मला आवडणारा चित्रपट-आनंद
आनंद चित्रपट रिलीज झाला त्यावेळी मी फक्त बारा वर्षांची होते.पण त्या वयात तो चित्रपट मनावर खोल परिणाम करून गेला.१२मार्च १९७१ साली रिलीज झाला.
संचालक -हृषिकेश मुखर्जी
संगीतकार – सलील चौधरी
पटकथा -हृषिकेश मुखर्जी,गुलजार,बिमल दत्ता
नायक -राजेश खन्ना, अमिताभ बच्चन व. नायिका सुमित्रा संन्याल .
या अजरामर चित्रपटाची पटकथा हृषिकेश मुखर्जी आणि गुलजार यांनी लिहीली होती.संवाद गुलजार यांचे होते.
कथा–आनंद सैगल (राजेश खन्ना)हा एका दुर्धर
आजाराने ग्रस्त असतो.काही महिन्यातच आपण मरण पावणार आहे हे त्याला माहित असते!
मृत्यू अटळ असतानाही तो प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा निर्णय घेतो आणि उपचारासाठी मुंबईत येतो.तिथे त्याची भेट डॉ.बॅनर्जी(अमिताभ बच्चन)यांच्याशी होते ,जो एक जीवनातील दुःख आणि गरिबी पाहून निराश झालेला गंभीर प्रवृत्तीचा डॉक्टर असतो.
परंतु आनंदचा हसरा आणि सकारात्मक स्वभाव भास्करच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकतो.या चित्रपटात आनंदच्या आयुष्यातील शेवटचे काही दिवस दाखवले आहेत तिथे तो जे जे त्याला भेटतात त्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद भरतो.त्याची ' बाबूमोशाय ' (डॉ.भास्कर )सोबतची मैत्री आणि इशाभाई (जॉनी वॉकर)आणि डॉ.कुळकर्णी
(रमेश देव)यांच्या सोबतच्या हलक्या फुलक्या क्षणांची पटकथा या चित्रपटाला भावनिक आणि प्रेरणादायी बनवते.त्याचप्रमाणे ललिता पवार,सीमा आणि सुमित्रा संन्याल यांसारख्या
महिला कलाकारांनी भावनिकदृष्ट्या चित्रपट सशक्त केला आहे.
या चित्रपटाचा क्लायमॅक्स खूप संवेदनशील आहे.मला हा चित्रपट यासाठी आवडतो.की त्या काळात कॅंसर झाला म्हणजे सर्व काही संपलं.कारण त्यावर इलाज नव्हता.या चित्रपटाचे संवाद मनावर बिंबून जातात.
आनंदचा शेवट जवळ आला असतो.ते पाहून अतिशय दु:खी आणि हतबल झालेला भास्कर शेवटी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.तो डॉक्टरला आणायला जातो.तेव्हांच आनंद टेपरेकॉर्डर वर आपला आवाज टेप करायला सांगतो.त्यातले काही हृदयस्पर्शी वाक्य–
' बाबुमोशाय ,जिंदगी बडी होनी चाहिए,लंबी नहीं।
जिंदगी और मौत तो उपरवाले के हाथ है,
जहाँपनाह !उसे ना आप बदल सकते हैं ना मैं।
हम सब रंगमंच की कठपुतलियाँ हैं,
जिनकी डोर उपरवाले की उँगलियों में बँधी हैं।'
याशिवाय या चित्रपटात शेवटचा संवाद ,
'आनंद मरा नहीं ..आनंद मरते नहीं।'
संपूर्ण चित्रपट या विषयावर आधारित असून जीवनाचे सार या वाक्यांमध्ये सामावले आहे.
चित्रपटातील गाणी अतिशय संवेदनशील आहेत.दार्शनिक आहेत . आनंद हा चित्रपट एक अजरामर कलाकृती असून सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीतील एक मानाचे पान होय .राजेश खन्ना यांनी आनंदची भूमिका नुसती साकारली नाही तर ती जगली आहे !