शेंदुर्जना घाट ही माझी जन्मभूमी, येथे चवथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेऊन १९७० ला मी नागपूरला आलो आणि तेव्हापासून आजपर्यंत नागपूरच माझी कर्मभूमी बनली आहे. पण आजही मला माझे हे गाव आणि येथील परिसराची नेहमीसाठी मनस्वी ओढ वाटत असते . येथील छोट्या छोट्या गोष्टींशी , माझे काहीतरी जन्मोजन्मीचे नातं असाव , असे मला वाटत राहते. पुढे कालांतराने माझे भाऊ ,बहिणी,आई, वडील सर्व नागपूरलाच आले , पण मी मात्र काहीतरी अनामिक कारणांनी , ह्या माझ्या गावाला येतच राहिलो. पुढे आमची येथील शेतीही विकल्या गेली, आणि घर सुद्धा पावसाळे ,उन्हाळे सहन करीत हळूहळू भुईसपाट झाले, पण माझी ही जन्मभूमी मला एकसारखी खुणावत राहिली . माझ्या जन्मापासूनची दहा वर्षे आणि त्याच कालखंडातील माझ्या आईसोबतच्या असंख्य आठवणी , ह्याच भुसपाट झालेल्या जागेत खूप खोलवर रुतून बसलेल्या , मला जाणवत होते. आपल्या सर्वात लहान मुलाच्या लग्नात आपण नसतांनाही , तिच्या भविष्यातील सुनेच्या हिस्स्याचे , आपल्या अंगावरील दागिने , माझ्या आईने ह्याच भूमीत दडविले होते. त्यामुळेच मला येथे माझ्या आईची खूपच त्रिवतेने आठवण येत असते आणि त्यामुळे मला हीच माझी मूळ मातृभूमी वाटते.
पुढे आयुष्यात खूप काही काही घडत राहिले, आणि पाहता पाहता मी माझी साठी सुद्धा गाठली , पण ही एव्हाना खंडार झालेली माझी जन्मभूमी , काही माझा पिच्छा सोडत नव्हती .शेवटी मी एक दिवस एकटाच, माझ्या मुलाची मोटर सायकल घेऊन ,ह्या वेडापायी , येथे आलो, आणि माझ्या ह्या भुईसपाट जन्मभूमीला येऊन भेटलो. पुढे मी , माझ्या सर्व बहिणी, भाऊ आणि त्यांची मुले मुली सर्वांना , ही भूमी मला कायदेशीर रित्या सोपवण्याची विनंती केली आणि त्या सर्वांनी त्याला मंजुरी दिली , आणि २०२१ च्या सुमारास, ती कायदेशीर रित्या माझ्या नावे विनामोबदला करून दिली.
त्यानंतर ह्या आपल्या जन्मगावी , गावासाठी काहीतरी करावे , असे मी ठरविले . गावातील जेष्ट लोकांशी संवाद साधण्यासाठी बैठका घेतल्या आणि येथील स्थानिक गरजा समजून घेतल्या. कोव्हिड कालखंडातील आठवणी गावात अजुन ताज्या होत्या, आणि त्यासारख्या इमरजेंसी मध्ये चांगली रुग्णवाहिका नसल्याची खंत तेथील कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली . म्हणून मी एक नवीन महिंद्रा कंपनी ची रुग्णवाहिका गावाला भेट दिली. येथे मला जे स्वास्थ्य कार्य करावयाचे होते , त्यासाठी गावस्तरावर संघटन असावे, म्हणून “ स्वामी विवेकानंद स्वास्थ्य सेवा प्रकल्प “ अशी एक संस्था आम्ही स्थापन केली. माझ्या गावातील ह्या जमिनीवर , त्यानंतर मी एक टुमदार इमारत स्वखर्चाने बांधली आणि आई वडीलांच्या स्मृती खातर , ह्या परिसराला “ रंगप्रभा परिसर “ असे नाव दिले . ह्याच परिसरात , आता आम्ही वेगवेगळी आरोग्य शिबिरे आयोजित करीत असतो. ह्यानिमित्ताने माझे माझ्या जन्मभूमीशी ऋणानुबंधन जोडले गेले,ही एक माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.