सप्टेंबर २०२५ मधे मी आणि माझी मामेबहीण सहकुटुंब लेह लडाख च्या भ्रमंती वर निघालो होतो. आमच्या प्रवासाच्या चवथा दिवशी आम्ही तेथील पहाडी वातावरणात एव्हाना छान रुळलो होतो.आम्ही नुब्रा वैलीतून पँगोंग सो तलावाकडे चाललो होतो .हा पूर्ण मार्ग अप्रतिम सुंदर आणि मनाला अचंबित करणारा आहे. पँगोंग सो हे जितके सुंदर , तितकाच , त्याकडे पोहचणारा हा रस्ता सुद्धा अतिशय सुरेख आहे.येथील उंचच उंच पर्वतांचे सौंदर्य कोणतीही झाडी नसतांना सुद्धा त्यावरील पांढऱ्या शुभ्र बर्फामुळे मनाला भुरळ घालते. श्याक नदीला बाजूला सारून नुब्रा वैलीतून सरळ पँगोंग सो कडे जाणाऱ्या ह्या रस्त्यावर वर्दळ थोडी कमी असते , असे आम्हाला सांगितले होते. बहुचर्चित प्रसिद्ध खारडुंगला पास ची गर्दी त्यामुळे टाळता येते .
ह्या प्रवासात आमचा पहिला थांबा “ वारी ला “ पास होता.समुद्र सपाटीपासून १७,४२९ फूट उंचीवर असलेला आणि रस्त्याने जोडलेला हा जगातील १३ वा उंचीवरचा पास आहे .येथे ताजा बर्फ सतत पडत असतो आणि त्यात वयोमानाचे भान विसरून सर्व प्रवासी आपापल्या पद्धतीने खेळत असतात.येथून पुढे निघालो की थोड्या अंतरावर १७,६८८ फूट उंचीवर “ चांग ला “ पास आहे आणि हा जगातील दुसरा , रस्त्याने जोडलेला सर्वात उंच पर्वतीय पास आहे .येथील पर्वतीय वातावरण कधी आणि कसे धोकादायक बनेल , हे सांगता येत नाही, त्यामुळे येथे कोणीही अर्धा तासाच्या वर थांबू नये,असा सल्ला दिला जातो . येथून जगप्रसिद्ध पँगोंग सो तलाव फक्त एका तासाच्या अंतरावर आहे.
येथे आम्ही पोहोचलो तेव्हा , तेथे पुण्याकडील एक समूह आला होता , त्यांचा गोंधळ पाहता आम्ही नागपूरकरांना आपण महाराष्ट्रात आलो आहोत , असेच वाटायला लागले. त्या समूहापैकी एका व्यक्तीचा त्यादिवशी वाढदिवस होता, आणि पुणेरी पद्धतीने , आपल्याच मस्तीत , गोंधळ घालत, तो साजरा होत होता. तेथे त्या ठिकाणाबाबतची माहिती लिहलेला बोर्ड , एका चौथऱ्यावर उभा केला होता आणि तेथून त्या स्योक वैली चे खूप सुंदर दर्शन होत होते . तेथे सर्वांना समूह फोटो काढायला तीच सर्वात जास्त सोयीची जागा होती आणि तेथे सुद्धा “ येथे अर्धा तासाच्यावर कोणी थांबू नये , एक्यूट माउंटेन सिकनेस चा धोका संभाव्य आहे “ असे स्पष्ट पणे लिहिले होते. परंतु हा समूह त्याच जागी केक कापून वाढदिवसाचा सविस्तर कार्यक्रम करीत होते .थोडा वेळ आम्ही सुद्धा ही गंमत पाहत होतो,पण जसा जसा वेळ होत होता,तसा तसा आमचाही संयम सुटत गेला आणि त्या गमतींचा आता किळस वाटायला लागला. आम्ही त्याना थोड आटोपते घेण्याबाबत विनंती केली. सार्वजनिक ठिकाणी असा गोंधळ घालीत वाढदिवस साजरा करण्याचे काही औचित्य वाटत नव्हते. पण तो समूह काहीच ऐकत नव्हता, शेवटी माझ्या मामेबहिणीने त्याना त्याबाबत खडसावले.आणि पाहता पाहता एकंदर वातावरण तापायला लागले,पहिले मराठीत, नंतर इंग्रजी माध्यमात त्यांचे संवाद सुरू झाले.शेवटी त्या समूहाला आपली चूक समजली आणि त्यांनी काढता पाय घेतला.
मला माझ्या बहिणीच्या ह्या वागण्याचे खूप आश्चर्य वाटत होते , कारण ती खूप मितभाषी आहे आणि ती स्वतः खूप श्रीमंत असून , सदैव उच्चभ्रू समाजात वावरत असते . पुढे काही वेळानंतर मला राहवले नाही आणि मी तिला तिच्या ह्या रागावण्याबाबत विचारले, तेव्हा तिने खूप समर्पक उत्तर मिश्किलपणे दिलं, जे नेहमी माझ्या लक्षात राहील. ती म्हणाली, समाजात जेव्हाही एखादी अप्रिय , अयोग्य घटना घडत असते ,तेव्हा आपण मूक दर्शक होता कामा नये. समाजजीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य कोणाला तरी आपल्या खांद्यावर घ्यावेच लागते , नाहीतर समाजात असे गोंधळ वाढतच राहतील , असे आपण स्वतः केले तर आपल्या मनाला एक गोष्ट नक्की मिळते, ती म्हणजे “ सुकून “ आणि आम्ही सर्व तिच्या ह्या उत्तरानंतर खळखळून हसायला लागलो.