाही . सध्या हा कच्चा चिवडा रायगडावर सुद्धा मिळतो , महाराजांच्या मावळयांना बहुतेक तो नक्कीच आवडत असावा.
बालपणी आमचे हे चिवडा प्रेम प्रकरण किती भव्य प्रमाणात असायचे , हे सर्वांना सांगितले , तर अविश्वसनीय वाटेल , असे होते. आम्ही १०-१२ जण एक टोपल भर कच्चा चिवडा सहज फस्त करायचो. वर्तमान पत्राचा इतका बहुउद्देशीय उपयोग कोणी केला नसेल, तो आम्ही करीत असू . एक वर्तमानपत्र कोणाचे पूर्ण वाचून झाले , की मग आम्ही त्याला गोलाकार बसलेल्या सर्व मित्रामध्ये सन्मानाने पसरवत असू. त्यावर कोणी आणलेले पोहे, तर कोणाचे मुरमुरे, कोणाचे शेंगदाणे,लोणचे,डाळ्या,चिरलेला कांदा, सांबार,मिळाले तर तेल , असे सर्व टाकून ते मिसळेल्या जायचे . उरलेल्या वर्तमान पत्राचेच प्लेट्स आणि चमचे तयार व्हायचे , आणि मग मुख्यशिक्षकाचा आदेश व्हायचा, आक्रमण …. , आणि पाहता पाहता तो टोपल भर चिवडा आमच्या पोटात स्तिरावलेला असायचा. हा चिवडा संपेपर्यंत कोणीही पाणी पीत नसे , तसा तो नियमच होता.
पुढे हे कच्चा चिवडा प्रेम बहुतेक अनुवंशिक असावे , असे माझ्या मुलांमध्ये सुद्धा आले. सुट्टीच्या दिवशी कधी आठवण आली की झाले , एक भांडभर चिवडा आम्ही चौघे सहज फस्त करायचो. कधीतरी आम्ही आमच्या शेतात चिवड्याचे सामान घेऊन जातो,आणि तेथील शेत मजुरांसोबत कच्चा चिवडा पार्टी करतो .सर्वांची आवडती भेळ आणि गोपालकाला , हे कमीजास्त प्रमाणात आमच्याच कच्चा चिवड्याचे सुधारित रूप आहे ,असेच आम्हाला वाटते.
माझे हे चिवडा प्रेम माझ्या वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा प्रसिद्ध होते . माझ्या कम्युनिटी मेडिसिन विभागात परतेकी नावाचा एक कर्मचारी होता ,तो सुद्धा माझ्यासारखाच पक्का , असा कच्चा चिवडा प्रेमी . सर्व कर्मचारी थोडे थोडे पैसे द्यायचे आणि मग तो सर्व सामान घेऊन यायचा , मग तेथे आमची चिवडा पार्टी व्हायची.
ह्या कच्चा चिवड्याचे काही खास वैशिष्ट्ये आहेत ,ती खालीलप्रमाणे :-
१: हा चिवडा संसर्गजन्य असतो, कोणी खातांना दिसले तर , तुम्हालाही चिवड्याची भूक लागते
२: कच्चा चिवडा एकट्याने पैसे देऊन केला , तर तो तितकासा चविष्ट लागत नाही , त्याला गोपालकाल्यासारखे जितके जास्त जास्त हात लागतील , तितका तो जास्त चविष्ट होतों .
३ : कच्चा चिवडा तयार झाला की , लवकर खाऊन फस्त करायचा असतो, नाही तर तो चांबट होऊन , खातांना मजा येत नाही .
४: कच्चा चिवडा सहसा बाजारात तयार मिळत नाही, मिळतो तेव्हा , त्याला स्वतः ताजा तयार करून घ्यावा लागतो .
५ : बाजारात मिळणाऱ्या खाद्य पदार्थ्यांच्या किंमतीच्या तुलनेत ह्या चविष्ट पदार्थाची किंमत नाममत्र असते
६: कच्चा चिवडा हे संपूर्ण अन्न आहे, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स , ह्याचा हा संतुलित आहार आहे, असेच म्हणावे लागेल
इतकी १ ते ६ वैशिष्ट्ये सांगण्याचे कारण की, ह्या प्रत्येक वैशिष्टाप्रमाणे आपल्या जीवनात निखळ , निर्मळ आणि अनमोल आनंद देणाऱ्या सर्व गोष्टी , ह्या कच्चा चिवड्या प्रमाणे बाजारात उपलब्ध नसतात , त्या आपल्याला स्वतः तयार करून सढळ हस्ते सर्वांना वाटायच्या असतात. हे करणे, आपल्याला शिकले पाहिजे. मला पटते , तुम्ही सुद्धा विचार करून पहा.