मी तेव्हा सतरा-अठरा वर्षांचा असेन. रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिर असावे. मी त्या शिबिरात महिनाभरासाठी वैद्यकीय विभागाचा निवासी प्रबंधक म्हणून गेलेलो होतो. माझ्यासारखेच अनेक शाखांमधून अनेक स्वयंसेवक वेगवेगळ्या विभागांचे प्रबंधक म्हणून तिथे आलेले होते. माझ्या तेव्हाच्या आठवणी धूसर आहेत त्यामुळे काही तपशील चुकू शकतात; पण कुणी थोबाडीत मारली होती आणि का, ते मी विसरलेलो नाही.
एका संध्याकाळी, कदाचित जेवणाच्या वेळी प्रबंधकांच्या गटाला वाढण्याचे काम असताना, आमच्यात काहीतरी थट्टा-मस्करी सुरू होती. तो माझ्या ओळखीचा नव्हता. वेगळ्या कोणत्या शाखेतला असावा आणि आमचे कधीच बोलणे झालेले नव्हते. त्याचे आडनाव चाबुकस्वार असल्याचे मला माहीत होते आणि अनेक जण, म्हणजे किमान पंधरा-वीस स्वयंसेवक, त्याला त्या आडनावाच्या अनुषंगाने घोडेस्वार असे काहीसे वेगळे संबोधून चिडवायचे आणि मग हसायचे. ते चिडवणे वाईट शब्द वापरून नव्हते; फक्त चाबुकस्वारच्या ऐवजी घोडेस्वार आले असे काहीतरी चिडवून खुदूखुदू हसणे असे काहीसे होते. ते मी त्या दिवशी प्रथमच ऐकले आणि मी पण सगळ्यांसोबत हसत होतो.
अचानक माझ्यासमोर एक स्वयंसेवक आला आणि त्याने मला जोरात गालावर सर्व शक्ती एकवटून थोबाडीत ठेवून दिली. मला खूप जोरात लागले होते. माझ्या कानालादेखील मार लागला होता आणि डोके सणकून हलले होते. एका सतरा-अठरा वर्षांच्या, शरीराने बळकट आणि व्यायाम करून बलवान झालेल्या तरुणाचा ठरवून केलेला वार जसा लागावा तसाच आणि तितक्याच तीव्रतेने तो वार होता. ज्याला चिडवले जात होते तोच हा युवक होता हे ओघाने मला कळलेलेच होते. ते वय असे होते की इतका जोरात लागलेला मारदेखील जोरात लागला आहे हे दाखवायचे नाही, इतका अहंकार माझ्यात होता. त्यामुळे मी रडलो नाही. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने फक्त पाहत राहिलो.
त्यानंतर तो काहीतरी बोलला आणि निघून गेला. ते मला तितकेसे आठवत नाही, कारण माझ्या डोक्यात झिणझिण्या येत होत्या आणि काही ऐकण्याच्या मनस्थितीत मी नसेनच. त्याच्या बोलण्याचा सारांश असा असावा की त्याने एकदा नाही सांगितले असताना कुणी चिडवले, तर काय होते हे आता लोकांना माहीत झाले आहे. यापुढे असे होणार नाही याची खबरदारी ज्याची त्याने घ्यायची आहे.
मी त्यावेळी सर्वात कमी ताकदीचा आणि शिडशिडीत मुलगा होतो. तिथे असलेल्या दहापेक्षा अधिक युवकांना न निवडता त्याने मला थोबाडीत लगावली होती. आज मागे वळून पाहताना मला वाटते की मी त्याला प्रत्युत्तर देऊ शकणार नाही याची त्याला जाणीव असावी.
तिथे जमलेले सगळे या कृत्यामुळे अचानक गप्प झाले होते. थोडा वेळ शांतता पसरली. मग सगळे गपगुमान पांगले आणि मी पण परत आपल्या झोपण्याच्या जागेवर आलो असेन. त्या घटनेबद्दल त्या शिबिरात नंतर कुणीच बोलले नाही. मला कुणी त्यावेळीदेखील काही विचारलेले स्मरणात नाही आणि नंतरही संपूर्ण शिबिरात या विषयावर कधी चर्चा कुणी काढली नाही. मी तर ती चर्चा काढणे शक्यच नव्हते, कारण तो माझ्या जाहीर अपमानाचा क्षण पुन्हा बोलण्यात काढणे म्हणजे जखम उकरण्यासारखेच होते.
मी त्याला ओळखत नव्हतो. त्याची थट्टा करण्यात माझा पुढाकार नव्हता. काही मुले काही बोलून हसत होती, त्यात त्या वेळेस मी पोचलो असताना मी पण त्या हसण्यात सामील होतो, इतकाच माझा गुन्हा होता. मला थोबाडीत लगावून त्याने जो पुरुषार्थ गाजवला होता, त्यात त्याचा उद्देश असा सफल झाला होता की त्याला चिडवल्यावर काय होते याचे उदाहरण त्याला ठेवता आले. मी तेव्हा अगदीच काडीपैलवान असल्याने मी उलटून काहीही करू शकणार नाही याची त्याला जाणीव असणारच. मला ओळखत नसतानाही त्याने मला हे उदाहरण ठेवण्यासाठी निवडले, असे मला आज वाटते.
त्या घटनेवर मी आज पस्तीस वर्षांनीदेखील लिहितो, याचाच अर्थ माझ्या आयुष्यात ती जखम कोरलेली आहे. त्या व्यक्तीला, त्या झापडीला, त्या जखमेला मी विसरू शकलेलो नाही, मिटवू शकलेलो नाही, हे मला समजते आहे.
माझी चूक होती का? असेलही कदाचित. पण माझ्यापेक्षा तिथे असलेल्या किमान दहा आणखी युवकांची चूक माझ्याहून जास्त असेल. मला जी शिक्षा मिळाली ती त्या चुकीसाठी रास्त होती का? त्या शिक्षा देणाऱ्यासाठी असेलही कदाचित; पण माझ्या मनात तो अन्याय होता. त्या वेळी त्या घटनेत त्याला मला थोबाडीत लगावता आले कारण तो तेव्हा ते करू शकत होता आणि त्याच्या परिणामात त्याला काही होणार नाही याची त्याला खात्री होती. कोणतीही पूर्वसूचना न देता मला मिळालेली ही झापड माझ्यासाठी सर्वथा अन्यायकारक होती.
त्या वेळेस माझ्या बाजूने कुणीच बोलले नव्हते. याचा अर्थ तिथे जमलेल्या गटाने आपली चूक झाली हे मान्य केले होते आणि गपगुमान तिथून पांगले होते. तिथे मला कळले होते की इथे आपली काळजी करणारे कुणी नाही, आपल्यासाठी बोलणारे कुणी नाही. मी माझ्या बरोबर आलेल्या इतर माझ्या शाखेतल्या कुणाला ही घटना सांगितली होती का, तेही मला आता आठवत नाही. मी जितक्या लवकर त्या वेळेला ती घटना विसरून काहीच झालेले नाही असे भासवू शकेन, तितके केले असेल.
पण अशा घटना आपण विसरून काहीच झालेले नव्हते असे खरेच ठरवू शकतो का? तेव्हा त्या शिबिरात ते मला जमले असे वाटले असेलही. पण ही घटना माझ्या आयुष्यावर कोरलेल्या जखमांमधली एक प्रमुख घटना होऊन राहणार आहे याची मला तेव्हा कल्पनादेखील नसेल.
वेगवेगळ्या शाखेतले स्वयंसेवक असल्याने शिबिर संपल्यावर सगळे आपापल्या विभागात जातात. त्यामुळे त्या चाबुकस्वार आडनावाच्या स्वयंसेवकाशी माझा आतापर्यंतच्या आयुष्यात पुन्हा कधी संपर्क आला नाही. तसा संपर्क जर आता आला तर मी त्याच्याशी कसा वागेन याची मला खात्री देता येत नाही. कदाचित मी काही बोलणारही नाही. कदाचित मी शांतपणे त्याला ते स्मरण करून देईन. पण एवढे नक्की की त्या क्षणाचा काटा अजूनही मनात कुठेतरी आहे.
तसे माझ्या आतापर्यंतच्या वागण्याकडे मी पाहिले, तर मी कदाचित त्या व्यक्तीशी इतरांशी वागतो त्याहीपेक्षा अधिक चांगला वागून त्याला लाजिरवाणे व्हावे असे काही करून प्रतिशोध घेईन असेही वाटते. तो युवक वाईट नव्हताच आणि नसेलही. पण ज्या वेळेस तुम्ही तुमच्याहून कमी शक्तिशाली आणि दुर्बल घटकाला फक्त तुमच्या शक्तीच्या जोरावर, आणि तुम्हाला त्या वेळेस कुणी काही म्हणणारे किंवा जाब विचारणारे नाही या एका सबबीवर, थोबाडीत लावू शकता, दाबू शकता, त्याला तुमचा चांगुलपणा नक्कीच म्हणता येणार नाही. मी तरी त्याला चांगले वागणे म्हणणार नाही. त्याला मी संधीसाधूपणा म्हणेन. तेव्हा त्याने मी चिडवणे सुरू केले आहे का, याचा विचारदेखील केला नव्हता. मी त्याच्या ओळखीचा नव्हतो हे त्याला माहीत नसावे असेही म्हणता येणार नाही. पण अंदाज लावून, काही लोक चिडवून हसत आहेत त्यातल्या सर्वात किडूक व्यक्तीला निवडून थोबाडीत लावणे हे त्याला सहज जमले होते.
या घटनेचा परिणाम माझ्यावर असा झाला की मी शिबिरातून आल्यानंतर शंकर नगरच्या फ्रेंड्स कॉलनीतली फिटनेस इंडिया नावाची जिम शोधून काढली आणि पुढची तीन वर्षे पॉवरलिफ्टिंग शिकण्यात आणि तयारी करण्यात घालवली. त्यानंतर मला कधी कुणी थोबाडीत काय, कशाही प्रकारे हात लावू शकलेले नाही.
पण आज वाटते, त्या एका झापडीने मला शरीराने मजबूत व्हायला भाग पाडले; पण त्याहून मोठा धडा दुसरा होता. एखाद्याची थट्टा करणे चुकीचेच, पण चुकीला उत्तर म्हणून दुर्बल व्यक्तीवर हात उगारणे हा न्याय नव्हे. आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे अन्याय घडताना गप्प उभे राहणे हेही त्या अन्यायाचा भाग असते.
त्या दिवशी मला थप्पड एका व्यक्तीने मारली होती; पण ती जखम गटाच्या शांततेने अधिक खोल केली