#सूरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
घरातली अडगळीची खोली आवरतांना सुखदाची नजर कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या एका अवाढव्य बक्षिसाकडे गेली. साधारण एक ते दीड फूट उंच असलेल्या त्या स्मृतिचिन्हाचं वरचं चक्र कधीच वेगळं झालेलं अन् हरवलेलं होतं. त्यावर बांधलेल्या रिबीन चा रंग उडून दिवसागणिक फिका पडला होता. धुळीने माखलेल्या पृष्ठभागावर कसले तरी घाणेरडे डागही पडलेले दिसत होते. त्या भल्यामोठ्या बक्षिसाच्या विदारक अवस्थेकडे बघता बघता सुखदा भूतकाळात कधी शिरली तिचं तिलाही कळलं नाही.
सुखदाच्या शाळेच्या मुख्य मैदानात असलेल्या व्यासपीठावर एका रांगेत पाच बक्षीसं मांडलेली होती. त्यात हे बक्षीसं सर्वात मोठं, तशाच मोठ्या दिमाखात उभं होतं. विद्यार्थी येता जाता त्या बक्षिसांकडे टक लावून बघत होते. सुखदा अन् तिची मैत्रीण सुद्धा बघता क्षणी त्या बक्षिसाच्या प्रेमात पडल्या. सुखदा तर म्हणालीही, ” आपल्याला कसलं मिळतंय ते, पाचव्या क्रमांकाचं मिळालं तरी खूप झालं”. तरीही त्या बक्षिसासाठी होणाऱ्या परीक्षेत दोघींनीही सहभाग घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या क्रमांकावर दोघींचीही निवड झाली होती. मग पुन्हा परीक्षा घेतल्या गेली अन् या वेळी मात्र सुखदाला निर्विवाद प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या मनातलं आश्चर्य जास्तच वाढलं. पण आता त्या आश्चर्याची जागा अभिमानाने बळकावली होती. त्यानंतर रीतसर बक्षीस वितरण करण्यात आले. समस्त तालुक्यातून मिळालेले प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वीकारताना तिच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा आनंद आणि अभिमान कोणाच्याही नजरेतून सुटणारा नव्हता. शाळेने सुद्धा तिचे भरभरून कौतुक केले. त्या कौतुकात वाटेकरी होता यावे म्हणून ते बक्षीस आग्रहाने मुख्याध्यापकांच्या कक्षात ठेवून घेण्यात आले. नंतर पाचव्या दिवशी ते अवजड बक्षीस सायकल च्या बास्केट मधून घरी नेतांना तिची एकीकडे पार तारांबळ उडाली होती तर दुसरीकडे रस्त्याने जाताना लोक कौतुकाने बघत, थांबून चौकशी करत म्हणून अभिमानही वाटत होता.
मात्र तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काही दिवसांनी ती परीक्षा घेणाऱ्या आयोजकांचा फोन आला. ते दहाव्या वर्गाचे क्रॅश कोर्स व टेस्ट सीरिज चालवत असत, ज्यामध्ये सुखदाला निःशुल्क प्रवेश देण्याची त्यांची तयारी होती. अर्थातच सुखदाच्या दहावीच्या यशामुळे त्यांना या व्यवसायात पाय रोवणे सोपे जाणार होते.
त्या एका फोन ने सुरूवातीपासून सुखदाच्या मनात त्या परीक्षेबाबत, बक्षिसाबाबत असलेले आश्चर्य, तिच्या मनातले असंख्य प्रश्न या सर्वांचे गूढ उलगडले होते. तिचा अभिमान पार उन्मळून पडला होता.
आज इतक्या वर्षांनी त्या बक्षिसाकडे पाहताना भूतकाळातल्या “स्व” ची तिला पुन्हा एकदा कीव करावीशी वाटली. त्या बक्षिसाकडे दुसरा कटाक्षही न टाकता तिने आपल्या मागून अडगळीच्या खोलीचे दार बंद करून घेतले.