#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
मला सहसा गर्दीपासून दूर राहायला आवडतं आणि विशेष जोखीम घेण्याचीही वृत्ती माझी नाही. आणि असं मला कित्येक वर्षं वाटत होतं किंबहुना तशी माझी गाढ धारणा होती स्वत: बद्दल. त्याला कारणंही तशीच. गर्दी नको म्हणून मी नवरात्रीत देवीच्या मंदिरात जायचं टाळत आले, गणेशोत्सवात गणपती मंदिरात, असंच जिथे जिथे अनेक लोक असण्याची शक्यता असते ते ते ठिकाण मी जाण्याचं टाळत आले.
आणि असा सगळं असताना मात्र मी एक धाडस केलं जे करण्यामागचं कारण अथवा कुठलीही शहानिशा न करता त्यात उडी मारण्याचं कारण मला आजवर उमगलं नाही. त्यावेळी मी तशी का वागले? त्यामागे नेमका कुठला विचार होता? हा अजूनतरी माझ्यासाठी संशोधनाचा विषय होऊन बसलाय.
तर घडलं असं – आमचा मुक्काम रायपुर – छत्तीसगढ ला असताना असंच एका नवरात्रीत डोंगरगावला जाण्याचं ठरलं. एरवी अमरावतीत असताना मंगळवार, शुक्रवार अंबादेवीत जायचं टाळणारी मी ‘हो’ म्हणून बसले. म्हटलं ना – त्यावेळी मी जे वागले त्याची कारणमीमांसा मला आजवर कळू शकलेली नाही.
नवरात्रीचा तीसरा दिवस. रायपुर – डोंगरगाव रेल्वे ला तूफान गर्दी. आणि आम्ही तीघी सर्वसाधारण तिकीट घेऊन सर्वसाधारणच डब्यात चढलो अन् उभे राहिलो – कारण बसायला जागा नव्हतीच. पण उत्साह प्रचंड होता मग काय उठत बसत लटकत अन् तेवढया गर्दीत चणे विकणारीकडून ते विकत घेऊन खात खात अन् त्यात मीठ कमी झालंय ते तिला सांगत आम्ही एकदाचे उतरलो डोंगरगाव स्थानकावर.रेल्वेच्या डब्यात चढल्यावर मला सांगण्यात आलं की आम्ही ११२६ पायऱ्या चढून जाणार आहोत. हे जर आधी माहीत असतं तर मी त्या रेल्वे ची पायरी चढणं तर सोडाच माझ्या रूमची पायरी सुद्धा उतरले नसते. अर्थात हे माहित होतं म्हणून की काय मला ते उशिरा सांगण्यात आलं. तोपर्यंत मी उगाच गैरसमजाच्या उडन-खटोल्यात गटांगळ्या खात होते. उतरल्यावर एक सुखद धक्का – भिंतीवरील चित्र – अप्रतिम, सुरेख.
आमच्यातल्याच एकीचे वडील व दोघी बहिणी येणार होत्या – जेवणाची सोयही त्यांच्याकडूनच झालेली. मंदिराच्या पायथ्याशी पोहचलो अन् दूसरा गर्दीचा लोट बघितला रेल्वेतल्या पेक्षाही मोठा. तिथे रेल्वे फटकसारखेच पण वर न उचलल्या जाणारे मोठमोठे लोखंडी खांब आडवे लावलेले होते. एक एक करत ते खांब एकाच वेळी वाकत आणि धावत पार करताना त्यांची गिनती कधी थांबली ते ही कळलं नाही. अखंड काळ लोटला असे वाटेपर्यंत पहिली पायरी समोर आली. मध्यंतरी काकूंनी दिलेल्या डबोल्यातून निघालेले तुरीच्या डाळीचे अन् पातीच्या कांद्याचे वडे एक एक करून फस्त होत राहिले. पुढे अखंड काळ एकमेकांना अक्षरश: चिकटलेल्या अवस्थेत गर्दीत, गरमीत हरवत सापडत चालत चढत राहिलो. मध्ये कुठेतरी मंदिर अन् देव दिसू लागले पण नंतर तो भ्रम तुटला कारण आम्ही अर्ध्यातच पोहचलेलो. मग पुनः अखंड काळ समोर गेल्यावर एकदाच देवीचं दर्शन झालं. मग जेवण वगैरे झाल्यावर, परतीचा प्रवास. तो गर्दीचा अन् गरमीचा नसला तरी एक वेगळं च आव्हान समोर आलं – माझ्या एका पायाची शिर अशाप्रकारे लागली की तो पाय वाकवताच येईना. मग काय जो वाकतोय तो आधी खाली टाकून दूसरा रेटत नेणे असे करून पुनः ११२६. मग खरेदी हे ते झाल्यावर पुनः रेल्वे स्थानक. पुनः सर्वसाधारण तिकीट मात्र यावेळी आम्ही स्लीपर मध्ये शिरण्याचं नव्हे घुसण्याचं ठरवलं. गाडी फलाटावर आलेली अन् ती दोनच मिनिट थांबणार होती – घड्याळात रात्रीचे बारा वाजत आलेले. अन् खरा थरार सुरू झाला – गर्दीचा लोट पुढे मागे सर्वत्र. कसेबसे एकीला आट ढकलले. दुसरी आत जाणार तोच ती मटकन खाली बसली अन् मागचे लोक तिच्या वरुन आत जाऊ लागले. मी ओरडून ओरडून तिला विचारात राहिले – अगं उठ! खाली का बसलीस – घुस आत. खूप वेळाने मला ऐकू आलं – पाय फसलाय. माझ्यात कुठून जोर आला ठावूक नाही मी तिच्या पायाच्या आधाराने हात खाली नेला अन् तिचं पाऊल सरल केलं – तिला उठवून उभं करून ढकललं आत अन् मग दोन्ही हात दोन्ही बाजूच्या कठडयाना धरून सर्वशक्तिनिशी स्वत: ला आत ढकललं. हा सर्व थरार फक्त दोन मिनिटांचा. आत गेल्यावर रडारडी, आरडाओरडा झाला, एका महिला पोलिस मॅडम ने आम्हाला वरच्या बर्थ वर बसायला जागा मिळवून दिली. इतक्या गर्दीत कोण कोणत्या तिकिटावर प्रवास करतंय हे बघण्याची शुद्ध कोणालाही नव्हती. परत गेल्यावर पुढचे दोन दिवस एका पायाचे झालेले दोन पाय तसेच कायम राहिले. मग नंतर आले जागेवर. नंतर माहीत पडलं आम्ही परत आल्यावर तिथे चेंगराचेंगरी झाली अन् काही लोक मृत्युमुखी पडले. तरीही माझ्या अंगावर काटा देखील आला नाही हे एक वेगळं, भलतंच. आमच्या आजूबाजूच्या सर्वांनी आम्हाला मूर्खात काढलं – अर्थात माझे आई वडील सोडून. कधी कधी त्यांच्या मोकळेपणाची अन् निरंकुश आधाराची कमाल वाटत राहते मला.
आजही मी त्यावेळी माझ्या स्वभावाच्या विरोधात जाऊन ते सगळं का केलं असावं याच उत्तर माझ्याकडे नाही. मी देवभोळी नक्कीच नाही. श्रद्धा अन् भक्तीपोटी अशी जोखीम घेणारी तर मुळीच नाही.
मात्र या सगळ्यात मला स्वत: बद्दल एक गोष्ट समजली – जेव्हा जोखमीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा घाबरून जाण्याइतका वेळ मी स्वत:ला देत नाही – मी सर्व काही पार पडल्यावर शांततेत विचार करून जर आपल्याला यश आलं नसतं तर काय या विचाराने मला नंतर भीती वाटत राहते. पण त्यामुळे वेळ निभावून नेण्यासाठी अंगी आवश्यक ते धाडस, धैर्य जमा होतं हे महत्त्वाचं. नाही तर आहे त्यापेक्षाही परिस्थिती बिघडवणारे सुद्धा असतातच की.