वर सोबत जोडलेले एक सुंदर रांगोळी चित्र आज बघण्यात आले पण एवढे सुंदर चित्र असूनही त्यातील दुःखाचे भाव पाहून आनंद झाला नाही. रांगोळीकाराने अक्षरशः जीव ओतला होता त्या चित्रात. त्याच्या कलेने चित्र सजीव झाले खरं!! मला लिहिण्यासाठी आजचा शब्द मिळाला,
” व्यथा.. ”
ही सुंदर रंगोळी होती एका खूप वयस्कर जर्जर झालेल्या वृद्धेची. रांगोळी चित्र होत ते. खूपच सुंदर रंगवले होत! चित्रात उदास भाव होते जणू सर्व जीवन निरस झाल्याचे भाव स्पष्ट दिसत होते त्या चित्रात. तिला खूप जास्तीचे मिळालेले आयुष्य त्रासदायक ठरत असणार. वेदनादायी अव्यक्त दुःख.चित्रात पदराआड दांबून ठेवलेला हुंदका हे चित्र बघताना तुम्हालाही जाणवेल.
‘हॅट्स ऑफ फॉर हिज आर्ट!”” त्याच्या कलेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
एखादी गोष्ट नेमक्या वेळेवर मिळाली नाही तर वाट बघण्याशिवाय पर्याय नसतो. मग प्रतिक्षा नोकरीची, लग्नाची, रोज लोकलने उशिरा येणाऱ्या नवऱ्याची, मुलाची, वास्तुयोगाची, सन्मानाची, नोकरीतल्या बढतीची… अगदी जीवनातील रस संपल्यावर, मिळालेल्या जास्तीच्या आयुष्यात शेवटी मृत्युंची पण प्रतिक्षाचं करावी लागते.
वृद्धेचे बोलके चित्र आज माझ्याशी खूप काही बोलून गेले.
“काय घोर मोठे पाप
देवा मी असे केले
गेले वरती आप्त मित्र
निरर्थक माझे जिणे!!
होती चार गोड पिल्ले
नेली ती तू आधीच
जन्म असं नको देऊ
तू पुन्हा तू कधीच!!
आनंद जेव्हा होता
दिवस लवकर सरले
आता क्षण अन क्षण
दुःखाचे ते रेंगाळाले!!
शरीवरच्या सुरकुत्यारे
दाट दाट खूप झाल्या
जिभेस चवही नाही
आवाज खोल तो गेला
!!
रांगोळी ती काढण्याला
मॉडेल झाले कुणासाठी
चेहरा होता किती सुंदर
अनोळखी आज माझ्यासाठी!!
डोळ्यास दिसें ते धुसर
सृष्टी सारी हलते डुलते
कानाना नाही आता
आवाजाशी देणे घेणे!!
जराही झाली म्हातारी
दातांनी रजा घेतली
मेंदू अजून चिरतरुण
आठवांचे कोरडे पाणी!!
पूजले तुला रोज मनोभावे
पूर्ण माझ्या उभ्या आयुष्यात
“शंभरीनंतरचे हे आयुष्य”
का दिला रे हा उगा शाप!!
उचलरे तू आता माझ्या बापा
विनवणे नित्याचे तुला रोज
वाट स्वर्गात पाहुनी थकले
माझी पिल्ले..अन सौभाग्य!!
एवढ्या दिर्घायुष्याचा शाप
शत्रूलाही तू नको रे देऊ
नव्या अनोळखी दुनियेत
नको उगाचच त्याला धाडू!!
नेशील तू वरती जेव्हा
खरा आनंदाचा सोहळा रे
जे सवे येतील चितेपर्यत
करा तोंड गोड त्यांचे पेढ्याने !!
सुंदर रांगोळीत जिवंत झाली
बोलली ती माझ्याशी माऊली
तिची व्यथा व्यक्त करण्या
दिल्या तिनेच मला शब्दओळी!! “
“व्यथा” अर्थात दुःख देणाऱ्या समस्या वेगवेगळ्या असतात. गडगंज पैसे असतात पण मुलबाळ नसत. मुलं असतात तर आई बापाना ते विचारत नसतात. सर्व काही सुखात चालू असताना अचानक दुर्धर आजार उद्भवतो. रोज खडूस बॉसची दादागिरी आता सहन होण्यापलीकडे गेली असते. नवरा वा बायकोशी अजिबात पटत नाही.अशी खूप अगणित उदहारण देता येतील. आपल्या “व्यथा” सहजासहजी कुणी सांगण्यास तयार नसतो. त्यामागे आपण कुठंतरी कमी पडलो ही अपराधी भावना असू शकते. सुख वाटल्याने वाढते आणि दुःखही शेअर केल्यानेच कमी होते. हे मात्र नक्की.
आपण “शतायुषी व्हा.” अशी वाढदिवशी शुभेच्छा देतो पण शंभरी जो गाठतो त्याच्या “व्यथा” त्यालाचा माहिती असतात. सगे सोयरे मित्र आप्त बरेच वर्ष आधीच देवाघरी गेलेले असतात त्या सर्वांच्या अंत्ययात्रेस जाण्याचे दुर्दैव भोगून झाल्यावर नकळत शंभरीनंतर एका अनोख्या विश्वात त्याचा प्रवेश होतो म्हणायला श्वास सुरु असतो तर गात्र साथ देत नाही. सारे जग अनोळखी वाटते त्याला. मधुर आठवणी असल्या तरी त्याच त्रासाच्या ठरत असतात… आणि मग नकळत हुंदका येतो…डोळ्यातून पाणीही येत नाही.. डोळ्यातले आसवही थिजून जातात आता त्याला फक्त एकच प्रतिक्षा असते ती म्हणजे वरच्याच्या आमंत्रणाची.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६a