जय हिंद
२०१७ ची ती दिवाळी माझ्या अजून स्मरणात आहे. आम्ही सर्व घर सजविण्यात ,चकली ,चिवडा ,करंजी , लाडू बनविण्यात मग्न होतो .नवीन कपडे ,फुले आणि पाहुणे यांनी घर गजबजलेलं होतं . आणि तितक्यात माझी मुलगी ऐश्वर्या आतून धावत आली . ती खूप उत्साही दिसत होती . हातात लॅपटॉप होता . “मां , हे बघ मला ई-मेल आली आहे . इंडियन आर्मी ( भारतीय सेने) कडून बोलावणे आले आहे. “. मोठ्या अधीरतेने तिने सांगितले ,” आणि मला उद्याच निघायला लागेल कारण की जॉइनिंग डेट परवाची आहे. “ माझ्या हृदयाची धडधड एकदम वाढली . हे काय !!! ध्यानीमनीही नव्हते , की इतक्या लवकर तिला बोलावतील.
खरे तर नुकतीच इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा तिने दिली होती. कॅम्पस इंटरव्यू मध्ये टाटा कन्सल्टन्सी मध्ये निवड ही झाली होती . ही आनंदाची बातमी ऐकून , मोठ्या हर्षाने , मी तिचे कॉलेजमधून आल्याबरोबर तबकात अक्षता, निरांजन लावून औक्षण केले होते . देवाचे खूप खूप आभार मानले होते. पण त्यानंतर दोन-तीन दिवसातच तिच्या वडिलांनी तिला वर्तमानपत्रात आलेली एक जाहिरात दाखविली होती . ज्यात भारतीय सेनेत अधिकारी पदावर सामील होण्यासाठी दिलेला फॉर्म होता. तिला त्यांनी सांगितले की तुला साहसी खेळाची (adventure sports) खूप आवड आहे ना !! जर तू भारतीय सेनेच्या शारीरिक व मानसिक अशा कठीण चाचणीतून
यशस्वी होऊन निघालीस तर , एका अत्यंत वेगळ्या जगात तुला प्रवेश करता येईल . आणि एक उच्च दर्जाचे, साहसी व सन्मानपूर्वक जीवन जगायला मिळेल. तिनेही विचार केला , खरंच प्रयत्न तर करून पाहू…. आणि तिची जिद्द ,आत्मविश्वास व बुद्धी पणाला लावून ती या सात दिवसांच्या लागोपाठ होणाऱ्या शारीरिक व मानसिक चाचणींमध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. तिच्याबरोबर अनेक असे मुले मुली होते ज्यांचा हा चौथा किंवा पाचवा प्रयत्न होता. काही उत्तीर्ण झाले आणि काही पुन्हा एकदा अनुत्तीर्ण च राहिले . पण उत्कट जिजीविषेमुळे मुळे त्यांनी पुढच्या प्रयत्नांनाही लगेच सुरुवात केली होती.
तर , ऐश्वर्या उत्तीर्ण होऊन परत आली , पुढे येणाऱ्या दिवाळीच्या तयारीत आम्ही गर्क झालो. आणि अचानक आज ही ई-मेल आली….
हातात एकच दिवस असताना अक्षरशः धावपळ करून सर्व तयारी केली . कागदपत्रांचे झेरॉक्स आणि कितीतरी तांत्रिक बाबींची पूर्णता तिने व तिच्या लहान भावाने केली. चेन्नई ला एक वर्षाचे प्रशिक्षण (training) होते. त्यासाठी दुसऱ्याच दिवशीचे विमानाचे तिकीट तिचे व तिच्याबरोबर सोबत म्हणून तिचा धाकटा भाऊ म्हणजेच माझा मुलगा सूर्यवर्धन याचेही तिकीट काढले . तो तिला चेन्नईच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये सोडून परत येणार होता.
आणि आम्हा सर्वांचा निरोप घेऊन तिने आपल्या पुढील धाडसाच्या प्रवासाला सुरुवात केली…. अत्यंत व्याकुळ मनाने तिला आमच्या सर्वांपासून , घरापासून दूर करताना मनात विचारांचे काहूर माजले होते. घेतलेला निर्णय ठीक आहे ना !!! कधी काही दुर्दैवी योग आला आणि माझ्या चिऊताईच्या जीवनावर जर संकटांचा पहाड कोसळला आणि इतक्या लहान वयात जर तिचे जीवनच संपून गेले तर आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही हे असे विचार वारंवार मनात येत होते. आणि अशा अस्वस्थ मनस्थितीतच आम्ही तिला निरोप दिला.
त्यानंतर तिच्या अतिशय खडतर अशा ट्रेनिंगला सुरुवात झाली.
ट्रेनिंगच्या सुरुवातीलाच चेन्नईला गेल्याबरोबर सगळ्यात प्रथम तिचे लांब सडक केस कापून बॉय कट करविला आणि तिच्याकडून तिचा मोबाईल काढून घेतला .
पहाटे साडेतीन वाजल्यापासून त्यांच्या दिवसाला सुरुवात व्हायची . धावणे, व्यायाम, आडव्या बांधलेल्या दोरीवर चालणे, उभ्या लटकलेल्या दोरीवर चढणे, ( Rope climbing – horizontal and vertical) , रस्त्यात पसरलेल्या खडीवर कोलांटी उड्या मारणे, ( Rolling) त्या खडीवरच रांगणे, हातापायाच्या रक्तबंबाळ अवस्थेतही उठून धावणे, दहा मीटर उंचीवरून पाण्यात सूर मारणे, दगड धोंड्यातून रांगत रांगत रस्ता शोधून बाहेर निघणे, रस्त्यावर बनवलेल्या खोल खड्ड्यात उडी मारून पुन्हा वर चढणे , काट्याकुट्यातून , जंगलातून रस्ता शोधत दिवसभर व रात्रभर सतत चालणे, survival प्रक्रियेमध्ये कोंबडीला दोन बोटांच्या मध्ये पकडून ,मारून कच्चेच खाणे यासारखे अनेक अत्यंत कठीण व काही वेळा तर अशक्य वाटतील अशा अनेक गोष्टी अत्यंत कठोरपणे आणि शिस्तीत करून घेतल्या जात होत्या. का नाही करणार !!! त्यांना एक बहादुर सैनिक तयार करायचा असतो ना… त्याबरोबरच ऑफिसर म्हणून ही अनेक गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक असते . त्यामुळे सकाळी नऊ पासून ते संध्याकाळी पाच पर्यंत अनेक विषयांचे अनेक वर्ग भरत असत , शिकवले जात असे . ऐश्वर्या I T engineer असल्याने कम्प्युटर्स शी संबंधित तसेच द्रोण टेक्नॉलॉजी शी संबंधित अनेक वर्ग तिला करावे लागत होते. त्यानंतर पुन्हा त्यांचे शारीरिक व्यायाम ( ज्याला सैनिकी भाषेत “रगडा “ म्हणतात ) सुरू व्हायचे. रात्री दोन पर्यंत हा रगडा चालायचा आणि पहाटे साडे तीन पासून दुसरा दिवस सुरू व्हायचा. ऐश्वर्याची आणि आमची भेट सहा महिन्यानंतर म्हणजे एक वर्षाच्या ट्रेनिंगचा अर्धा काळ गेल्यानंतरच्या मध्यंतरात झाली. पंधरा दिवसाच्या त्या सुट्टीत ती घरी आली तेव्हा पहिल्यांदा तिला ओळखताच आले नाही. एक तर बॉय कट दुसरे म्हणजे चेन्नईच्या भीषण गर्मीत रस्त्यांवर रोल करविल्याने व दिवस रात्र चालणाऱ्या रगड्याने हात, पाय ,चेहरा यांचा रंग रापलेला होता. शरीर अत्यंत काटकुळे झाले होते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या एकदम उत्साही होती. आल्याबरोबर दमणे वगैरे विसरून तिने आपल्या धाकट्या भावाला जो तेव्हा कॉलेजमध्ये होता , त्याला आपल्या खांद्यावर बसवून घरभर फिरविले आणि व्यायामाचे अनेक अवघड प्रकार आम्हाला करून दाखविले. व अशा तऱ्हेने 7 दिवसाची सुट्टी संपवून पुढील ट्रेनिंग साठी ती परत चेन्नईला गेली . तिची ती शारीरिक हालत बघून अर्थातच मला खूप वाईट वाटत होते, पण तिच्या मनस्थितीतील सकारात्मक बदल पाहून आश्चर्यही वाटत होते. पुढील सहा महिन्यातील ट्रेनिंग मध्ये ही असेच अवघड शारीरिक व मानसिक रित्या तयार करून एक शेवटचा जबरदस्त प्रकार म्हणजे “जोश रन “ करविला . त्यात युद्धाचा गणवेश घालून, 20 किलोचे वजन पाठीवर लादून, हेल्मेट आणि आठ किलो वजनाची बंदूक लटकवून ४० किलोमीटर cross country run , प्रत्येकाला ठराविक वेळेत पूर्ण करायचा असतो. त्यात संध्याकाळी सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता या धावण्याची इतिश्री होते . अत्यंत कठीण अशा या ट्रेनिंग मधून तावूनसुलाखून निघाल्यावर असते ती पासिंग आऊट परेड. जे cadets या सर्वात यशस्वी होतात त्यांची ही परेड असते. आई-वडिलांसकट सर्व नातेवाईक मित्र यांना आमंत्रित केले जातं आणि अनेक दिवसाच्या सरावानंतर ही परेड करविली जाते. या परेड च्या शेवटी “अंतिम पग” म्हणून जी अंतिम रेखा असते , ती पार केल्यावर या सर्व यशस्वी कॅडेट्स ना ऑफिसर म्हणजेच लेफ्टनंट म्हणून ओळखले जायला सुरुवात होते.
८ सप्टेम्बर २०१८ ( commissioning) रोजी जेव्हा तिच्या खांद्यावर आम्ही दोघांनी हे ऑफिसर्स चे स्टार्स लावले, तेव्हाची आमची मनस्थिती ही अत्यंत भावनाप्रधान अशी होती.
डोळ्यातून आनंदाश्रूंची अविरत गंगा वाहत होती तिची जिद्द ,चिकाटी ,बुद्धी आणि परमेश्वराचे आशीर्वाद या सर्वच गोष्टींचे अप्रूप वाटत होते . त्यानंतर विविध ठिकाणी म्हणजे आसाम पासून काश्मीर पर्यंत पोस्टिंग घेऊन आज मेजर या पदावर नियुक्त आहे . मध्यंतरी shooting मध्ये तिला silver medal ही प्राप्त झाले . ऑपरेशन सद्भावना, ऑपरेशन रायनो, ऑपरेशन रक्षक ह्या सर्व operations चा ती प्रमुख हिस्सा होती ,हे अभिमानपूर्वक सांगावेसे वाटते . अनेक ठिकाणी तिने बऱ्याच साहसपूर्ण गोष्टी करून देशावर आलेल्या संकटांमध्ये भारत देशाचे नांव उज्वल राहील ह्यात सहभाग घेतला आहे ( contribution).
अत्यंत सन्मानपूर्वक असे जीवन ती आज जगत आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये तिला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते , तिचे उत्साहवर्धक भाषण ( motivational speech) ठेवले जाते . तिच्यामुळेच आम्हालाही समाजात खूप मान -सन्मान मिळत आहे. त्यामुळे आज मनाच्या मोठ्या कठीण अवस्थेत घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला व ऐश्वर्याला ही पश्चाताप नसून अभिमान व आनंदच वाटतो आहे .
जय हिंद.
सुषमा ठाकूर
भोपाळ
9/1/26