मुकपटा पासून भारतीय चित्रपट सृष्टीची वाटचाल सूरू झाली. १९१३ मध्ये पहिला मुकपट दादासाहेब फाळकेनी “राजा हरिश्चंद्र” पडद्यावर आणला. आता त्याला ११३ वर्षे झाली. १९३१ म्हणजे साधारण १८ वर्षांनी भारतात पहिलावहिला हिंदी बोलपट “आलामआरा” अर्देशीर इराणी यांनी दिग्दर्शित केला. त्यालाही आता ९५ वर्षे झाली.
सांप्रत काळात प्रतिथयश लोकांनी चित्रपट क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले. रुळलेली वाट सोडून नव्या अस्थिर व्यवसायात रस्ता बनवणे, तेव्हा जोखमीचे काम होते. तरी सुद्धा काही जिद्दी लोकांनी हे आव्हान स्वीकारले, धोका पत्करला. काही यशस्वी झाले तर काही अपयशी. पण या साऱ्यातून आजचा सिनेमा घडत गेला.
तेव्हा पासूनच भारतीय समाज आणि भारतीय चित्रपट सृष्टी यांचे एक भावनिक नाते तयार झाले. चित्रपट केवळ करमणूक करणारे माध्यम नाही, तर समाज मनाला दिशा देणारे, त्यांच्या विचारांना चालना देणारे, जनमानसात बदल घडवून आणणारे आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करणारे कलेचे साधन आहे. चित्रपटातून अनेक कलांचा संगम आहे. कित्येक दशकांपासून भारतीय सिनेमा जनमानसावर अधिराज्य गाजवत आहे. त्याचा प्रभाव आजही कायम टिकून आहे. लोकांच्या मनोरंजना साठी असलेला सिनेमाने विचारांना दिशा दिली सामाजिक जाणिव दिली, संस्कार दिले, एक नवी ओळख दिली. इथे फक्त हिंदी चित्रपट सृष्टीचा विषय नसून भारतातील अनेक प्रादेशिक भाषेतील चित्रपट यात समाविष्ट आहे.
समाज चित्रपटांमध्ये प्रतिबिंबित होऊन समाजात बदल घडवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. एक शक्तिशाली सांस्कृतिक घटक आहे. चित्रपट समाजाला मनोरंजन, माहिती आणि शिक्षण तसेच सामाजिक, समस्यांवर भाष्य करून लोकांच्या विचारांना दिशा देतो आणि हिंदू सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहीत कंरतो. म्हणजेच भारतीय चित्रपट सृष्टी आणि भारतीय समाज हे एकमेकांचे आरसे आहेत, “बिंब-प्रतिबिंब आहेत.
भारतीय चित्रपट जागतिक स्तरावर हिंदू संस्कृती आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सॉफ्ट पॉवर वाढते आणि हिंदू सांस्कृतिक समाजाला प्रोत्साहन मिळते.
सिनेमा उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय चित्रपटातून अनेकदा राजकीय भाष्य होते, तर कधी त्यातून राजकीय चळवळींना प्रोत्साहन मिळते.
चित्रपटामुळे भारतात सांस्कृतिक देवाणघेवाणही होते. सिनेमा केवळ भारतीय समाजा पुरता मर्यादित नसून, तो जागतिक स्तरावर विविध संस्कृतीं मधील संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे.
अनेक कालखंडांतून भारतीय चित्रपट सृष्टी जनमानसाच्या मनाला थेट भिडणारे चित्रपट दितो आहे.
अगदी सुरवातीच्या काळात म्हणजे १९५०-६० च्या दशकात दो बीघा जमीन, जागते रहो, सुजाता यांसारख्या चित्रपटांनी तत्कालिन समाजात असलेले जातिभेद, गरिबी, अन्याय या प्रश्नांवर दार्शनिक भाष्य करणारी निर्मीती केली. त्यातूनच सामाजिक प्रश्नांना हात घातला. १९७०-८०च्या दशकात शहीद, हकीकत आणि त्याही पुढे बॉर्डर, लगान सारख्या चित्रपटातून देश भक्तीची ज्वाला चेतवली. मिर्च मसाला, दम लगाके हैशा, थप्पड यांसारख्या चित्रपटांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यातून स्त्री शक्ती आणि स्त्री-पुरूष समानतेची जाणिव दिली.
आज आधुनिक समस्यांचे चित्रण करण्यातही भारतीय चित्रपट मागे नाही. “तारे जमीन पर” ने थेट शिक्षण व्यवस्थेवरच तर बोट ठेवले. त्यातून बाल संगोपनात होणारी पालकांची मोठी चूकही दाखवून दिली. यामुळे समाजातील कित्येक पालकांचे डोळे उघडले.
“३ इडियट्स” ने तरूणाई तील करिअर आणि यश या विषयीचा दृष्टिकोन बदलला. त्याकडे पाहण्याचा नवा आयाम दिला.
“पिके” सारख्या चित्रपटांनी अंधश्रद्धा आणि धर्मांधतेवर समाजात गहन प्रश्न उपस्थित केले.
अशा अनेक चित्रपटाने भारतीय समाजाला नवा विचार, नवी दिशा आणि नव्या जाणिवा दिल्या.
भारतीय चित्रपट सुमधुर संगीताचा ठेवा आहे.
भारतीय चित्रपटाने केवळ कथाच नाही, तर सुमधुर संगीताचेही मोठे योगदान आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांनी नटलेली अप्रतीम गाणी असोत वा लोक संगीताशी नाळ जोडणारे संगीताचे सूर असोत की, अत्याधुनिक पाश्चात्य वाद्यांनी सजलेली चित्रपट धून असो, लोक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सिनेमा सृष्टीने संगीत दिले आहे. लग्न, सण, समारंभ, उत्सव, प्रेम, विरह, देशभक्ती, ईश्वर भक्ती, मातृभक्ती अश्या सारख्या अनेक आणि प्रत्येक प्रसंगातील नात्यांना जोडणारे, लोकांना साथ देणारे त्यांच्या ह्रदयात घर करणारे चित्रपट गीतांचे अनेक संग्रह आज भारतीय चित्रपट सृष्टीत आपले स्थान मिरवत आहे.
चित्रपट सृष्टीने आपल्या भारतीय समाजाला अनेक रंगांने रंगविले आहे. कधी हसू, कधी रडू, कधी आशा, कधी निराशा, कधी धैर्य, मनोबल दिले, तर कधी प्रेरणा दिली. विचार करण्याची एक वेगळी दिशा दिली. या शिवाय अत्युल्य अपूर्व सुमधुर संगीत दिले. म्हणूनच चित्रपट प्रत्येक भारतीय प्रेक्षकाच्या मनाच्या जवळ आहे. आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
©️माधूराज, नागपूर
