गुरुपौर्णिमेनिमित्त
जीवनात गुरूचे खूप महत्व असते.तसं पहायला गेलं तर मनुष्य जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत जीवनात काही ना काही शिकतच असतो.त्याच्या जीवनात असंख्य गुरू असतात.जे त्याला चांगल्या वाईट गोष्टींची समज देत असतात.पण ते सर्व आपल्याकडून काही ना काही अपेक्षा ठेवत असतात.खरा गुरू तोच ज्याची लक्षणे श्रीमद् भगवद्गीतेत सांगीतली
आहेत.ती जर आपण पहायला गेलो तर याच लेखाचे अनेक भाग क्रमशः द्यावे लागतील.असो.
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हटली जाते.ज्यांनी महाभारत हा अलौकिक जीवनदर्शन ग्रंथ लिहीला त्या व्यास-मुनींना विनम्र वंदन करून त्यांची यथासांग पूजा करण्याचा हा मंगलदिवस आहे.त्यांच्यासारखे श्रेष्ठ आचार्य, मुनी,ऋषी अद्याप झाले नाही अशी सर्वांची श्रद्धा आहे.
गुरु,आचार्य हे भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहे .कारण त्याच्या द्वारा ईश्वरप्राप्ती होऊ शकते असे शास्त्रात कथन केले आहे.
” व्यासोच्छिष्टं जगत सर्वम।” असे त्यांच्याबद्दल लिहीले गेले आहे.एवढेच नव्हें तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार, आद्य जनक आणि मूलाधार मानले जातात.ज्या प्राचीन ग्रंथात धर्मशास्त्र, नीतीशास्त्र,व्यवहारशास्त्रआणि मानसशास्त्र या विषयांचा परामर्श घेतला आहे अशा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहीला आहे.ज्यांना आपण 'ज्ञानियांचा राजा ' म्हणतो त्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा व्यासांचा मागोवा घेऊ असे म्हणून लिहीण्यास सुरूवात केली.
आपल्या भारतभूमीवर प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. ज्यांच्याकडून आपण विद्या प्राप्त करतो आणि त्याच विद्यार्जनाच्या बळावर आपण आपल्या जीवनाला कृतार्थ करतो,उद्धार करतो अशा गुरुजनांचा सन्मान करणे,आदर करणे,त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले निजी कर्तव्य आहे.आपण कुणाचे तरी शिष्य आहोत ,आपले कोणी गुरु आहेत ही भावनाच मुळात कृतज्ञतेची आहे.या जीवनात आपले आईवडिल हेच आपले आद्यगुरू आहेत हे तर निर्विवाद आहेच .ज्यांच्याकडून बाह्य जगात आपण शिक्षण घेतो ते शिक्षक आपले गुरु असतात.त्यांच्याप्रती आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे हे जितके सत्य आहे तितकेच हा निसर्ग/सृष्टी पण आपले गुरुच आहेत आणि तो असा गुरू आहे जो निरपेक्ष, निष्काम आहे जो आपल्याला फक्त सदैव देतच रहातो.आपण त्याच्याप्रती सदैव कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे .माझे लेखन गुरू दोन आहेत त्यांच्यापासून मला लिहीण्यास प्रेरणा मिळाली.ते म्हणजे वि.वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज ज्यांना मी महाविद्यालयात शिकत असताना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्यासारखं काव्यलेखन आपल्याला पण सुचलं पाहिजे या विचाराने मी भारावून गेले होते. मग माझा सृष्टी कडे जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत गेला आणि मी कविता लिहू लागले.जळगांव आकाशवाणीवर युवावाणीवर मला माझ्या कविता सादर करण्याची संधी मिळाली.मी तेव्हां खूप आनंदित झाले होते.परंतु नंतर मात्र संसारात अडकल्याने काव्य प्रतिभेत बरीच वर्ष खंड पडला होता.मुलं मोठी झाल्यावर परत एकदा मी लेखणी उचलली . काही कथा लिहील्या . योगायोगाने माझ्याच कथेचे कथाकथन पद्मविभूषण पुरस्कार ज्यांना मिळाला त्या ज्येष्ठ साहित्यिका कै.मालती जोशी यांनी ऐकले.त्यांनी माझी पाठ थोपटली आणि ' सदैव अशीच लिहीत रहा आणि कथाकथन पण करत रहा.'त्यांच्या त्या बोलाने.मी लेखिका झाले . त्याचप्रमाणे हे जे जग आहे ते रोज आपल्याला जीवनाचे धडे देत असते.समाज हा देखील आपला गुरू आहे .मातृभूमी ,मातृभाषा हे सर्वच आपले गुरु आहेत या सर्वांनाच माझेही सादर नमन.सरतेशेवटी ज्या सर्वांकडून मी रोज शिकत असते.त्या सर्वांना नमन!
नमस्कार.सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छां आणि सर्वांच्या गुरुदैवताला माझं सादर नमन 🙏🙏 आमच्या घराण्याचे गुरू म्हणजे आमचे मुळपुरुष श्री भटजीमहाराज ज्यांनी जिवित समाधी घेतली होती .त्यांना समर्पित माझ्या चार ओळी
भावांजली
(चाल- पुष्पांजली ही तुला अर्पिते दत्तगुरु सदया)
वाहते मी शब्दसुमने
आपुल्याच चरणी हो
आपुल्याच चरणी
अल्पमती मम, क्षुद्र लेखणी
शब्द न ये अनुमाना…।।
वाहते मी शब्द सुमने..
शब्दसंपदा रिक्त जाहली
महिमा तव गाता की देवा
महिमा तव गाता।
निराकार तू निर्मोही
रूप न ये चित्ता..।।
वाहते मी शब्द सुमने ..
किर्ती दिगंत तव मोहविते मन गाती सकल जना…
की देवा गाती सकल जना
तुझिया नामस्मरणे पळती संकटं गुरुराया।।
वाहते मी शब्द सुमने
आपुल्याच चरणी की
देवा आपुल्याच चरणी.. की देवा आपुल्याच चरणी..