वृद्धाश्रम
हात पायात ताकद आहे तोवर पाय पुढे टाकावे,
स्वाभिमान जपून आपले दिवस आपणच काढावे.
तिथेही मिळतील सोबती, माझ्याच वयाचे जुने,
कमी होणार नाही काही, विसरून जाऊ जे होते उणे.
वृद्धाश्रम म्हंटले अंगावर काटा येतो हो ना! एक खास्ट सून, तिरकस वागणारा मुलगा आणि पदोपदी घरात होणारा, अपमान असेच चित्र डोळ्यासमोर येतात. बरोबर ना! पण कदाचित या लेखांमध्ये तेच पारंपारिक विचार खोडायचे आहेत.
काही लोक आपले संसारिक पारंपारिक भाषेत सांगायचे झाले तर “गृहस्थाश्रमाचे” सर्व कर्तव्य संपून, नव्याने जगात नव्यादृष्टीने, नव्या विश्वात प्रवेश करावा असे वाटते. पुन्हा तेच पारंपारिक भाषेत सांगायचे झाले तर “वानप्रस्थाश्रमात” जावे असे वाटते.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चार आश्रम दिल्या गेल्या आहेत. एक ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम शेवटचे संन्याश्रम. यावर आपण सविस्तर चर्चा करूया नंतर च्या लेखात.
थोडक्यात काय, वृद्ध स्वतःहून वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतात. त्यामागे त्यांचे आपापले कारण आणि विचारसरणी आहे. जसे मुला सुनांचा संसार सुरू झालाय तो त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करू द्यावे, मध्ये आपली लुडबुड नको. तुम्हाला फक्त मुलगीच असते मग जावयाच्या घरी जाऊन रहावे की एकटेच घरी रहावे, या दोन्ही पर्यायांपैकी ते वृद्धाश्रम हा पर्याय निवडतात. कुणाला वाटते आतापर्यंतच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण सामाजिक ऋण फेडावे आणि कुठल्यातरी सामाजिक कार्याला स्वतःला झोकून द्यावे. कोणाचे जोडीदार सोडून जातात आणि त्यांच्या आयुष्यातली ती पोकळीक न भरणारी असते, त्यासाठी उरलेले आयुष्य झुरत बसण्यापेक्षा आपल्या समवयस्कर कदाचित काही समदुःखी ही तेथे मिळतील त्यांच्या बरोबर राहावे.
मान्य हा निर्णय त्यांना फार कठीण जातो. ज्या मुलांना लहानपणापासून मोठा होत पर्यंत पाहिले त्यांना, आता नातवंडांना म्हणजेच “दुधावरच्या साईला” सोडणे सोपे नसते. पण ते हा निर्णय स्वतःहून घेतात कोणी त्यांना जोर जबरदस्ती केलेली नसते हे येथे उल्लेखनीय!
इथे आल्यानंतर त्यांची दुसरी पारी सुरू होते काही दिवस खरच प्रत्येकाला जड जातं, पण हळूहळू तेथील लोकांशी बोलून ओळखी होऊन, त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती घेऊन, त्यात स्वतःला जोडून घेतात. मग ते कुठल्या संस्थेचा उपक्रम चालवतात वा स्वतः विचार केलेल्या कामांमध्ये गुंतून दुसऱ्यांनाही त्यात जोडतात. सारा दिवस यातच निघून जातो, आणि मग घरच्यांची आठवण येणे थोडेफार कमी होत जाते. कुणाला ते पटतं तर कोणी न पटल्यामुळे तसेच दिवसभर पडून राहतात, वा कुणाला वाचण्यात रस असतो पण जीवनाच्या धकाधकी मध्ये ते राहून जातं मग ते त्यांच्या “wish list” मधील पुस्तके वाचून घेतात. कुणाला सिनेमा पाहायला आवडतं त्यामुळे ते राहिलेले सिनेमे बघत आपला वेळ मजेत घालवतात. म्हणजेच काय आपल्या आयुष्यातल्या दुसऱ्या पारी मध्ये उरलेल्या इच्छा पूर्ण करून घेतात.
दिवसभर सर्व आपापले कामे आटोपून सायंकाळी चहाला भेटतात. दिवसभराच्या अनुभवात रांगतात. कोणी शारीरिक दृष्ट्या तरतरीत असेल तर त्यांना आवडत्या मैदानी खेळात ते रमतात. तर कोणी बौद्धिक खेळत आपला हात आजमावतात. तर कोणी प्रोत्साहित करण्यासाठी टाळ्या वाजवतात. हरणारा खेळाडू फिल्मी स्टाईल मध्ये 'आज हरलो तर काय बघ उद्या तुला हरवतोच की नाही” असे संवाद चालतात, आणि प्रेक्षक बसलेल्यांमध्ये हसून हसून मजा घेतात.
कधी कधी त्यांच्या घरचे त्यांना भेटायला येतात. सोबतच तहान भूक लाडू घेऊन जातात, मग काय त्यावर साव मारण्याची तर एक होडच असते. त्यात त्यांना त्यांचे लहानपण पण आठवतं.
हे लोक आर्थिकदृष्ट्या पण सक्षम असतात कोणाला पेन्शन येते तर कोणाच्या गुंतवणुकीवर भागते. त्यामुळे आपण अश्रित आहोत हा न्यूनगंड पण त्यांच्यामध्ये नसतो. आणि तसे नसलेही ते काहीतरी संस्थेद्वारे काम करून पैसे मिळवता. त्यामुळे तो प्रश्नच उरत नाही.
एकंदरीतच काय सगळे खुश असतात, पण खोलवर कुठेतरी मागे सोडून आलेल्या परिवारात गुंतलेले असतातच.
असो कसा वाटला हा लेख नक्की कळवा. आणि काही सुधारणा सुचवायच्या असतील तर त्या नक्की सुचवा. मी प्रयत्न करेल त्या सुधारण्याच्या.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६