पूर्वी संध्याकाळ झाली की गल्लीबोळांत एक वेगळाच गोंगाट असायचा. लगोरी, लपंडाव, आट्यापाट्या, विटीदांडू यांच्या आवाजांनी आकाश भरून जायचं. अंगावर माती लागलेली, गुडघ्यावर खरचटलेलं, पण चेहऱ्यावर समाधानाची झळाळी असलेली मुलं – हेच खऱ्या बालपणाचं चित्र होतं. आजही संध्याकाळ होते, पण गल्ल्या शांत असतात. प्रत्येक घरात दिवे लागलेले असतात; मात्र त्या दिव्यांपेक्षा अधिक तेजस्वी असतो तो मोबाईलच्या स्क्रीनचा प्रकाश. आणि त्या प्रकाशात हळूहळू हरवत चाललं आहे बालपण.
मोबाईल हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अद्भुत चमत्कार आहे. शिक्षण, माहिती, संवाद – सगळं काही एका बोटांच्या स्पर्शावर उपलब्ध झालं आहे. पण या सोयीच्या मागे एक न दिसणारी किंमत आहे, ती म्हणजे मुलांचं हरवत चाललेलं नैसर्गिक बालजीवन. पूर्वी आई “जा, बाहेर खेळून ये” म्हणायची; आता “शांत बस” म्हणून मोबाईल हातात दिला जातो. मोबाईल मुलांसाठी खेळण्यासारखा झाला आहे, पण हा खेळणं त्यांच्या कल्पनाशक्तीला, संवेदनांना आणि सामाजिक कौशल्यांना मर्यादा घालू लागला आहे.
स्क्रीनवर दिसणाऱ्या रंगीबेरंगी जगात मुलं गुंतून जातात. कार्टून, गेम्स, व्हिडिओ, हे सगळं त्यांना आकर्षित करतं. पण या आभासी जगात रममाण होताना ते खऱ्या जगाशी असलेलं नातं सैल करत चालले आहेत. मित्रांसोबतचे खट्याळ संवाद, पडल्यावर उठण्याची जिद्द, हरल्यावर पुन्हा जिंकण्याची उमेद… हे सगळं अनुभवातून शिकायचं असतं. मोबाईल मात्र तयार उत्तरं देतो; तो संघर्ष शिकवत नाही.
मोबाईलचा अतिरेक मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो. डोळ्यांची झीज, लठ्ठपणा, चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव .. ही लक्षणं आज अनेक घरांत दिसू लागली आहेत. त्याहून गंभीर म्हणजे, मुलांच्या भावविश्वात एकाकीपणा वाढतो आहे. एकाच खोलीत चार जण बसलेले असतात, पण प्रत्येकजण आपल्या स्क्रीनमध्ये गुंतलेला असतो. संवाद हरवतो, आणि नात्यांमध्येही एक अदृश्य भिंत उभी राहते.
बालपण म्हणजे फक्त वय नव्हे; ती एक निरागसता आहे, एक स्वच्छंद उडण्याची इच्छा आहे. ती जमिनीवर धावण्यात, पावसात भिजण्यात, चिखलात खेळण्यात फुलते. मोबाईलच्या प्रकाशात मात्र हे सगळं धूसर होत चाललं आहे. मुलांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल दिसतो, मैदानाऐवजी गेमिंग अॅप्स दिसतात. त्यांच्या स्वप्नांनाही स्क्रीनची चौकट लाभली आहे.
याचा अर्थ तंत्रज्ञान वाईट आहे असा नाही. मोबाईल योग्य प्रमाणात, योग्य मार्गदर्शनाखाली वापरला तर तो ज्ञानाचं दार उघडू शकतो. पण त्याचं अतिरेकी आकर्षण बालपणाच्या सहजतेला गिळंकृत करत आहे. म्हणूनच पालक, शिक्षक आणि समाज यांनी मिळून मुलांना तंत्रज्ञानाचा समतोल वापर शिकवणं गरजेचं आहे. मोबाईल हातात देताना त्याहून महत्त्वाचं म्हणजे वेळ, प्रेम आणि संवाद देणं आवश्यक आहे.
आपण जर आजच सजग झालो, तर मोबाईलचा प्रकाश ज्ञानदीप ठरेल; अन्यथा तो बालपणाची सावली वाढवत राहील. चला, पुन्हा एकदा मुलांच्या हातात माती देऊ, आकाश दाखवू, आणि त्यांना सांगू – “स्क्रीनच्या चौकटीत नाही, तर जगाच्या विस्तीर्ण आकाशात तुझं खरं बालपण आहे.