कुटुंबात होणारे बदल
हे विश्वची माझे घर असं म्हणता म्हणता
आज जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्याची वेळ आपल्यावर आली आणि त्यातूनच अनेक
वादही निर्माण झाले.तरुण पिढी,त्यांच्यावरचे संस्कार आणि घरातून नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिला.त्यामुळे कुटुंब पद्धतीत होणारे
बदल आपण लक्षात घेऊ या
महिला कामावर जातात–
बदलत्या काळात महिला शिकून कामावर जाऊ लागल्या त्यामुळे बरेच बदल घडून आले.
सध्याची परिस्थिती अशी आहे की ' मी माझा नवरा आणि माझी मुलं ' यांचाच समावेश घरोघरी दिसून येतो.आपला देश जरी पुरुषप्रधान असला तरी समाज घडवताना स्त्रियांचा फार मोठा वाटा असतो.सुशिक्षीत झाल्याने बाहेरचे जग त्या पाहू लागल्या आणि त्यांनी आर्थिक, वैचारिक, शैक्षणिक व बौद्धिक पातळीवर पण उच्चांक गाठला .त्यामुळे मुलांच्या विकासासाठी पौष्टिक आहार, वैचारिक देवाणघेवाण, सारासार विचार करण्याची क्षमता स्वतःबरोबर मुलांमध्येही विकसित करताना दिसू लागल्या.घराघरात समाजाला पोषक असे व्यक्तीमत्त्व तयार करत गेल्या.ज्याप्रमाणे एखाद्या रोपाला योग्य असे खतपाणी मिळाल्यास त्याचा डेरेदार वृक्ष तयार होतो आणि त्याचा समाजाला फायदा होतो.आज तरूण पिढी सर्वप्रकारे विकसित होऊन समाजात येत आहे आणि यशस्वी होत आहे.यात महिलांचा फार मोठा वाटा आहे.पूर्वी देखील रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीबाई फुले व आनंदीबाई जोशी यांसारख्या स्त्रिया होत्याच ज्यामुळे सामाजिक क्रांती होऊन आज महिला घराबाहेर पडल्या .
हे जरी खरं असलं तरी बदलत्या काळात
घराला घरपण राहिलं नाही —
हे जरी खरं असलं तरी घराला घरपण हे बाई मुळेच येत असतं नाही तर घराची धर्मशाळा व्हायला वेळ लागत नाही.थोड्याफार फरकाने आज हेच चित्र घरोघरी दिसत आहे.पूर्वीपण बायका नोकरी करायच्या पण स्वैर नव्हत्या घराचं घरपण जपून होत्या.आता त्यांच्या तोंडून बरोबरीने कमवताना तुझं माझं ,तुझा पैसा ,माझा पैसा ही भाषा ऐकू येते.हे थोडं अवास्तव आणि अवघड होऊन बसलं आहे खरं.
सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे कुटुंबातील संवाद खुंटला.–
हे फार मोठे कारण आहे.सोशल मिडीया आणि दुधपित्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ,सर्वांच्या हातात भ्रमणध्वनी पोचला . त्याचप्रमाणे घरोघरी दूरदर्शन असल्याने लोक घरात असले तरी एकमेकांशी संवाद साधताना दिसत नाही.सोशल मिडीयावर दाखवले जाणारे कार्यक्रम,बातम्या मनोरंजनाच्या नावाखाली चालणारा बीभत्स खेळ आणि मालिका या सर्व गोष्टींचा मनुष्य गुलाम झाला.उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो मिडियाच्या विळख्यात जकडला आहे.दिवसभर थकून घरी आल्यावर देखील तो भ्रमणध्वनीवर असतो.त्यामुळे घरातील लहान मुलांकडे वृद्धांकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही.आईवडिल सतत कामात नाहीतर भ्रमणध्वनी वर गुंतलेले पाहून लहान मुलं पण दूरदर्शन पहातात.तरूण पिढी नको त्या गोष्टीत गुंतलेली असते.ती फेसबुक आणि इंटरनेट चा वापर अभ्यासासाठी न करता वाईट साईट गोष्टी तिथून शिकते.
कौटुंबिक मूल्ये आणि परंपरा सुद्धा बदलत आहेत.
आजच्या वयस्कर पिढीला वाटतं की स्त्रिया घराबाहेर पडल्याने मुलांवर संस्कार होत नाही.रूढी परंपरा जपल्या जात नाही.तरूण पिढी उच्छृंखल वागत आहे.मुलींना घरोघरी डोक्यावर बसवले जात आहे.मोठ्यांचा मान राखत नाही.घरातील वयस्कर लोक त्यांच्यासाठी ओझं झाल्याने त्यांची वृद्धाश्रमात रवानगी केली जाते.घरात असले तर चार प्रेमाचे शब्द बोलायला त्यांची विचारपूस करायला वेळ नसतो.पूर्वी जो घरात मोठ्या माणसांना मान असायचा ,ती म्हणतील तीच पूर्व दिशा असायची.पूर्वी संध्याकाळी जेवतांना सर्व एकत्र बसून जेवत, गप्पागोष्टी आणि चर्चा होत .आता तसे राहिले नाही.वयस्कर लोकांना पहिले जेवायला लावणं . स्वतः नंतर बसणं हे प्रकार घरोघरी आढळतात.तिसरी पिढी जर घरात असेल तर मग मुलांचे आणि नातवंडांचे होणारे संभाषण कमी आणि भांडण जास्त.अशा परिस्थितीत म्हाता-या माणसांची होणारी कुचंबणा फार वाईट असते.असं एकत्र रहाण्या
पेक्षा त्यांना वृद्धाश्रमात ठेवलेलं केंव्हाही चांगलचं.कमीत कमी त्यांच्याशी बोलणारे , काळजी घेणारे समवयस्क तर असतील. आजची पिढी रूढी परंपराचा फारसा विचार करतच नाही.त्यातून देवाला मानणं वगैरे बंदच झालं आहे.सुट्ट्या नसल्याने सणवार रविवारी साजरे केले जातात किंवा सुट्टी असली तरी घरी आईवडिल बहिण भावंडं यांना सोडून ते खुशाल मित्रमैत्रिणीं बरोबर पिकनिक किंवा बाहेरगावी फिरायला जातात.त्यांच्या नजरेत कुटुंब म्हणजे कटकट असते.त्यांना त्याच त्याच गोष्टी परत परत सांगणारे किंवा उपदेश करणारे त्यांच्यावर बंधन घालणारी वयस्कर बरोबर नको वाटतात.
सामाजिक आर्थिक आणि वैचारिक मूल्यांमध्ये कमालीचा फरक पडला आहे.आर्थिक स्वतंत्रता मिळाल्यापासून आजकाल स्त्रिया आणि पुरुष आपापल्या मित्रमैत्रिणी बरोबर पण
वेगवेगळे जाऊन आनंद साजरा करतात.घराला घरपण राहिलं नाही.हातात पैसा भरपूर असल्याने सर्व गोष्टी बाजारातून विकत आणता येतात . बाहेर जाऊन खाण्यापिण्याचे प्रमाण पण वाढले आहे.खरंतर हे सर्व आपसातील जिव्हाळा कमी झाल्याने झालं आहे.आर्थिक सुबत्ता आल्याने मनुष्य सुखवस्तू होत गेला आणि तिथेच तो पैसे कमावण्याच यंत्र बनला आणि माणुसकी विसरला असं म्हणायला हरकत नाही.
यावरचा उपाय– खरंतर हा विषय जर नीट हाताळला तर सामंजस्य निर्माण होऊ शकते.तरूण पिढीवर अनेक दोषारोप होतांना आढळतात पण काळाची गरज आहे की नवराबायको दोघांनी कमावलं तरच संसाराचा गाडा सुरळीत चालू शकतो.पण त्याचबरोबर त्यांनी मुलांना शिस्त लावणं पण गरजेचं आहे.नुसतं पैसा कमावला की झालं असं म्हणून चालणार नाही.तो पैसा मुलांच्या योग्य विकासासाठी च वापरला जातो की नाही हे पहाणं पण गरजेचं आहे.बाहेरच्या जगात मुलांना वावरायला पाठवताना त्यांना चांगल्या वाईट गोष्टींची समज देणं आणि सोशल मिडियाच्या अधीन न होणं आणि बाहेरच्या प्रलोभनांपासून वाचवणं पण गरजेचं आहे हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे त्याचबरोबर घरातील मोठ्या माणसांशी आदराने स्वतः वागून मुलांना पण शिकवलं पाहिजे.एकत्र रहाणं जरी जमत नसलं तरी कमीत कमी सणावारांना एकत्र येऊन सण साजरे केले तरी खूप काही साधता येईल.एकमेकांना दुखलंखुपलं किंवा संकटात अडीअडचणीला वेळ काढून मदत केली तरी पुष्कळ साध्य होईल!