जीवनाची दुहेरी वाट
मानवी अस्तित्वाशी जोडल्या गेलेली दोन भिन्न, पण एकमेकांना अतिशय पूरक मानसिक अवस्थांचे अलिखित करारपत्रे म्हणजे मानवी मनाची ‘स्वीकारात्मकता’ आणि ‘सकारात्मकता’.
मानवी जीवनात घटनांचे संकलन होत असते; त्या घटनांशी आपण कसा संबंध ठेवतो, यावर जीवन घडत जाते. परिस्थिती एकच, पण माणसे वेगवेगळी प्रतिक्रिया देतात. कोणी कोसळतो, कोणी उभा राहतो, तर कोणी वाट काढत पुढे जातो. मुळात फरक घटणेच्या स्वीकारात आणि सकारात आहे. माणसाच्या या दोन अतिसूक्ष्म आणि महत्त्वाच्या मानसिक अवस्था आहेत.
आजच्या काळात “सकारात्मक रहा” हा सल्ला इतका सरधोपट झाला आहे की, तो ऐकतानाच अनेकदा मनात नकार येऊ लागतात. कारण वेदनेच्या क्षणी थेट सकारात्मकतेची अपेक्षा ठेवणे, हे मानवी स्वभावाशी विसंगत आहे. म्हणूनच सकारात्मकतेच्या आधी येते ती ‘स्वीकारात्मकता’. जिच्याशिवाय सकारात्मकता अपूर्ण असते; कधी ती खोटीही ठरते.
स्वीकारात्मकता म्हणजे शरणागती नव्हे, तर ‘जे आहे’ त्याच्याशी प्रामाणिक होणे. वास्तवाशी शांत आणि ठामपणे जोडले जाणे.
जीवनात जे घडते, ते आपल्या इच्छेनुसारच घडेल असे नसते. इच्छेविरूद्ध घटणा घडतात, तेव्हा माणूस अस्वस्थ होतो. वेदना, दुःख, अपयश, आजार, एकटेपण या सगळ्यांवर “हे असं नसावं” असा अंतर्गत विरोध करून मन थकते. “हे घडले आहे. मला आवडले नसले तरी मी ते नाकारत नाही,” हा झाला स्विकार. अशा स्वीकारात वेदना असली तरी संघर्ष नसतो. स्वीकारात्मकता मनाला थांबवते. काळाचा वेग कमी करून स्वतःकडे पाहण्याची, आत डोकावण्याची संधी देते. बाहेरपेक्षा आतल्या विश्वाशी जोडलेला स्वीकार अंतर्मुख असतो.
घटनेचा स्वीकार केल्यानंतर येते ती सकाराची अवस्था. सकारात्मकता म्हणजे आशावाद नाही; ‘होऊ शकते’ याकडे केलेली वाटचाल होय. दुःख अंतिम सत्य नाही, हे सकारात्मकतेला माहीत आहे. ‘परिस्थिती बदलणे शक्य नसले, तरी तिचा अर्थ बदलू शकतो,’ ही अर्थ शोधण्याची प्रक्रिया सकारात्मकतेचा केंद्रबिंदू आहे.
एकदा का घटणेचा स्विकार झाला की, त्या घटणेचे अनुभवात रूपांतर होते. मग सुरु होते शिकण्याची क्रिया. यातून पुढची दिशा मिळते. विचारातून कृतीकडे जाण्याची हिंमत येते. अशी सकारात्मकता कृतीला जन्म देते.
स्वीकारात्मकता माणसाला थांबवते. सकारात्मकता माणसाला चालवते.
फक्त स्वीकार असेल तर जीवन स्थिर, तर कधी जड होते. फक्त सकारात्मकता असेल, तर ती वास्तवापासून दूर होते; आभासी आनंदाचा मुखवटा धारण करू शकते.
भारतीय तत्त्वज्ञानालाही हा समतोल अभिप्रेत आहे. स्थिती स्वीकारणे म्हणजे यथार्थबोध होऊन कर्तव्याने पुढे जाणे, अर्थात प्रयत्न करीत राहणे. गीतेतील ‘स्थितप्रज्ञता’ ही स्वीकारात्मकतेच्या जवळ आहे, तर ‘कर्मयोग’ सकारात्मकतेचा आग्रह करतो.
- अपयश स्वीकारल्याशिवाय आत्मपरीक्षण होत नाही.
- आजार स्वीकारल्याशिवाय उपचारांचा मार्ग सापडत नाही.
- नात्यातील ताण स्वीकारल्याशिवाय संवाद घडत नाही.
प्रत्येक स्वीकारानंतर सकारात्मक दृष्टी नसेल, तर जीवन तिथेच थांबते. स्वीकारात्मकता अस्तित्वाची खोल समज आहे; ती माणसाला वास्तवाशी जोडते. सकारात्मकता ही अस्तित्वाची पुढची वाटचाल आहे; ती माणसाचे भविष्य घडवते.
जीवनाचा खरा अर्थ सुखात नाही, तर समजून घेण्यात आहे. ही समज स्वीकारातून येते आणि सकारात्मकतेतून पुढे जाते. दोघांचे हे संतुलन माणसाला जिवंत ठेवते.
स्वीकार करा— कारण ते सत्य आहे. सकारात्मक रहा— कारण पुढे जात राहणे हे जीवन आहे.
©️ माधूराज, नागपूर