२०११ ची गोष्ट आहे. ते पावसाळ्याचे दिवस आणि चातुर्मासही सुरू होता. अमरावतीहून नागपूरला येताना रेल्वेगाडीची वाट पाहत असताना काही खाऊन घ्यावे म्हणून रेल्वेस्थानकावर मिळणाऱ्या एका पदार्थावर ताव मारला. पुढे हा ताव किती महागात पडू शकणार होता याची जाणीव नसलेला मी मात्र बिनधास्तपणे ते प्रदूषित अन्न खाऊन तृप्त झालो होतो.
कर्माचे फळ मिळायला आता सुरुवात झालेली होती. नंतर एक दोन दिवसातच मला अस्वस्थ वाटायला लागले. काही माहित असलेली औषधी घेऊन जरी तात्पुरते बरे वाटले असले तरी काही करून सुद्धा ताप येताच होता. त्रिमूर्ती नगर येथील डॉ. पाटील कडे जाऊन त्यांचा उपचार घेतला तेव्हा बरे वाटले. त्यांनी पुन्हा एकदा येण्याकरता सांगितले. त्यानुसार पुन्हा गेलो तर तिथे गेल्यावर पुन्हा तब्बेत बिघडली असता, माझी रवानगी थेट डॉ. केळकरांच्या इस्पितळामध्ये करण्यात आली. तेथून तीन दिवसात बरे होऊन घरी परतल्यावर काही दिवसांत पुन्हा एकदा जैसे थे स्थिती झाल्यामुळे दिवाळी मधील फराळ फक्त डोळ्यांनी पाहण्यातच गेला. जवळपास अडीच ते तीन महिने हे सर्व सुरू असतांना, आमच्याकडे येणारे आयुर्वेदिक डॉ. श्री कोमेजवर सर यांनी काही आयुर्वेदिक टॅबलेट दिल्यात. ही अतिशयोक्ती वाटेल पण गेल्या अडीच ते तीन महिन्यात जेवढा त्रास मला होत होता तो काही दिवसात कमी झाला आणि आयुर्वेदाविषयी एक कुतूहल निर्माण झाले. जे औषध घेण्याला allopathic औषधांच्या अगदी विरुद्ध नियम असतात.
आजारी असताना सुद्धा काहीतरी खाऊनच बरेच allopathy औषध घ्यावे लागते. याउलट आयुर्वेदामध्ये बहुतांश औषधी ह्या काही न खाताच घ्याव्या लागतात. आजारामधे काही खायचे नसते हे आयुर्वेद सांगतो. याचा अर्थ allopathy ला कमी लेखणे हा नाही. पण आपलं मूळ जे आपण गमावून बसत आहोत, ज्याला आपण कमी लेखत असतो त्याचे महत्त्व किती आहे हेच आपल्याला माहीत नाही. हे तेव्हा लक्षात आले.
२०११ मधील ती घटना लिहिण्याचा उद्देश हाच की, आजपासून सुरू झालेला चातुर्मास आणि त्याचे नियम. जे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या दोन्ही बाबतीत उत्तम असेच आहे.
पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमी असते म्हणून कमी खा, हलके खा हे आपला धर्म म्हणजेच आयुर्वेद विज्ञान सांगतो. त्यामुळे संयमी आहार महत्त्वाचा असतो. जर याउलट केले तर जप, ध्यान यात एकाग्रता साधता येणार नाही. संयम हा फक्त आहाराचा नाही तर वर्तनाचा सुद्धा असतो. म्हणून संयम रहावा यासाठी विशिष्ट प्रकारच्या आहाराचे सेवन चातुर्मासात करू नये हे आपल्या प्राचीन वैज्ञानिकांनी म्हणजेच ऋषीमुनींनी सांगून ठेवले आहे. त्यानुसारच आपल्याकडे चातुर्मासात बरीच व्रतवैकल्ये सांगितली आहेत ज्यामागे विज्ञान आणि धर्म दोन्ही आहेत.
म्हणून लक्षात ठेवायचे टपरी वरचा की कुठला ही समोसा किंवा बटाटे वडा बोलावेल तेव्हा जिभेला जरा बांधून ठेवायचे. आणि आपल्या प्राचीन चिकित्सा पद्धतीलासुद्धा योग्य तो सन्मान द्यायचा.