डॉ मनोहर साल्पेकर हे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या बॅच चे विद्यार्थी होते आणि नागपुरातील पहिले बालरोग तज्ञ होते. ते माझे वैद्यक शास्त्रातील पहिले खरे संपूर्ण शिक्षक म्हणावे , असे होते, पण गुरुशिष्य नात्याच्यावर आमच्यात एक मित्रत्वाचे घट्ट नाते होते . ते माझ्यापेक्षा जवळपास २८ वर्षांनी मोठे होते आणि खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे ते संस्थापक सदस्य व पॅट्रॉन होते . मी सुद्धा तेथे १९९१ ते १९९५ ह्या कालावधीत मुक्कामी मानद वैद्यकीय सेवा प्रकल्प प्रमुख होतो, पण त्यांनीच तेथे माझे खरे पालकत्व स्वीकारले होते. वैद्यक शास्त्रातील असंख्य गोष्टी त्यांनी मला शिकवल्या आणि मी त्या शिकलो. अगदी रोगनिदान कसे करायचे, त्याचे प्रिस्क्रिप्शनवर लेखन कसे करावे, रुग्णांशी संवाद कसा साधावा, कमी औषधात कसा उपचार करावा , अश्या विविध गोष्टी मी तेथे शिकलो.ह्याचा पुढेही मला आजीवन खूप उपयोग झाला. मी त्यांच्या रामदासपेठ येथील घरी अधून मधून जात असे आणि त्यात आमचे हे नाते अधिक घट्ट होत गेले. दुपारी त्यांचा घरी गेलो की ते मला चहा किंवा तत्सम गोष्टी स्वतः करून देत असत.माझ्यासाठी ते एक रोल मॉडेलच होते,कारण वयाचे अंतर सोडले तर आमच्यात तसे खूप बाबतीत साम्य होते. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा आणि माझा दृष्टिकोनही जवळपास सारखाच होता .
अश्याच एका दुपारी आमच्या गप्पा रंगात आल्या असता , त्यांनी मला त्यांचे जीवनातील एक बोचरे शल्य सांगितले . तेव्हा ते म्हणाले की , आपण डॉक्टर म्हणून आजन्म सेवा देत असतो,आणि त्यासाठी आपली बांधिलकीही असते , पण एका मर्यादेनंतर आपण आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करू नये. कारण आपल्या ह्या वैद्यकीय प्रवासात रुग्णसेवेला प्राधान्य देता देता , आपल्याच स्वतःच्या मुलांना, पत्नीला किंवा अन्य परिवाराला आपण खूप त्रास देत असतो,तो आपण जरूर टाळावा , असे सांगत असता त्यांचे पाणवलेले डोळे त्यांच्या पत्नीच्या आठवणीत कसे गेले , हे मी आजही अनुभवत आहे . कोणाही डॉक्टर च्या जीवनात ही तारेवरची कसरत किती कठीण असते, हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, असेच म्हणावे लागेल.