आज त्यांच्या लग्नाला पस्तीस वर्षे झालीत म्हणून ते दोघे तामियाला सहलीला गेले होते. सकाळीचा प्रहर , सर्वदूर पसरलेल ते धुक अन नीरव शांतता. पक्ष्यांची किलबिल ऐकत दोघेही मनातल्या मनात वैवाहिक सहजीवनाच्या पस्तीस वर्षाचा पाठपुरावा करत असावेत.तलावाकाठी फेरफटका मारतांना तिने त्याचा हात हातात घेत म्हटले ,अजून पंधरा वर्षांनी आपण आपल्या लग्नाची पन्नाशी गाठू . त्यानेही शांतपणे होकार दिला. मग त्याने मनातल्या मनात हिशोब मांडला, अन तो म्हणाला, तेव्हा तू पंचाहत्तर वर्षाची अन मी एक्यांशीचा, हो तर मग काय, ती सहज म्हणाली, अन तो म्हणाला, मी तुझी पंचाहत्तरवी करेन आणि तू माझ सहत्रचंद्र दर्शन कर. आणि ते दोघेही हसायला लागले. पण त्याचे डोळे उगीचच जरासे पाणवले. त्याला वाटून गेलं की तुझ तर ठीक आहे , पण मला गाठता येणार का हा पल्ला ? आणि आपली मुल करतील असे काही ? त्याचा मनात एका नंतर एक असे अनेक विचार येत गेले. नुसते प्रश्नच आणि सर्व अनुत्तरित.खूप दूर भविष्यातील भटकंती करून तो जेव्हा वर्तमानात आला तेव्हा तो इतकेच म्हणाला, चल जाऊ दे, आपण पुढच्या वर्षी युरोपला जाऊन सहत्रचंद्र दर्शन करून घेऊ आणि ते परत एकदा हसायला लागले , त्या वर्तमानातील क्षणांसाठी.
ह्या मानवीय मनाला स्वप्न पाहण्याचे किती घोर व्यसन लागलेले असते ना ? ह्या व्यसनापायी ते बरेचदा वर्तमानात जगायचे सोडून भविष्यातील स्वप्नाचे आयुष्य जगू लागते.वर्तमानातील जीवनाबद्दल ते बरेचदा उदासीन असत, एव्हाना भविष्यातील स्वप्नांमागे सारखं धावत राहत.अगदी बालपणापासून त्यावर तसे संस्कार झालेले असतात. लहान मुलांना विचारले जाते , की तुला काय ह्यायचे आहे ? आणि मग ते बालमन धावायला लागत, शाळा, कॉलेज , नोकरी, लग्न, मूल , घर , परदेशवाऱ्या ते थेट माझ सहत्रचंद्र केव्हा होणार ? वर्तमानात जगण्याचे आध्यत्म ह्या मनाला कधी शिवतच नाही .आपल्या जीवनातील दुःखांचे हे एक कारण तर नाही ना ? तामियात त्यांनी पाहिलेल्या एका स्वप्नांच्या निमित्ताने, मला पडलेला एक प्रश्न .