‘महाकवी” हा शब्द फक्त आणि फक्त सोळाशे वर्षपूर्वीच्या आपल्या संस्कृत काव्य लेखनाने अजरामर झालेल्या कालिदासासाठी वापरला जातो.
महाकवी कालिदास हे दुसरा चंद्रगुप्त राजा विक्रमादित्य यांच्या राजदरबारात इ.स. ४०० चे सुमारास असलेले राजकवी संस्कृत लेखक होते, त्यांना भारतीय संस्कृत व प्राकृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जाते.अजूनही आपल्या साहित्यात *महाकवी* हा सन्मान एकमेव अद्वितीय फक्त कालिदास यांना आहे. त्यांच्या कालखंडास अनेक शतक झालीत पण त्याची बरोबरी अजूनही कुणीही करू शकला नाही.
कालिदासांच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो.कालिदासांनी ‘मालविकाग्निमित्र’ , ‘शाकुंतल’ आणि ‘विक्रमोर्वशीय’ ही ३ नाटके, ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’ ही २ महाकाव्ये, आणि ‘मेघदूत’ हे खंडकाव्य; तसेच ‘ऋतुसंहार’ हे निसर्गवर्णनपर काव्य रचले आहे.
अलकेचा अधिपती कुबेर याने त्याच्या एक यक्ष सेवकास हद्दपार केल्यामुळे तो रामगिरी (सध्याचे रामटेक) पर्वतावर येऊन राहू लागला अशी आख्यायिका आहे. या मधवर्ती कल्पनेस धरून महाकवी कालीदासाने मेघदूत हे काव्य रचले. त्याच रामटेकच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे कालिदासांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्मारक बांधण्यात आले आहे.
अनामिका हा शब्द आज महाकवि कालिदासाची अद्वितीयता सांगताना वापरण्यात आलेल्या श्लोकात वाचण्यात आला.
भारतीय संस्कृतीमध्ये या बोटाला अतिशय पवित्र मानले जाते. पूजा-अर्चा करताना देवाला गंध किंवा हळदी-कुंकू लावण्यासाठी याच बोटाचा वापर केला जातो. तसेच, लग्नाची किंवा साखरपुड्याची अंगठी याच बोटात घालण्याची परंपरा आहे.
पूर्वी कवींची मोजदाद करताना करंगळी वर पहिलं नाव कालिदास हे घेऊन मोजलं. पण पुढे त्याच्या तोडीचा कवी न सापडल्याने पुढे गणनाच होऊ शकली नाही. म्हणून करंगळीच्या पुढील बोटाचे नाव “अनामिका”(जिच्यासाठी नाव नाही अशी) हे सार्थच राहिले.
कालिदासाची अद्वितीयता सांगण्यासाठी नेहमी हा श्लोक उद्धृत करतात.
“पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः।
अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्
अनामिका सार्थवती बभूव॥”
आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस; महाकवी कालिदास यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. महाकवि कालिदासाच्या साहित्यावर अजूनही खूप विदयार्थी पीएचडी करता आहे.
त्यांचे नाव घेतले की आठवतात, अजरामर झालेले मेघदूत आणि शाकुंतलं.
महाकवी कालिदासांना मी या कवितेतून आदरांजली देतो .
*त्यांच्या सम तेच ते!!!*..
*llमहाकवी कालिदासll*
कालिदास श्रेष्ठ महाकवी ,
नाही जाहला दुजा कुणी..
गणनाही थांबे करंगळीवरी,
अनामिका सार्थ म्हणुनी दुसरी..
काळ्या मेघास दूत बनवूनी,
संदेश धाडीला काव्यातुनी..
प्रेम भावना खरी ती असे,
विरहाने प्रेमव्याकुळ यक्षही
भार्या दूर विरहकंठीता
कशी राहील पतीविना..
जलदा तू अतिजलद जा
प्रेमसंदेश पोहचव तिला..
संदेश वाचता मेघातला,
धारा बरसल्या नयनातूनी..
आठवणीस का फोटो हवा,
लोचनी नित्य पियाची छबी..
अनेक शापित यक्ष इथं
अजूनही या धरेवरी..
कामासाठी दूर दूर ते
वाट पाहते कांता घरी..
शकुंतलेच शाकुंतल ही ,
प्रेमानंतरचा विरह तो..
विसरला दुष्यन्त कसा,
नृप तो, सुंदर प्रियेस हो..
प्रेमाची आठवण अंगठी
प्रियेस सुंदर भेट दिली ..
काळ निष्ठुर तो जाहला
नदीत पडूनी हरवली..
शाप दुर्वास मुनीचा खरा,
सत्यात तो का उतरला..
शाकुंतलवदन कोमेजले,
स्मृतिभंश राजाचा जाहला..
उदास फिरे वनवनात ती,
सभोंवती हिरवेगार असे..
पिया येण्या तो विसरला,
हिरवा रंग काळा दिसें..
भेटण्यास बाळासवे,
गेली ती त्याच्या घरी..
ओळख राजास नसे,
स्मृतित नसे तिच्या स्मृति..
दुःख अतीव कोसळता,
मार्ग नाही दिसें आता..
अविचार कधी येता मनी,
भारत बाळ आठवे तिला..
सौभाग्य तिचे परतले,
देवच जणू मत्स्यरूपातुनी..
त्याच्यातूनी अंगठी मिळे,
पाहता राजा आली स्मृति..
आनंदी आनंद चोहीकडे,
शेवटास सर्वं गोड जाहले ..
कालिदासांच्या कवित्वाने ,
शाकुंतल नाट्य अवतारले ..
दिन प्रथम आषाढाचा
महाकविंचा खास दिन तो..
त्यांच्या सम फक्त्त तेच ते,
इतिहास अभिमानाने सांगतो..
आषाढ शुद्ध प्रतिपदा.
महाकवी कालिदास दिन!!
या अद्वितीय महाकवीला माझाही मानाचा मुजरा..
#सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग जुलै २०२६