तिचा संघर्ष तिच्या जन्मापासूनच सुरू झाला होता. एका भल्या मोठ्या कुटुंबातली ती वयाने सर्वात लहान व्यक्ती. घरातील कोणत्याही कामात मदत करण्यापासून तर शेतीचे काम करण्यापर्यंत ती नेहमी तयार असायची. तिच्या सर्व भावंडांचे लग्न झाल्यावर कधी त्यांच्या घरी गेली तर तिथेही ही सर्वच कामात सदैव तत्पर असायची. कधीतरी आरामात श्वास घेऊन शांतपणे एकाजागी बसली असेल तर नवल.
तिचे लग्न झाल्यावर सुद्धा काही परिस्थिती बदलली नाही. नवऱ्याने म्हटले कुठे सोबत चल, तर जायची अन्यथा नाही. तो पौरोहित्य कार्य करून घरी आला की त्याला आलेल्या दानातील वस्तू वेगवेगळ्या करण्यातही तिचे बरेच आयुष्य गेले. मग एकवेळ अशी आली की, हे कार्य करणे तिचे थांबून गेले. कारण तिचा तोच नेहमीकरता तिला आणि लेकरांना पोरके करून गेला. ती रडली पण हिम्मत मात्र हरली नाही. सर्व चांगले होईल चा जप करत करत एकदम हळू हळू का होईना सर्व चांगले व्हायला लागले. मात्र तिचा संघर्ष अजूनही थांबला नव्हता आणि थांबलेला नाही.
मुलांच्या नोकरीसाठी या ना त्या देवाला नवस कर, की आणखी काही तिचे चालू राहायचे. तिची इच्छा काय तर फक्त ८ ते १० हजार खूप आहे पगाराचे. तिच्या या भोळ्या भक्तीला देव पण बराचवेळा पावला.
जरी ती फार तणाव घेत नसली तरी मानसिक संघर्ष तर आहेच. कधी चिडचिड सुद्धा होतेच ती वेगळी. रोजची ती तडतड, रोजची कामे हे आजही सुरू आहे. मुलांचे लग्न लवकर होऊ दे ही मागणी अजूनही तिच्या देवाने पेंडिंग ठेवली आहे.
तिच्या कार्यात तिला तिच्या मुलांचीही मदत होतेच आणि तिला सुद्धा आपल्याविषयी मुलांना जाणीव आहे याचेही तेवढे समाधान आहे. मात्र कुठेतरी एक संघर्ष जो अजूनही थांबला नाही अजूनही सुरूच आहे.
या संघर्षातही तिला तिच्या मुलांचा अभिमान आहे. ती पूर्ण अभिमानाने सांगू शकते की माझी मुले चांगली आणि प्रामाणिक आहेत.
एवढे असणेच तिच्यासाठी सर्व काही आहे. म्हणूनच मला माझ्या अशा गुरूचा माझ्या 'हिम्मतवान आईचा' अभिमान वाटतो.
कारण आई ही आईच असते. तू माझ्या मुलासारखा आहे म्हणणारे खूप असतील पण स्वतःची मुले कशी आहे ते फक्त आईलाच ठाऊक असते.
लेखक – रोज डब्यात कोणती भाजी आहे हे माहित नसलेला वैभव. 😀