“जिथे एका विचाराचा दुसऱ्या विचाराशी संबंध म्हटलं तर आहे, अन् म्हटलं तर नाही……”
आता कुणाचाच आधार नकोय. सतत कुठल्यातरी संघर्षात टिकून राहण्याच्या धडपडीत कुणाचा न कुणाचा आधार शोधण्याची फारच वाईट खोड लागली पण कुंपणानेच शेत खाण्याचा प्रयत्न झाला आणि नियतीने एक खूप चांगला धडा शिकवला…….
फार उशिरा लक्षात आलं की आपल्याला सर्वात चांगला आधार देणारेही आपण स्वत:च असतो आणि कुणावर शंभर टक्के डोळे झाकून विश्वास ठेवावा, कुणाच्या खांद्यावर विश्वासाने डोके टेकावे असेही आपण स्वत:च असतो आपल्यासाठी……..
लहानपणी अंधाराची फार भीती वाटायची, उजेडातच सुरक्षित वाटायचं, पण आता गोष्टी फारच बदलल्या. आता अंधारच हवाहवासा वाटतो, उजेडात फारच असुरक्षित वाटतं, गुदमरायला होतं अक्षरश:…….
पण का होत असावं असं…….?
कदाचित असं असेल की अंधारात नको असलेले चेहरे बघावे लागत नाहीत आणि हवे असलेले चेहरे नजरेसमोर आणण्याचं स्वातंत्र्य लाभतं. क्षणात सर्व चिंता विसरल्या जातात आणि मनात उभं राहतं हवंहवंसं वाटणारं, स्वप्नातलं सुंदर विश्व जिथं मानवी मन निसर्गापेक्षाही सुंदर आहे. असं स्वप्नातलं विश्व रंगवायला मग रात्रीचा अंधारही अपुरा पडायला लागतो. उजेडाच्या महाजंजाळात अस्वस्थ असणाऱ्या स्वत:शी संवाद साधायला अंधाराची फारच मदत होते……..
सतत प्रकाशाचा हव्यास ठेवणाऱ्या माणसाला उन्हाची झळ लागतच नसेल का? की मृगजळासमान असणाऱ्या या प्रकाशाच्या मागे धावताना तो ही झळ सहन करतच राहतो आणि मग सहनशक्ती संपली की नाइलाजाने उन्मळून पडतो…….?
कुठल्यातरी मृगजळामागे बेभान होऊन धावण्याऐवजी थोडं स्वत:चं भान ठेवलं तर बिघडलं कुठे……?
अंधारात असतांना मनात असेच विचारांचे असंख्य आवर्त उठतात आणि प्रवास करत करत किनाऱ्यावर विसावतात…….
उजेडातलं जग जसं जसं दिसेनासं होतं तसंतसं अंधारात एकेक नवीन व्यक्तिरेखा मन:पटलावर आकार घेतात आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या परंतु प्रत्यक्षात कधी न घडणाऱ्या घटना साकार होतात. मन हरखून जातं नि लहान मुलाप्रमाणे स्वप्नांच्या बागेत मुक्तपणे बागडत राहतं…….
रोज तोच दिवस, तीच रात्र, तेच स्वप्न, तेच स्वप्नातून जागं होणं आणि पुन्हा त्याच दिवसाची तीच सुरूवात. हे असं रटाळ जीवन जगून काय मिळतं माणसाला? पण नाही….. स्वत:च स्वत:च्या भोवती उभ्या केलेल्या चक्रव्यूहातून सुटण्याच्या, बाहेर पडण्याच्या धडपडीत माणसाचा अभिमन्यू होऊन जातो…….
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६