इंग्रजीमध्ये एक म्हण आहे – ‘फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन’ म्हणजे काय तर कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत आपली होणारी पहिली ओळख आणि त्या ओळखीत त्या व्यक्तीच्या दिसण्याबद्दल, वागण्या-बोलण्या-उठण्या-बसण्याबद्दल आपलं जे मत, पूर्वग्रह, काही वेळेला अढी निर्माण होते ते सहसा बदलत नाही किंवा आपण ते बदलू देत नाही, ते बदलण्याच्या तयारीत आपण नसतो असे म्हटले तर जास्त योग्य ठरेल. अगदी असेच विरुद्ध दिशेला त्या समोरच्या व्यक्तीचे आपल्याबद्दल असते.
भविष्यात वेळोवेळी आपण एकमेकांसमोर येतो, वेगवेगळे प्रसंग पार पाडतो किंवा झेलतो, परंतु क्वचित कधीतरी आपले हे मत आणि त्याचे अथवा तिचे ते मत बदलते.
पण खरंच व्यक्ती एका भेटीत, एका ओळखीत कळते का? मनुष्याची शरीररचना जशी इतर सर्व जीवांपेक्षा गुंतगुंतीची आहे त्यापेक्षाही जास्त गुंतगुतीचं मानवी मन असावं. आज कोण स्वतः बद्दल शाश्वती देऊ शकेल की ते स्वतः ला पूर्णपणे ओळखतात अन् येणाऱ्या सर्व प्रसंगामध्ये ते एका विशिष्ट पद्धतीने वागतील, बोलतील, व्यक्त होतील. आणि समजा काही महान व्यक्तींनी तशी शाश्वती दिलीही तरीही त्यावर विश्वास कोणी, कसा अन् किती ठेवावा?
बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला प्रथमतः भेटतो तेव्हा आपण खूप चांगल्या मानसिकतेत असू अथवा ती व्यक्ती सुद्धा खूप चांगल्या मानसिकतेत असेल याची काय खात्री? अनेक माणसांच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात अन् प्रत्येकालाच भावना वेगवेगळ्या कप्प्यामध्ये साठवता येत नाहीत. भावना कदाचित द्रव पदार्थ असाव्यात ज्यामुळे त्या सहजी सांडत किंवा वाहत जातात असं मला उगाच वाटून जातं. मग अशा द्रव पदार्थ असणाऱ्या भावनांमधून व्यक्त होणाऱ्या पहिल्या प्रतिमेला आपण कितपत गांभीर्याने घ्यावं याला काही एक मर्यादा असली पाहिजे.
आता त्याच इंग्रजीत अजून एक म्हण आहे – ‘रीडिंग बिटविन द लाइन्स’ – शब्दशः अर्थ घ्यायला जावं तर ओळींमधून वाचणे. म्हणजे शब्दांच्या वरवरच्या अर्थामध्ये न अडकता त्यात दडलेला अर्थ किंवा अभिप्रेत संदेश लक्षात घ्यावा. बऱ्याचदा आपण शब्दांमध्ये निरर्थक अडकतो अन् त्यावरच मंथन करत बसतो. बरीच लोकं बोलण्यात फटकळ असतात. त्यांना गोड, मिठास बोलता येत नाही अन् त्यांना तसे प्रयत्न करण्याची इच्छा निर्माण होत नाही किंवा आवश्यकता ही भासत नाही. आणि अशातलेच काही जण काही वेळेला खूप मोलाच्या गोष्टी सांगून, शिकवून जातात. तेव्हा जर आपण त्यांच्या काटेरी शब्दांनी आपल्या कोमल मनाला झालेल्या जखमा कुरवाळत बसलो तर स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणून मग कामाचं तेवढं घ्यावं अन् बाकी गंगेला (किंवा आपापल्या गावातल्या नदीला, नाल्याला) अर्पण करावं.
मला तर आजवर जे मान्यवर शिक्षक लाभले त्यातले उत्तमाहून उत्तम शिक्षक कधीच गोड, कानाला किंवा मनाला बरं वाटावं असं – मी जोवर शाळेत शिकत होते तोवर तरी चुकूनही बोलले नाही. पण खूप काळ गेल्यावर, खूप वेळ घेतल्यावर लक्षात आलं – आपल्या भल्यासाठी, आपण चुकीच्या मार्गाने जाऊ नये या कळकळीतून त्यांच्या तोंडून जिव्हारी लागेल असे शब्द निघत असतात, अन् फार गोड, छान छान बोलणाऱ्याला आपली विशेष काळजी नसते, ते आपल्याला फार शिस्त लावत नाहीतच, पण तशीच वेळ आली तर आपल्याला जबाबदार ठरवून मोकळे होतात. इंग्रजीतच सांगायचं झालं तर – ‘दे थ्रो अस अन्डर द बस’. ते खुशाल आपल्याला गाडीखाली ढकलून मोकळे होतात. अर्थात सरसकट सगळे छान बोलणारे असेच असतात असं अजिबात नाही. अन् सगळे फटकळ बोलणारे मनाने चांगलेच असतील असेही नाही. प्रत्येक गोष्टीला अपवाद असणारच.
थोडक्यात काय तर पहिल्या भेटीत कोणाविषयी एक ठराविक प्रतिमा बनवून न घेता त्याला/तिला ओळखण्यासाठी आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे. मुद्दा आपल्या भल्याचा आहे – दुसऱ्याच्या नाही.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६