माझ्या आईला तीन भाऊ आणि ती एकटीच बहीण होती, त्यामुळे आम्हाला तीन मामांकडे चंगळ करायला मिळायची. त्यात आमच्या कुटुंबात मी शेंडेफळ, म्हणून माझे विशेष लाड व्हायचे . उन्हाळ्याच्या सुट्यांची आम्ही चातकासारखी वाट पाहत असायचो. सुट्ट्या लागल्या की , आम्ही आमच्या गावातील घरचा रानमेवा थैल्यात आकंठ भरून मामाच्या गावी जात असू.
आमचे मोठे मामा नागपूरला मॉडेल मिलच्या बंद दरवाज्यासमोर छोट्याशा टुमदार घरात राहत होते. ते फियाट कंपनीमध्ये कामाला होते. खूप मस्ती केली तर , मॉडेल मिलच्या उंच चिमणीची भीती दाखवायचे . मला कधी कधी ते सायकल वर फिरायला घेऊन जायचे, रस्त्यात गारुडीवाला दिसला की , मी तेथे थांबवण्यासाठी हट्ट करायचो आणि ते घरी जाण्यासाठी .
आमचे लहान मामा रेल्वे मध्ये ट्रेन ड्राइवर होते, आणि ते अजनीच्या स्टाफ क्वार्टर मध्ये राहायचे. संध्याकाळ झाली की , पूर्ण कॉलोनी भर दगडी कोळसाच्या शेगड्या पेटायच्या , आणि माझी सुगरण मामी , त्यावर चविष्ट स्वयंपाक करायची , मामा जेवण करतांना , रेल्वे बाबतच्या गोष्टी खुप खुप रंगवून सांगायचे . मामा ड्यूटीहुन घरी आले की , आमची तर खुपच चंगळ असायची.
आमचे तिसरे मामा सैन्यातील , इंडियन पोस्टल सर्व्हिसेस मध्ये , नोकरीला होते आणि मुंबईच्या सायनला त्यांचे भले मोठे क्वार्टर होते. मामा मामी दोघेच, मग आम्ही उन्हाळ्यात त्या ठिकाणी आपला दीर्घ मुक्काम करून खुप मज्जा करायचो. आमचे एक नातलग कल्याणला राहत होते, त्यांना भेटायला जायचे म्हणजे , आम्ही लोकलच्या चेंगराचेंगरीत सहभागी होऊन तेथे जायचो ,त्याची वेगळीच मजा वाटायची. दर आठवड्यात एक वेळा तरी आम्ही दादर चौपाटीवर पायीपायीच जायचो , तेव्हा तेथील समुद्राचे खुप आकर्षण वाटायचे.
आता माझे तिन्ही मामा स्मृतीत आहेत, पण त्यांच्या सहवासातील, ते अनुभव , आता माझे भाचे घेत असतात , एव्हाना आता माझे नातू सुद्धा “मामाआजोबा “ ची , तेवढीच मजा घेतात . माझ्या बालपणीचे “ तू सुखी रहा “ ह्या चित्रपटातील गीतकार ग. दि. माडगूळकरांचे , १९६३ च्या काळातील , ते प्रसिद्ध बालगीत , मामाच्या गावाला जाऊ या, आजही कानात गुंजारव करत असते. आमच्या पिढीने पिढ्यानपिढ्या जपलेले मामाभाच्यांचे हे नाते , आताच्या काळात हळूहळू लुप्त होतांना पाहून मन खट्टू होते . पण , कालाय तस्मै नमः म्हणावे, आणि पुढे चालावे.