फॅशनच्या नावाखाली अंगप्रदर्शन स्त्रियांवरील अत्याचाराचे कारण आहे का?
हा विषय अतिशय संवेदनशील आहे.माझ्या मते दोन्ही म्हणजे अंगप्रदर्शन आणि विकृत मानसिकता जबाबदार आहे.परंतु यापेक्षाही जास्त जबाबदार मी पालकांना मानत आहे.या लेखाचा कोणीही वैयक्तिक अर्थ घेऊ नये आणि मुलींना वागण्याचे स्वातंत्र्य पोषाखाचे स्वातंत्र्य देऊ नये असेही नाही परंतु कुठेतरी काहीतरी चुकत आहे हे नक्कीच आणि त्यासाठी मी मुलामुलींच्या पालकांना जास्त जबाबदार मानत आहे.६०%पालक आणि ४०%
मुलंमुली असं म्हणायला हरकत नाही.
फॅशनच्या नावाखाली आजकाल जे अंगप्रदर्शन सुरू आहे ते बीभत्स तर आहेच परंतु ते काम वासना जागृत करायला पुरेसं आहे. अगदी जवळच्या नात्यात एक जोडपं बुटीक चालवतात.त्यांनी मला जे सांगितले ते मी लिहीत आहे.ते मुलींचे बायकांचे कपडे पण शिवतात.त्यांच्याकडे कपडे शिवायला येणाऱ्या बायका आपल्या मुलींचे ब्लाऊज मधून किंवा ड्रेस मधून जास्तीत जास्त अंग दिसेल असे कपडे शिवायला सांगतात.दोन तीन वेळा तर मी पण तिथेच होते.मुली ट्रायल घेऊन बाहेर आल्यावर कुठे कुठे अंग कमी दिसत आहे ते पण त्या आयांनी सांगितले.मला पहाताना आणि ऐकताना लाज वाटत होती.
आज बायका मुली नोकरी करतात. कामाच्या ठिकाणी कधीकधी जास्त वेळ थांबावे लागते .अशावेळी आपले वागणे आपले कपडे थोडे तरी डिसेंट असले पाहिजे.मी हे नाही म्हणत की तुम्ही साडीच घाला किंवा सलवार कमीज घाला. परंतु जीन्स पँटवर थोडा लांब कुडता घाला.पण तेच अगदी शॉर्ट टीशर्ट आणि ते पण खोल गळ्याचं किंवा जिन्स पॅन्ट तीही कमरेखाली घसरणारी असल्यास जर घालणारीला लाज नाही तर पहाणा-याला कशाला असणार? परंतु हे त्यांना समजावण्याचं काम आईवडिलांचे आहे.त्यातून मुली बाहेर हॉस्टेल मध्ये किंवा रूम घेऊन रहात असतील तर विचारायलाच नको.त्यांचे घरी वेगवेगळ्या मुलांबरोबर रात्री बेरात्री येणं.त्यांच्या रूमवर सतत मुलांचं येणं जाणं हे आईवडिलांना माहित पण नसतं .हा सर्व अनुभव आम्ही इंदूरला भाड्याच्या बंगल्यात रहात असताना घेतलाय.बंगल्याच्या आऊट हाऊसमध्ये घरमालकांनी दोन मुली ठेवल्या होत्या .त्यांच्या या वागण्याला त्रासून आम्ही दुसरीकडे रहायला गेलो.कारण दुसऱ्याच्या मुलींना आपण काय बोलणार?
आता आपण मुलांकडे वळू या. लहानपणापासून चांगले संस्कार दिले गेले असले तरी आजकाल मुलंमुली बारावीनंतर कॉलेजमध्ये शिक्षणासाठी रहातात.त्यांना आजकाल बाहेर बरीच प्रलोभने असतात.
त्यातून वाढत्या वयापासून हातात स्मार्ट फोन आलेले असतात.आईवडिलांना खूप गोष्टी एकाच शहरात एकाच घरात राहूनही कामामुळे माहित पडत नाही.मोठमोठ्या शहरात आईवडिल दोघंही नोकरी करतात.मुलं पण एक किंवा दोन असल्याने हात खर्च पण बराच दिला जातो.त्याचा उपयोग ते कसा करतात हे पण पाहिलं जातं नाही.त्यातून मिडिया ,अश्लील चित्रपट मराठी,हिंदी आणि इंग्रजी यांची तर काही कमी नाही.अशावेळी नको ते नको त्या वयात समजल्याने तरूण पिढी काही अंशी बिघडत चालली आहे.त्यातून होणा-या रेव पार्ट्या मुलींचं उच्छृंखल वागणं हे वाढत चाललं आहे.काही मोठ्या लोकांची मुलं तर सहज मजा म्हणून मुलींशी अतिप्रसंग करायला कमी करत नाही.कधी कधी मुलींच फ्री वागण्याचा अर्थ पण वेगळा घेतला जातो.याला कारण विकृती.काही वर्षांपूर्वी हे प्रमाण कमी होते.आपण एका विशिष्ट वयाचे म्हणजे साठीच्या आसपास असणारे बायका पुरुष एकत्र शिकलो नोक-याही केल्या परंतु त्यावेळी अगदी एक किंवा दोन टक्के असे प्रकार घडत.महाविद्यालयीन जीवनात पण एकत्र शिकत होतो शैक्षणिक सहलीला जात होतो.पण आपापल्या मर्यादा सांभाळून मजाही करत होतो.आपल्यावर आपल्या आईवडिलांचा अंकुश होता.त्याचप्रमाणे आपण नैतिक आणि सामाजिक जबाबदारी समजत होतो.परंतु आता मुलामुलींना सर्वच बाबतीत स्वातंत्र्य हवे आहे आणि बंधन नको.आईवडिलांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा आणि पैशांचा गैरवापर होत आहे.
सामाजिक दृष्टीकोन बदलला आहे.पहिले ओळखीच्या मुलांनी गैरवर्तन केलं की त्यांच्या आईवडिलांच्या कानावर ती गोष्ट घातली जायची.आता 'आपल्याला काय करायचं' हा दृष्टिकोन बळावला आहे.कोणी सामाजिक जबाबदारी घ्यायला तयार नाही.
संस्कार करणारे मोठी माणसं घरात नाही.
विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आपण आणि आपली मुलं एवढंच पाहिलं जातं एवढंच नव्हे तर नवरा आणि बायको पण याच पद्धतीने वागतात .' तू तुझं पाहून घे मी माझं पाहून घेईन 'ही वृत्ती पण वाढली आहे.मग अशावेळी मुलांकडे लक्ष कोण देणार?खरी परिस्थिती ही आहे की अशीच मुलं जास्त गैरवर्तन करतात.त्यांच्यावर कुणाचा आळा नाही.त्यांना एकटेपणा जाणवतो मग वेळ घालवण्यासाठी ते वाईट संगतीत पण लागतात.
संस्कार केले तरी बाहेरची परिस्थिती विकट आहे . प्रलोभने अनेक आहेत .अशावेळी एका विशिष्ट वयात त्यांना चांगले संस्कार देणं ,स्त्रियांचा आदर करणं हे जर वारंवार शिकवलं गेलं तर काही प्रमाणात गैरवर्तन थांबवू शकतो .ते रात्री बेरात्री घरी आले तर त्यांची विचारपूस करणं.कधीकधी प्रेमाने तर कधी खडसावून जाब विचारला गेला पाहिजे.पण आईवडिलच वेळेत घरी येत नसतील किंवा कामात व्यस्त असतील तर अशावेळी मुलं बेजबाबदार होऊ शकतात.त्यातूनच वाईट संगतीला लागून नको ते प्रकार घडू शकतात!
एकूणच काय तर संवाद हीनता वाढली आहे.घरं मुकी होत चालली आहे.!घराघरातील हे मुक रुदन(तरुण पिढीचं) जर समजून घेतलं तर अजूनही वेळ गेली नाही.!