श्रीधरची दुसरी कविता:
*'निरांजन'*
कधी अचानक उतरते एक तिरीप
अस्वस्थ अंधार चिरत
सरळ खोल आत,
आणि मग घेता येतो मोकळा श्वास मला …
मुक्तपणे तपासून बघतांना
प्रतिबिंब माझ्याच जाणीवा नेणीवांच !
कुठल्याही स्थापित संकेतांना
बांधील नसलेला मनाचा धूसर आरसा
दाखवून देतो स्वतंत्र, स्वायत्त
अस्तित्व भान माझं,
माझ्याच विचारानुभावातून प्रगटलेल …
ज्या गहन तिमिरातून
स्वत:लाच ओरबाडत,
झिडकारत, लाथाडत
शोध घेतलाय स्वत:चा ,
तो तिमिर जसा माझा
तसाच माझ्या जखमातूनच
वितळलेला, उधळलेला, उजळलेला
हा लख्ख प्रकाश देखील माझाच,
दाखवू नका त्यावर कुणी आपला
पिढीजात हक्क,
असू द्याना माझाच ताबा त्यावर !
कुठल्याही देवळातल्या सत्याला
आव्हान द्यायचं मी कधी
आणल नाही मनात,
माझ्या देव्हाऱ्यात तेवलेल्या
ह्या निरांजनाचा प्रकाश एव्हढा
कां छळतोय कुणाला ?
– श्रीधर जहागिरदार
*****
श्रीधर,
मला जे उमगलं आहे ते रेखाटतो आहे. वाच तू हे , आणि मला सांग कुठं मी कमी पडतो आहे, तुझ्या कवितेला आकलनायला.
*निरांजन*
अंधार अस्वस्थ करणारा, अज्ञानाचा, गोंधळाचा. लागतो प्रकाश, एखादी तिरीप तपासून बघायला.
तपासायचं, कुठलीही बंधन न ठेवता, जर तर नको! तपासताना बघायचं स्वत:ला प्रतिबिंबात.
आपल्याला स्वतःला बघायला प्रतिबिंबच तर असतात, संथ पाण्यावर उमटलेली, स्वच्छ काचेवरुन परावर्तीत झालेली, कधी कुणाच्या डोळ्यात दिसलेली. हो प्रतिबिंबच मदत करणार शोधायला, नाहीतर मी पाहणार कसा मला स्वत:ला!
प्रतिबिंब ते ही जाणीव, नेणीवाचं. जाणीव, मी आत बाहेरुन कसा? अनुभवांच विश्लेषण करीत विचारांच्या शिडीनं मनाच्या खोल डोहात उतरत शोधायची ती जाणीव नेणीवची प्रतिबिंबं.
आपल्याच व्यक्तीमत्वाची अपरिचित, अमूर्त, अतार्किक, अशब्द अशा नेणीवाचं शोधणं ते ही अबोध मनातलं, हे तुझ्यातला तो कवीच जाणे…
मनाचा आरसा धूसर असला तरी कुठलंही दडपण न ठेवता स्वत:च स्वरूप दाखवून देणारा. त्यात दिसणारं रूप स्वत:चं, आपलंच, स्वत:च शोधलेलं, अनुभवातून मुरलेलं, उरलेलं आणि विचारांनी पछाडलेलं. तो 'मीपणा'चा अनुभव, आत्म-भान!…आणि मग जाणवणारा मोकळा श्वास.
कठीण असतं हे मिळवणं. अंध:काराशी झगडणं सोपं नसतं. स्वत:ला झिडकारणं अशक्य असतं. ओरबाडणं, लाथाडणं सारंच कठीण, स्वत:च्या चिंध्या-चिंध्या करणं हे!
जखमांतून भळभळणारं असं बरंच निघतं. तिथूनच लाव्हा वितळावा, उधळून बाहेर यावा तसा निघतो, मला जाणवणारा मी, लख्ख प्रकाशासारखा… तोच मी, माझाच. कवीचं हे स्वत:ला सापडणं, आपल्या मनातही जीरतं.
प्रस्थापित का करतात जाच, येणाऱ्या स्वतंत्र विचारांचा? असतं की प्रत्येकाचं स्वातंत्र्य विचार करायचं. उभारले असतात आपले विचार, शोधली असतात तत्व आपली, स्वत:शी वाद घालून.
काळोख ही ओळखला असतो प्रयत्न करूनआणि उजेड ही शोधून काढला असतो…
निरांजन आपलं, आपल्यासाठी, आपलेच, प्रयत्नानं गवसलेलं मौल्यवान असं काही, अखंडपणे तेवत ठेवणारं. का कुणाला देणं घेणं त्याचं?
मागच्या अनुभवांचे पाश, सारे संभ्रम आणि इतरांच्या अपेक्षा ह्या सगळ्यातून सुटका होण्याचं निश्चितच आपण ठरवू शकतो.
स्वत:चं आणि भोवती असणाऱ्यांनी घातलेली बंधनं झुगारुन, सगळं काही बदलण्यासाठी शक्ती देणारा, एक वेगळा मार्ग तुझ्या कवितेत जाणवतो…
गुरुकृपेची आस सगळ्यांचं असते, मनंही गुरुचं कार्य करु शकते, असं जाणवून देणारी ही तुझी कविता.
१७ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
#जुलै२०२६