“आई सारखे परमदैवत जगतावर नाही
म्हणून श्रीकाराचे नंतर
शिकणे आ आई..”
हे गाणं माझ्या आईने टीव्हीवर यूट्यूबवर लावले होते आणि आज अचानक मला तीस वर्षांपूर्वीची राकेशच्या आईची आत्मक्लेषाची शिक्षा आठवली.
“धन्य तो राकेश
धन्य ती माऊली!!”
७०च्या दशकातील काळ असेल. त्यावेळी सर्वांनाच पगार खूप कमी असायचे.राकेश चार-पाच भाऊ, मोठे कुटुंब.. अल्प पगारात संसार चालवणं फार कठीण असायचं. त्यातच वडिलांना जडलेले हे दारूचे व्यसन. या व्यसनाचे चटके. राकेशच्या आईने खूप वाईट अनुभवलेले. अगदी शेवटपर्यंत वडिलांचे व्यसन काही सोडलं नाही आणि त्या व्यसनानेच त्या वडिलांचा बळी घेतलेला. त्यामुळे त्या माऊलीच्या मनात दारूबंद्दल कमालीची घृणा.
पुढे हा मित्र चांगला शिकला. त्याच्या नशिबाने त्याला चांगली नोकरी मिळाली. रेल्वेत सेक्शन इंजिनियर म्हणून तो रुजू झाला. राकेश शिकून मोठा झाल्याने त्याच्या आईला त्याचा खूप अभिमान होता.
कॉन्ट्रॅक्टर्सचे रेल्वेचे पेमेंट त्याचे सहीने मंजूर व्हायचेत. राकेश बक्षीसी घेत नसला तरी फुकटच्या पार्ट्याची रेलचेल होती. असं सर्व सुरू असताना मित्रांबरोबर अधूनमधून नकळत सोमरस घेण्याची सवय राकेशलाही लागली. अर्थात सर्व काही लिमिटमध्ये होतं आणि आताच्या काळात त्याला व्यसन असं कोणी म्हणतही नव्हतं.एक शिष्टचारच होता तो. राकेशच्या पत्नीला हे सर्व माहिती होतं. तिची लिमिटमध्ये घेण्यास हरकतही नव्हती.
अशाच एका एकतीस डिसेंबरला राकेश आणि त्याचे मित्र नाव वर्षदिनाच्या पार्टीला गेले होते. भुसावळहुन त्याची आई त्याच वेळा नेमकी संध्याकाळी घरी आली. सुनेने, सौं सीमाने दरवाजा उघडला. सासूबाईंना घरात घेतले वाकून नमस्कार केला.
“सीमा, राकेश कुठे गेलाय ग?.”
आता नेमके काय उत्तर द्यावे हे सीमाला समजत नव्हतं.
“ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलाय यायला थोडा उशीर होईल. “
असं मोघमपणे बोलून तिने तो विषय तिथेच थांबवला.
हॉटेल मध्ये 31 डिसेंबरची पार्टी रंगू लागली.नववर्ष असल्यामुळे राकेशने दोन चार पेग जास्तच घेतले होते. घरी गावाहून आई आलेली आहे की याची त्याला पूर्णपणे कल्पना नव्हती.
आपला मुलगा राकेश अजून कसा काय आला नाही रात्रीचे दहा वाजून गेलेत. राकेशची आई खूप काळजीत पडली. ती बैठकीत अस्वस्थ पणे येरझारा मारू लागली.
आता सीमालाही विलक्षण काळजी वाटत होती. राकेश आता घेऊन येणार आणि आईसमोर त्याचे ते स्वरूप बघितल्यावर आईला काय वाटेल. याची ती मनोमनी काळजी करत होती.
मध्यरात्र सरून गेली होती रात्रीचा एक वाजला होता.अडखळत पायऱ्या चढण्याचा आवाज ऐकू आला. दरवाजाची बेल वाजली आणि आईने दरवाजा उघडला. दारूचा घाणेरडा दर्प राकेश येताच सर्वत्र पसरला . आईने नाकाला हात लावला. आपल्या संस्कारी मुलाला या अवस्थेत तिला पहावेना. अतीव दुःख आणि तीव्र संताप या भावना मनात एकत्रित झाल्या होत्या.
ती म्हणाली,
“राकेश, तू सुद्धा तुझ्या वडिलांच्या वळणावर गेला की काय?.ही अपेक्षा नव्हती बाळा तुझ्याकडून!!.,.. का घाणेरडा हा मार्ग अंगीकारला..? “
आपल्या मुलाला या अवस्थेत बघून तिचा भयंकर संताप झालेला होता. आपण कुठे संस्कार करायला कमी पडलो की काय हाच प्रश्न तिच्या मनात वारंवार येत होता. बरं मुलगा पण चाळीस वर्षाचा असल्यामुळे त्याला शिक्षा कशी आणि काय करायची हा पण प्रश्न होता.
ती म्हणाली, “मी तुला शिक्षा तर काही करू शकत नाही..पण तू दारू पिऊन आल्याची शिक्षा मी, मात्र स्वतः नक्की घेते.”
असं म्हणून, राकेशची आई तात्काळ टेरेसचा दरवाजा उघडून बाहेर गेली बाहेर कडाक्याची थंडी होती आणि त्या थंडीत ती समोरच्या टेरेसवर जाऊन बसली.
राकेशला हे सर्व अनपेक्षित होते आईला अचानक बघून काय बोलावे हे सुद्धा त्याला सुचलं नव्हतं. चढलेली दारू क्षणार्धात उतरली होती. त्याने आईचे पाय धरले. आईची क्षमा मागू लागला.
आई म्हणाली, ” या तुझ्या चुकीची शिक्षा मी नक्कीच भोगणार. आजची पूर्ण रात्र या कडाक्याच्या थंडीत मी या बाहेरच्या गच्चीवर बसून काढणार. रात्रभर येथेच बसेल हीच माझी शिक्षा..!!”आणि तिने मौनव्रत धारण केले.
खरोखरच, ती पूर्ण 31 डिसेंबरची रात्र आईने बाहेर गच्चीत बसून काढली. तिच्यासोबत राकेश सुद्धा आईबरोबर बाहेर थंडीत कुडकुडत तिच्या पायाशी बसला होता. डोळ्यात अश्रूच्या धारा होत्या आणि त्यानंतर राकेशने आयुष्यात कधीच दारूच्या थेंबालाही हात लावला नाही.
“दारू पिणे एवढा वाईट आहे का? हा प्रश्न राकेशच्या मनाशी सतत प्रश्न करत होता. अगदी देव सुद्धा सोमरस म्हणून याचं प्राशन करतात, आणि देवानेच ती गोष्ट निर्मिली आहे त्यामागे निश्चित काहीतरी कारण आहे. थोडीफार घेतली तरी काही हरकत नाही. मी काही तिच्या आधीन झालेलो नाही. असे समजाऊन सांगून सुद्धा आईला काही उपयोग झाला नाही.
प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये हवी असते. जेव्हा तिची लिमिट क्रॉस होत तिचा अतिरेक होतो. तेव्हा दुःखाला सामोरे जावे लागते.
*अगदी सुखाचा पण अतिरेक झाला तरी त्या सुखापासून मिळणारा आनंद हा कमी कमी व्हायला लागतो. नव्याचे नऊ दिवस. असं काहीसं त्याला म्हणतात आणि काही दिवसानंतर तो आनंद वाटेनासा होतो.तसेच दुःखाचे बाबतीत आहे, लागोपाठ येणारे दुःखाने त्याच्या वेदनांची तीव्रता बोथट होते.*
हे दारूच्या अतिरेकाचे दुःख आयुष्यभर राकेशच्या आईने सहन करत आपला आयुष्य व्यतित केले होते. या दुःखाचे सावट आपल्या मुलाच्या संसारावर पडू यासाठी राकेशच्या आईने घेतलेली ही आगळीवेगळी शिक्षा, आणि राकेशच्या डोळ्यातून वाहणारे पश्चातापाचे अश्रुंचा त्याच्या माउलींच्या पायावर होणारा अभिषेक.. याने नात्यातील सर्वं गढूळता विरून नवंवर्षाची निर्मळ पहाट उगवली.
राकेशची आई आता नाही. पण तो प्रसंग जीवनात दिशा देणारा आहे. आई मुलांचे नाते काय असते त्याची महती सांगणारा आहे. मुलाच्या चुकीची स्वतःला शिक्षा करून घेणारी, आणि त्यातून त्याला सन्मार्ग दाखवणारी मुलांवर जीवापाड प्रेम करणारी माऊली बघितली की नकळत हात जोडले जाऊन आपण नतमस्तक होतो.
हा प्रसंग साधारणत:, तीस वर्षांपूर्वीचा आहे. आता तर दारू पिणे हा शिष्टाचार समजला जातो. दारूच व्यसनात रूपांतर होतं आणि त्या व्यसनाचे चटके सर्व कुटुंब भोगते . तेव्हा हा शिष्टाचार भ्रष्टाचार वाटतो.
या माउलीचे विचार काहींना मागासलेले वाटतीलही पण ज्याचं जळत त्यालाच कळतं. या उक्तीप्रमाणे ते त्या प्रसंगी योग्यच आहेत. मातृप्रेमाची ही विलक्षण कथा आज मला आठवली मग लेखणीने ती उतरवली.
आज ती माऊली नाही आईचे आपल्या आयुष्यात काय महत्व आहे आणि असते त्या साठी नुकत्याच रचलेल्या ताज्या ओळी लिहून थांबतो.
जेव्हा होतात जखमा,
वेदना तीव्र जाणवते
फुंकर मारण्याला तेव्हा
आई नेहमी असतें..१
आईचा मऊशार पदर
अभेदय सुरक्षा कवच
चुकीचे आपण जरीही
आई स्वतःच शिक्षा भोगते ..२
आईचे दिसें डोळयांत
ममतेचा अथांग सागर
वळण लावण्यासाठी
आई डोळे मोठे करते..३
आईचे कोमल हृदय
क्षमेचा तेथे अधिवास
लाख चुका त्या तुमच्या
माऊली सदैव पोटी घेते..४
आई नव्हे, भगवन्त
भुतलीचा आम्हा देव
जाते जेव्हा खूप दूर,
देवघर रिकामे होते..५
माझ्यासारखे ज्यांचे “मातृछत्र” अबाधित आहे ते खरोखर भाग्यवंत आहे.ते कायमस्वरूपी अबाधित राहो हीच देवापुढे प्रार्थना करतो.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६