ग्रीक तत्वज्ञ ऑरिस्टॉटल आपल्या 'पॉलिटिक्स' या ग्रंथात म्हणतो – ” व्हॉट इज कॉमन टु द ग्रेटेस्ट नंबर हॅज द लीस्ट केअर बिस्टोव्ड अपॉन इट!”
आणि ” फॉर ऑल मेन हॅव अ ग्रेटर रिगार्ड फॉर व्हॉट इज देअर ओन दॅन फॉर व्हॉट दे पझेस इन कॉमन विथ अदर्स ”
ही दोन वाक्यं वेगवेगळी असली तरी त्यांचा मतितार्थ सारखाच आणि हे एकाच विशिष्ट संदर्भात अभिप्रेत आहे.
ऑरिस्टॉटल या वाक्यांचा वापर प्रचलित राज्यपद्धतीपैकी कुठली योग्य हे सांगण्यासाठी करतो. आणि त्यातून लोकशाही राज्यपद्धतीमध्ये आढळणारे कच्चे दुवे समोर आणण्याचा प्रयत्न करतो किंवा तसे ठामपणे सांगतो कारण त्याला ते तसेच योग्य वाटते.
आता या वाक्यांचा वरवर अर्थ समजून घ्यायचा तर डोळ्यासमोर आपल्या सर्व सार्वजनिक वस्तू व प्रणालींचे चित्र आणा म्हणजे लगेच कळेल.
आपण घराबाहेर पडल्यापासून आधी पाय ठेवतो ते सार्वजनिक रस्त्यांवर जिथे पानमसाल्याच्या रिकाम्या पुडीपासून, पिचकारलेल्या खर्ऱ्यापासून ते मोकाट सोडलेल्या जनावरांपर्यंत सर्व काही नजरेस पडते.
तीच किंवा तशीच काहीशी अवस्था रेल्वे, रेल्वे स्थानक, बस, बसस्थानक,(विमाने व विमानतळ mi बघितला नाही त्यामुळे तुमचं तुम्ही आठवा) शाळा, महाविद्यालये, दवाखाने, कार्यालये, स्वच्छतागृहे (?) इत्यादींची आहे किंबहुना असते.
सारांश ज्या ज्या वस्तू, प्रणाली अथवा व्यक्तींवर कोणा एकाचा अधिकार नसतो, जी अनेकांमध्ये वाटल्या गेली असतात त्यांना कोणीही वाली असत नाही. प्रत्येक जण तिथे लचके तोडण्यास, हात मागे पुसून नामानिराळे होण्यासच आलेला असतो.
वरच्या उदाहरणांत वस्तू व प्रणालींबद्दल कल्पना आली असावी. परंतु व्यक्ती म्हटल्यावर काहींच्या डोक्यात महाभारतातली “द्रौपदी” सुद्धा डोकावली असेलच.
परंतु आजचा लेखनप्रपंच “लोकशाही चांगली का वाईट ?” अथवा “द्रौपदीचे आयुष्य” यांच्याशी संबंधित नाही, त्यांचा काडीमात्र संबंध नाही.
तर नमनाला घडाभरच नाही तर पिंप भरून तेल सांडून रस्ता गुळगुळीत झाल्यानंतर आपल्या आजच्या विषयाची खर गाडी रुळावर माफ करा रस्त्यावर आणूया.
एका सुशिक्षित व्यक्तीच्या तोंडून एक वाक्य ऐकण्यात आलं होतं – “वडील माझे एकट्याचेच आहेत का ? मी एकट्यानेच त्यांना का सांभाळावं ?”
एकदम बिग बींचा बागबान आठवून गेला.
आणि बागबान मधली पार्श्वभूमी बघता हे फक्त मोठ्या शहरांमध्येच होतं असा गैरसमज बाळगून शहामृग होऊन वाळूत तोंड खुपसण्याचा अतिशहाणपणा कोणीही करू नये.
वडिलोपार्जित घराच्या वा शेतीच्या हिस्स्यातली सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन हातून जाऊ न देणारे मात्र आई वडील जे सार्वजनिक मालकीचे – अर्थात भावंडांमध्ये समान वाटलेले (?) असतात – त्यांना तेलकट हातातून वस्तू निसटावी तसे आपसूक हातावेगळे करतात.
लहानपणीच्या भातुकलीच्या खेळामध्ये एखादं मूल चांगली भांडी आणि जास्त खाऊ आपल्या वाटणीलाच हवा म्हणून आटापिटा करायचं, रडायचं, ओरडायचं, हातपाय आपटायचं. आता तेच मोठ्या माणसांमध्ये शहरे, खेडी सर्वत्र दिसू लागले आहे.
आईने कधी “तुला मीच का सांभाळू ? तू माझ्या एकटीचेच मूल आहेस का ?” असा प्रश्न केलेला कोणाच्या तरी स्मरणात असेल का ? तीच गोष्ट वडिलांची. पण त्याच आई-वडिलांचा आज मात्र धोब्याचा कुत्रा झालेला आहे.
आपल्या घरच्या ज्येष्ठ माणसाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ वृद्धाश्रमात जेवण वाढत असताना माझी एक संवेदनशील मैत्रीण डोळ्यातले अश्रू ताटात पडू नयेत म्हणून दोन-तीनदा बाहेर आली.
आता आई वडिलांच्या पश्चात वाटणीसाठी भांडण गोंधळ घालून मृत्यू नंतर ची शांतता भंग करणारे महाभाग आपल्याच आजूबाजूला आहेत हे त्या बिचारीला कोण अन् कसे सांगणार ?
#३०दिवसात३०
#सुरपाखरू
#प्रयोग२०२६