आपण दोन्ही मुद्दे लक्षात घेऊन चर्चा करू या–
बाळसे म्हणूच शकतो.आज प्रत्येकाला व्यक्त व्हावं असं वाटणं ही एक प्रकारे लोकशाही चा विजयच आहे मग तो आपल्या भावना लेखातून मांडत असो अथवा कवितेतून.फार पूर्वी आपल्या देशात डॉक्टर इंजिनिअर यांची कमी होती आता गल्लीबोळात पण आहे मग कवींवरच का आक्षेप ?कुणीतरी म्हणालं आजकाल शेव पाडल्यासारख्या कविता पाडतात.पण शेव तुम्ही तर चवीने खातातच नाआणि चांगली नाही झाली तर टीका टीप्पणी पण करतात.तसंच कविता पण वाचा आणि नाही आवडली तर स्पष्टपणे लिहा आणि चूका दाखवून कवींना प्रोत्साहन पण द्या. आपल्याकडे एक म्हण आहे पहा ‘ निंदकाचे घर असावे शेजारी ‘.जर कवितांवर टीका झाली तर कवी सुद्धा आपलं साहित्य चांगलं लिहीण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातूनच चांगलं साहित्य जन्माला येईल.कुणी जन्माला आल्यापासून बोलायला वा चालायला लागतो नाही.त्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात आईवडिल पण सोबत करतात.तेव्हा त्याची प्रगती होते.कुठलाही कवी हा आईच्या पोटातून बाहेर येताना कविता आणत नाही.खरं तर कविता लिहीण्यासाठी संवेदनशीलता असणं आवश्यक आहे. आजूबाजूचे निरीक्षण करूनच त्यांच्या मनात काही कल्पना येऊ लागतात किंवा सामाजिक परिस्थीतीतून काही कविता परखडपणे लिहील्या जातात.तरल कविता या भावनिक असतात .त्या सृष्टीतून नात्यातून सुंदर भावनांचा गोफ विणणा-या असतात.मग असे काव्य आतूनच स्फुरत असते.आज लोकांना खूप मोठमोठे मंच कवितांसाठी उपलब्ध आहेत.पूर्वी असं नव्हतं म्हणून कवींची संख्या मोजकीच होती.कदाचित आपण असंही म्हणू शकतो कलागुणांना पूर्वी घरातून प्रोत्साहन कमीच मिळायचे.आता असं राहिलं नाही. त्यामुळे बाळसं चढत आहे हे खरयं.आता ते बाळसं धरणं धोक्याचं तर नाही ना याचाही विचार करायला हवा.लहान मुलांना जास्त बाळसं चढत असलं तर ते निरोगी रहात नाही.त्याच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दिलं तरच ते निरोगी राहू शकतं . आजकाल भेसळयुक्त खानपान असल्याने जास्त गुटगुटीत बाळसं बरं नव्हे. त्याला व्यवस्थित जीवनसत्व जेवणातून गेलं पाहिजे तरच ते निरोगी रहातं.
कवितांचं पण तसच आहे.कविता जर चांगल्या असतील तरचं त्या मोहवतात.नुसतं र ला र आणि ट ला ट जोडून कविता होतं नसते. त्यात भाषासौंदर्य ,अलंकाराचा वापर यमक वगैरे गोष्टी विचारात घेतल्यास कविता मनाला भावतात. आज दर्जा खालावला आहे हे खरं असलं तरी कवी लोक आता डोळसपणे समाजातील घटनांकडे पाहू लागले हेही तितकच खरं.आपण
त्यांची तुलना साहिल,किंवा गुलजार यांच्याशी करू शकत नाही ना सुरेश भट ,इलाही शी करु शकतो.परंतु आजकाल गद्यात्मक कविता जास्त होत आहेत हे बरं नव्हे.पसरट कविता कधीच कुणाला आवडत नाही हा रोग बळावला असून आपण याला सूज म्हणू शकतो.कवितेतील काव्य तत्व कमी होत आहे.आम्ही परखड आणि स्पष्ट विचार मांडतो म्हणून आम्हाला हवी तशी कविता करण्याचा अधिकार आहे असं कुणीही समजू नये.खूप संमेलनात मी पहाते केवळ खालच्या स्तरावर उतरून कविता केल्या जातात. कवितेसाठी अनेक विषय आहेत .केवळ मोठमोठ्या नेत्यांवर कविता करून चालणार नाही.काव्याचा दर्जा पण उंचावला पाहिजे
तरच कविता लोकांना भावतील.कधी कधी उगाच वाहवा करून प्रशंसा केली जाते ती सोडून कविता कशी असायला हवी हे पण कवींना सांगायला हवं.चुकलं तर कान पकडायलाच हवे.तरच कवितांचे स्तर उंचावेल आणि आपण त्याला बाळसं म्हणू शकतो .कारण बाळसं हा सकारात्मक अर्थ दर्शवतो आणि सूज हा शब्द कवितांचा नकारात्मक अर्थ दर्शवतो.
फार पूर्वीपासून बरेच जण कविता करतात. त्या कविता फार फार तर पेपर मध्ये छापून यायच्या. ओव्या अभंगाच्या माध्यमातून कधीतरी एकमेकांना सांगितले जायचे.
आता डिजिटल युगात कवी आणि कवीयत्रींचे पेव आले
व्हाट्सअप्प वर निरनिराळे समूह आणि त्यावर विषय देऊन रोज कविता लिहायला सांगतात आणि सन्मानपत्र ही देतात.त्यामुळे लिखाण कसे ही ओढूनताणून केले जाते.
माझ्या मते कविता ही अंतर्मनातून लिहिली जायला हवी.आजकाल जो उठतो तो वाट्टेल ते आणि वाट्टेल तसे लिहितो. Chatgpt आणि AI ची मदत घेऊन जसेच्या तसे लिहायची ही प्रवृत्ती खूप वाढलीय. ह्यामुळे सकस लिखाण होत नाही तर आपल्या बुद्धीचा ऱ्हास होऊ लागलाय.काही ठिकाणी ऑफलाईन कविसंमेलन होतात आणि तिथे पैसे घेऊन निरनिराळे पुरस्कार दिले जात आहेत. जर तुम्ही ह्या सगळ्यांच्या कविता चेक केल्या तर तुमच्या लक्षात येईल की यमक आणि आशय गायब असताना ही प्रसिद्धी मिळतेय काही व्हाट्सअप्प समूहावर तर लिखाणाचे स्तर अत्यन्त खराब असून ही केवळ तो समूह पहिला यावा म्हणून चुकीच्या कवितांना बरोबर दिले जाते आणि त्यामुळे लिहिणार्यांना चूक झालेली लक्षातच येत नाही आणि असे उदंड कवी कवियत्री वाढत चाललेत.
हे कुठेतरी थांबायला हवं असही वाटतं!