“ती”चा भावनिक हिंदोळ्यावरील “प्रवास एकटीचा”
ताप,सर्दी याबरोबर आपल्या मुलीचं मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचं आहे कायमच माझ्यातील “ती”ला वाटत आलं आहे. मुली बालपणापासूनच खूपच संवेदनशील असतात.उदाहरणार्थ लहान मुलांसाठीचे शो टेलिव्हिजनवर पहाताना कार्यक्रम संपत आला की बाय बाय म्हणत कार्टूनला लहान मुली डोळे पुसत हुंदके देत बाय म्हणतात. कारण लवकरच कुठल्याही परिस्थितीशी मनाने एकरूप होणे हा त्यांचा नैसर्गिक गुणधर्म आहे.लहान मुलांसाठी घर, टी.व्ही. हेच मर्यादित विश्व असतं. म्हणूनच शाळेत जाताना पहिल्यांदाच घराबाहेर पाऊल पडतं तेव्हा मुलींना अश्रू आवरणं कित्येक दिवस अवघड जातं.ह्या मुली चित्रपट बघताना सुरूवातीला भावनिक दृश्य आली पडद्यावर की हमसून हमसून रडतात.मन म्हटलं की संवेदना येणारच.मुली मुलांपेक्षा जास्त संवेदनशील असतात आणि आई म्हणून प्रत्येक स्त्री पोटच्या मुलीला भावनिक आधार देतेच.पण जसजसे बाहेरचे विश्व, अनुभव आणि वय या गोष्टी वाढत जातात “ती” मुलगी भावनांवर विजय मिळवते.बागडू लागते.
आणि एकदिवशी “ती” किशोरवयात प्रवेश करते.तिचा नवीन वळणावरचा एकटीचा प्रवास सुरु होतो.शारिरीक बदल तिच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याचा ताबा घेतात. अशावेळी हार्मोनल संतुलन राखणं कठीण होतं.कधी “ती” झुंज देते कधी कोसळते, मनाने खचते.ज्यात “ती” चा आत्मविश्वास जाऊ लागतो. कमकुवत मन न्यूनगंड देखील निर्माण करु लागतं. वर्गातील मुले, शिक्षक यांच्यासह जग शत्रू भासू लागण्याचा “ती” चा तो नाजूक असा काळ.ज्यात गरज असते “ती”ला जपण्याची.कधी आकर्षण तर कधी तिरस्कार असं “ती” चं मानसिक द्वंद्व सुरु होतं.
किशोरवयीन मुली तारूण्यात पाऊल टाकतेवेळी अनोळखी स्पर्श टाळतात.अंगं चोरतात.या कृती बाह्य वाटत असल्या तरी त्या मुलीच्या अंतरंग उमलत असतानाचा मानसिक आंतरिक बदल असतो. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून वेळोवेळी समुदेशन करणं मनाचं आरोग्य सुदृढ करण्याकरता फायदेशीर ठरतं.
त्यात व्यक्तीचा स्पर्श कसा ओळखायचा.गुड टच,बॅड टच ह्याचे ज्ञान वयाच्या पहिल्या पाच वर्षांत समजावून सांगितले तर भविष्यातील धोके टाळले जातात. उदाहरणार्थ शाळेत नेणारा रिक्षाचालक, बस ड्रायव्हर, शाळेतील शिपाई ,डिलीव्हरी बाॅईज,यांची भीती किशोरवयीन मुलींमध्ये बरेच वेळा निर्माण होते व मानसिक दडपण येते.मुली अशावेळी अबोल, शांत रहातात किंवा लाजतात.शाळेतही एकट्या राहतात, टिफीन एकटेच खातात वगैरे.त्यांना बोलतं करणं,मनातील भीतीदायक विचारांना वाट मिळणं गरजेचं आहे.
अशावेळी तिच्या इमोशनल मदतीसाठी दुसरी “ती”धावून येते.अर्थात ती “ती” ची आईच असते. शेवटी “ती”चे दर महिन्याचे मानसिक आणि शारीरिक तणावाचे ते चार दिवस सुरु होतात.शारिरीक पीडा आणि मानसिक वेदना यात ती एवढीशी स्त्री होऊ पाहणारी मुलगी झुरत राहते.परत समुदेशन महत्त्वाचे ठरते यावेळी जे मनोबल वाढवते. शाळेतील शिक्षिका, वर्गातील मित्र मैत्रीणी सगळ्यांच्याच सहकार्याची गरज अपेक्षित असते.
निसर्गनिर्मित शारीरिक बदल ही मातृत्वाची दैवी देणगी आहे आणि हे भाग्य फक्त स्त्रीला ईश्वराने बहाल केलंय कारण स्त्रीच प्रसंगी कणखर आणि कोमल भूमिका समर्थपणे पार पाडू शकते बाळा. मी पण तुझ्यासारखीच मानसिक आव्हानांना सामोरी गेलेय.वंशवृध्दी स्त्रीची नैसर्गिक परंपरा आहे.हे आईचे बोल ऐकून किशोरवयीन “ती” आत्मविश्वासाने आणि अभिमानाने भावनाविवश न होता तारुण्यातील आयुष्यात पुढचं पाऊल टाकते.
क्रमशः
श्रध्दा सुदामे (कौन्सेलर)