रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहर फुललेला होता . वर निळे आकाश, लांबलचक रस्ता , लाल भडक गुलमोहर आणि या सर्वांच्या मधून आपल्याच तंद्रीत चालणारी ती. जसं जसे तिच्या व त्याच्यातील अंतर कमी होत होते, तसतशी तिची चाल जलद होत होती. असे अनेकदा व्हायचे, कधी दुःख कधी चिंता कधी संतापाचा उद्रेक तर कधी आनंदाची परिसीमा, कधी अचानक मनाला भासलेली शांतता …. सर्व सर्व भावना त्याच्या जवळ जाऊन न बोलता ही सर्व काही सांगून ती अंतर्बाह्य मोकळी होऊन जायची . त्याला भेटले की तिला आपल्या अगदी जवळच्या कोणालातरी भेटल्यासारखा प्रचंड आनंद होऊन जायचा. आणि म्हणूनच घरी दारी ,मित्र मैत्रिणी, ऑफिस … कुठेही काहीही घडले की ते सर्व त्याला सांगण्यासाठी ती सुसाट धावत सुटायची .त्याच्याजवळ यायची ,त्याच्या बाहूपाशात आपल्या भावना झोकून द्यायची . त्याच्या जवळ अंमळ बसली की आपोआपच ती नेहमीसारखी सामान्य होऊन जायची . आणि मग मनाने अत्यंत शांत व आनंदी होऊन ती हळूहळू घरी परतायची व आपल्या कामात गर्क होऊन जायची . आनंदाची काही गोष्ट घडली असेल तर ठीकच आहे पण जर कधी मन दुखावले गेले असेल ,जखमेवर कोणी जाणून-बजून मीठ चोळले असेल , कोणी केलेला अपमान , दुय्यम वागणूक असेल तरीसुद्धा ,त्याला भेटून आणि आपले दुःख , संताप , उद्वेग त्याला सांगून झाले की मग तिला एकदम मोकळे वाटायचे आणि नकळतच पूर्ण जगाला ती माफ करून टाकायची व पुन्हा आपल्या निर्व्याज , हसऱ्या खेळकर जगात परत यायची.
पण आज मात्र कारण काही वेगळेच होते. तिने वर्तमानपत्रात आज सकाळीच एक अत्यंत वाईट बातमी वाचली होती आणि ती नखशिखांत हादरली होती . कशीतरी सकाळपासूनची कामे हातावेगळी करून तिने पायात चप्पल अडकवली आणि घराबाहेर पडली ती त्याच्या दिशेने जवळ जवळ धावतच निघाली. जसजसे दोघांमधले अंतर कमी होत होते तसतसा तिचा वेग अजूनच वाढत होता .चेहऱ्यावर घर्मबिंदू चमकत होते .आत्तापर्यंत कधीही त्याच्याकडे येताना तिने दोन्ही बाजूला उभे असलेले गुलमोहर ,निळे , निर्मळ आभाळ , रस्ता या सगळ्याचे मनापासून कौतुक केले होते आणि निसर्गाच्या या अप्रतिम रंगसंगतीवर खुश झाली होती. कधी जर संध्याकाळ व्हायला आली असेल तेव्हा तर निळ्या आकाशावर गुलाबी – केशरी रंग चढायला सुरुवात झालेली असे मग त्या सौंदर्यावरून तिचे लक्ष दुसरीकडे कुठे जायचेच नाही. पण आज मात्र तिचे या कशाकडेच लक्ष जात नव्हते, तिच्या चेहऱ्याची रयाच उडून गेली होती .
तिचा श्वास तेज गतीने चालत होता . जवळजवळ धापा टाकतच ती त्याच्यापर्यंत पोहोचली. आणि तिची नजर विस्फारली. डोळ्यांत पाणी जमू लागले . म्हणजे तिने आज वर्तमानपत्रात जी बातमी वाचली होती ती खरी होती तर…..
तिचा जिवलग, निकटवर्ती ,प्रियतम, आधारस्तंभ… ही सर्व बिरुदे मिरविणारा तो…. म्हणजेच असंख्य शाखा झोक्यासारख्या लांबलचक असलेल्या असलेला भव्य वटवृक्ष … त्याला तोडण्याचे काम चालू झाले होते. ती धावत तिथे गेली , तेथे काम करणाऱ्या सर्व मजुरांना थांबवू लागली , हात जोडून विनंती करायला लागली . “हे तुम्ही काय करता आहात!!! नका कुऱ्हाड उचलू, नका घाव घालू… त्याचे अस्तित्व नष्ट नका करू… आणि तसेही वृक्ष नष्ट करू नका हे माहीत आहे ना !!निसर्गाचे अस्तित्व नष्ट केले तर सृष्टीचा समतोल नष्ट होईल , उष्णता वाढेल सर्व जग , आपण सगळे नष्ट होऊ …. तुम्हांला कळतय का “ ती पुन्हा पुन्हा हेच बोलत होती , विनवणी करत होती, डोळ्यातून अश्रुधारा सतत झरत होत्या. सर्व मजूर काम थांबवून एकमेकांकडे बघून हसत होते . तिच्या डोक्यावर परिणाम झालाय असं समजत होते . इतक्यात तिथे त्यांचा मुकादम आला . त्याने तिला थांबविले आणि सांगितले की इथे आता एक भव्य इमारत संकुल बनणार आहे . आणि म्हणून इथली सगळी झाडे काढून टाकणार आहोत. आज या झाडाचा नंबर आहे. आणि तिला त्याने वाटेतून दूर व्हायची विनंती केली. आता ती हुंदके देऊन रडायला लागली. वडाच्या बुंध्याला धरून , मिठी मारून , त्यावर डोके टेकून तोडण्यास विरोध करू लागली. परंतु या दुर्बळ विरोधाला काहीच अर्थ उरला नव्हता . तिच्याही हळूहळू हे लक्षांत येऊ लागलं. जे घडायचे ते घडणारच होते . आणि तिच्या नशिबी कायम असलेला भयंकर एकटेपणा पुन्हा तिचा साथीदार होणार होता…
सुषमा ठाकूर.