दोन्ही कुटुंबांनी मिळून संजय आणि कात्यायनीचा साखरपुड्याचा मुहूर्त काढून मुलाच्या गावी तो करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे साखरपुड्याचा छोटेखानी कार्यक्रम झाला आणि दोन्ही कुटुंबातील संबंध आणखी दृढ झालेत.
साखरपुड्यापासून आलेला लक्ष्मणरावांचा मोठा मुलगा राकेश आणि सून माया यांनी लग्नापर्यंत सुटी घेतली होती. विजय महाविद्यालयाच्या सुट्या संपेपर्यंत गावातच राहणार असल्याने त्याची सर्वच कार्यात बरीच मदत होणार होती. त्यामुळे लक्ष्मणरावांवरचा कार्याचा बराचसा भार कमी होणार होता. तरी साखरपूडा आणि लग्नामध्ये फक्त एक महिन्याचे अंतर असल्याने सर्वांची मोठी धावपळ होणार हे निश्चित होते.
धावपळ जरी होणार असली तरी, लक्ष्मणरावांनी सर्वांवर काही ना काही जबाबदारी सोपविली होती. त्यामुळे कुणा एकावर जास्त कार्याची जबाबदारी पडली असे घडले नाही. तिकडे समुद्रपूरकरांचे पण असेच नियोजन होते. एकंदरीत तेव्हाच्या काळात कुण्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची गरज भासतच नव्हती. सर्व कुटुंबीय मिळून सर्व इव्हेंट मॅनेज करत. लग्नाचे प्रत्येक विधी अगदी व्यवस्थित पार पडावे या दृष्टीने दोन्ही कुटुंबांची तयारी होती.
लक्ष्मणरावांनी तर सुनेच्या गृहप्रवेशासाठी विशेष तयारी करायला लावली होती. घरच्या अंगणात मराठी आणि इंग्रजी सुविचाराच्या रांगोळ्या घालण्याची जबाबदारी त्यांनी नात्यातील काही उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्या मुलींकडे सोपविली होती. नवीन सुनेला पहिल्या दिवसापासून स्वतःच्या स्वप्नाविषयी सकारात्मक वातावरण लाभावे हा त्यांचा उद्देश होता.
घरी दुसरी सून येणार म्हणून सुमनबाई तर भलत्याच आनंदी होत्या. येणाऱ्या जाणाऱ्याशी त्या लहान सुनेचे फारच गोडवे गात होत्या. तरी यामुळे मोठ्या सुनेला अंतर नको म्हणून स्वतः लक्ष्मणराव याबाबतीत सुमनबाईंना नेहमी समजावून सांगत असत. जरी त्यांचे काही कारणास्तव मोठ्या सुनेशी मतभेद असले तरी लक्ष्मणराव यांनी बरेचदा दोघींमध्ये मधुर नाते कसे राहील यादृष्टीने जे नेहमीच प्रयत्न केलेले होते त्याचा थोडा का होईना फरक दिसत होता. दोघींमधला वाद, मतभेद फक्त दोन्ही पिढ्यांमधला अंतराचा आणि विचारांचा होता. दोघींपैकी एकीने जरी समजून घेतले तरी नाते चांगल्या प्रकारे निभावून नेता येऊ शकते हे ते नेहमी दोघींनाही सांगत असत.
जशी लग्नाची तारीख जवळ येत होती तसे लक्ष्मणराव काय कार्य बाकी आहे आणि काय झालेले आहे याबाबतीत ज्यांना ज्या जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत त्यांच्याकडून तसे जाणून घेई.
एकंदरीत लक्ष्मणरावांच्या लिडरशिपमधे लग्नाची तयारी सुरू होती. त्यादृष्टीने ते नेहमी वही आणि पेन जवळ ठेऊन झालेल्या आणि बाकी असलेल्या कामाची नोंद ठेवायचे.
जरी त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले असले तरी, त्यांचे कोणत्याही कार्याचे काटेकोर नियोजन एमबीए झालेल्या व्यक्तिलाही लाजवेल असेच होते. लग्नाला मुलीच्या गावी रवाना होण्याच्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी घरी लग्नाला आलेल्या पाहुण्यांना काही महत्त्वाच्या सूचना देऊन मुलीकडच्यांना वाईट वाटेल अशी कृती करू नका म्हणून स्पष्टपणे सांगितलेले होते.
आपण मुलाकडचे आहोत म्हणून, मुलीकडील नाश्त्यापासून तर भोजनापर्यंत, स्वागत, मान- पान पासून तर राहण्याच्या सोयीपर्यंत
कशाही बाबतीत टीका, टिपणी कुणीही करू नये असे त्यांनी सांगून ठेवलेले होते. तेथील व्यवस्था सर्व बाबतीत उत्तमच असणार असा त्यांचा पूर्ण विश्वास असला तरी, नात्यातील काही महाभाग कसे आहेत हे लक्ष्मणरावांना पूर्णपणे माहीत होते.
लक्ष्मणराव एक सोपे तत्त्व घेऊन आतापर्यंत आयुष्य जगले होते. त्यातलेच एक म्हणजे आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये. जरी कात्यायनी ही सून म्हणून घरी येणार असली तरी आपणही एका मुलीचे बाप आहोत म्हणून मुलीच्या लग्नासाठी एक बाप किती मेहनत घेतो, पैसे जमवतो याची त्यांना जाणीव होती.
लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघण्याच्या आधी त्यांनी त्यांच्या संस्काराप्रमाणे विठ्ठलाकडे हात जोडून विठ्ठलाशी संवाद साधला.
हे विठ्ठला, तुझ्या भगिनीला जगदंबेला आणायला चाललो रे .