संत कबीर आपल्या दोह्यात लिहितात,
“गुरु गोविंद दोनो खडे
काके लागू पाय l
बलिहारी गुरु अपने
गोविंद दियो बताय l”
जर तुमच्यापुढे साक्षात गुरुवर्य आणि ईश्वर उभे असल्यास प्रथम चरणवंदन कोणास करायचं? या प्रश्नाचे उत्तर देताना संत कबीर म्हणतात,
“ज्याच्या मुळे तुम्हांला ज्ञान रुपी परमेश्वर कळाला त्याची महती मोठी आहे.. म्हणून प्रथम वंदन गुरूला करावे “
गुरुवर्यांचे गुणाचे वर्णन शब्दातीत असतें. हे सांगताना संत कबीर त्यांचे दोह्यात लिहितात
“सब धरती कागज करू
और लेखनी सब वनराय l
सात समुंदरकी मसी करू
गुरु गुन लिखा न जाय l “
“संपूर्ण धरतीचा कागद केला व वनराईचा बोरु केला आणि सातीसमुद्र जळाची शाई केली तरी ती गुरुचे गुण लिहिण्यास अपुरी पडेल “
काल खूप जणांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुंवर या विषयावर खूप सुंदर लेखन केले. तोच विषय घेऊन लिहिण्याचा मोह मलाही झाला. आज समारोपाच्या आधीचा तिसावा लेख लिहितो आहे.
गुरुपौर्णिमेस गुरूंवरचे लेख वाचून मला आठवली ही कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची कविता.
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू
बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील
फिरते फुलपाखरू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू…
सुग्रण बांधी उलटा वाडा,
पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे
बेडकिचे लेकरू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू…
कसा जोंधळा रानी रुजतो,
उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू…
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
कड्या दुपारी पऱ्ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू…!
आपण आईला प्रथम गुरु मानतो प्रथम अक्षर ओळख करून देणारी आई,नंतर शाळेतील शिक्षक कठीण समस्या सोडवणारे नेहमी मागे उभे राहणारे पिता, मोठा भाऊ, बहीण, किंवा अध्यात्मिक गुरु आणि चांगले मार्ग दाखवणारे मित्रही असे अनेक मंडळी गुरुस्थानी असू शकतात.
गुरु कसा कसे असावा याचे उदाहरणं द्यायचे झाले तर खूप देता येतील पण कसा नसावा हे सांगताना मला गुरु व्यासांच्या महाभारतातील एक नाव नजरेपुढे येते ते राजगुरू द्रोणाचार्याचे. आपली राजनीष्ठा जपण्यासाठी त्यांनी एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागणे हा मला क्रूरपणाचा पक्षपातीपणाचा कळस वाटतो. गुरुश्रेष्ठ द्रोणाचार्यने अर्जुनासारखे अनेक चांगले शिष्य घडवले असले तरी या कृत्याचा कलंक त्यांना कधीही पुसता येणार नाही.
द्रोणाचार्यच्या पुतळ्यास गुरुस्थानी मानून एकलव्याने शिक्षा घेतली होती मनोमनी तेच त्याचे गुरु होते, त्याने तो उजव्या हाताचा अंगठा हसत हसत दिला आणि आदर्श शिष्य कसा असतो याचे उदाहरणं जगताला दिले.
आता या कलीयुगातील गुरु स्वतः नीटचे पेपर फोडून लाखो रुपये गोळा करतात त्यांना गुरु म्हणावं का हाच मोठा प्रश्न आहे. नंतर निराशेने अनेक युवकांनी केलेल्या आत्महत्या चिंताजनक आहे. शिक्षण संस्था विद्यादानाचे मंदिर न राहता विद्या विक्री करणारे व्यापारी बाजारू केंद्र झालेले चित्र दिसू लागले आहे.
निसर्ग मात्र नेहमीप्रमाणे निस्पृहतेने सर्वाना सारखे शिक्षण देतो आहे फक्त तुमचे डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे
गदिमा कवितेत निसर्गाला गुरु मानून सत्य काय तेच सांगितलं आहे. राईट बंधूनी विमानाचा शोध पक्षाना उडताना पाहून लावला. बऱ्याच गोष्टी निसर्गच तुम्हाला शिकवत असतो. मुंग्या, फुलपाखरे, मधमाश्या आणि सुगरण पक्षी यांसारख्या छोट्या-छोट्या जीवांचे निरीक्षण करून आपण चिकाटी, आनंद आणि कष्टाची शिकवण घेतो. निसर्ग हाही एक गुरु असतो.
सध्या वर्षा ऋतूतील हिरव्या निसर्गाचे वर्णन करणारी आणि याच निसर्गाला गुरुस्थानी समजून केलेली रचना,
*गुरुदक्षिणा*
सुंदर किती ही धरा दिसते
पाहुनी लिहिल्या या ओळी..
आई आमुची माय भूमिही
लेकरांची काळजी ती घेई..
नभ लपले ढगात काळ्या ,
पाऊस येई तो पुन्हा पुन्हा..
हिरव्या कातळ उंच डोंगरा,
शुभ्र झऱ्यांचा फुटला पान्हा..
वसुंधरा चिंब भिजली
शांतवले तिचे तप्त तन..
बिजपोषणास सज्ज ती
आली पिके वर तरारून..
केका गुंजती वनीरानी
हाका घालतो आवर्जून ..
उघडे तो मोर पिसारा
विसरुन सारे देहभान..
निळे जांभळे केशर तुरे,
रंगाचे कसे करावे वर्णन..
मातीला हो सुगंध भारी ,
करतो मत्त मयूर नर्तन..
रानमाळ तृप्त झाले ओले,
बरसल्यात सरी वर सरी ..
इंद्रधनूचे तोरण शोभे..
जाहली नवयौवना सृष्टी..
गुरुपौर्णिमेचा दिन विशेष,
गुरु शिष्य या नात्यासाठी..
निसर्ग जरी असे अबोल ,
गुरु आहे खरा सर्वांसाठी..
आई वडील हो आद्यगुरु ते
अक्षरे गिरवून शिक्षण सुरु..
शिक्षक मित्राप्त स्थिती अन
असंख्य निसर्गात आमचे गुरु..
जीवन आमुचे पडे अपुरे
विद्या खूप शिकण्यासाठी..
शोध गुरूंचा नित्य घेऊनी
विदयार्थी राहू सदासाठी..
पुस्तकं ग्रंथ गुरुच तेही
वाचूनी ज्ञान ते मिळते..
गुरुआशीर्वाद लाभाण्या
चरण गुरूंचे मात्र लागते..
*दृष्टी अनुभव देई शिकवण..*
*निसर्गही असतो आमचा गुरु,*
*राखून निसर्गाचे संतुलन*
*गुरुदक्षिणा त्यास ही देवू*
अनेक लेख इथं लिहून झाले
एकत्र हो पन्नास जणांचे..
लेखन शैली भिन्न शिकुनी
गुरु नकळत झालो एकमेकांचे..
सर्वाना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
आणि नमस्कार.