नितळ(२००६) हा मराठी सिनेमा. यात चालणारी कथा,पटकथा आणि संवाद यातून असा एक मानसिक व भावनिक प्रसंग दाखवला गेला आहे. जो अत्यंत हळव्या रितीने आपल्याला अगदी सहजपणे सांगून जातो की, आपल्या आवडत्या माणसाला समाजाच्या, कुटुंबाच्या साक्षीनं आपलं करण्यातच खरं सुख प्राप्त होतं असतं. त्याकरिता बंडखोरी सोडून माणसामाणसाचं मन बदलण्याची वाट पहावी लागते. नितळ बंध तेव्हा अलवारपणे जुळून येतात. एकजीव होतात.
यातलं एक ना एक पात्र आपल्या खोल अंतरात रूतून बसतं कारण प्रत्येकाचं मत अगदी लख्ख चमकतं, उन्हासारखं. सर्वाच्या मनाचा तळ एका निमित्ताने नितळ झालेला आहे, आरशासारखा. नेमकं कशाबद्दल मत समोर आलेलं आहे या सिनेमातून. प्रसंग अगदी साधा सरळ आहे. लग्न ठरविण्याचा. कुणाचं लग्न?
हं, तर हा सिनेमा सुरू होतो तेव्हा बंगलोर मधील एका मल्टिस्पेशालिस्ट रिसेप्शन काउंटरवर कॅमेरा स्थिर झालेला असतो. तिथे एक तरूणी रिसेप्शनिस्ट्ला काहीशा आनंदाने उत्साहात सांगते आहे की, मी दोन दिवसांनी येईल. सध्या आता डॉ. अनन्यसोबत पुण्याला जात आहे. आणि शिर्षकगीत सुरू होतं. या सिनेमात एकुण तीनच गाणी पण अगदी प्रसंगाचं औचित्य साधून आलेली. ( स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी -या युगलगीत ओळी अगदी सुरूवातीला पार्श्वभूमीवर ऐकू येतात) गीतरचना आणि संगीतातून चित्रपटाचा भाव अधिक गहिरा होत जातो. जसं – नितळ नितळ आरस्पानी हे शिर्षक गीत पुढे चालू लागतं तसं आपल्या लक्षात येतं की या तरुणीच्या चेह-यावर आणि तळहातावर डाग दिसताहेत. पांढरीशिपीट. पसरट मोठी. ज्यामुळे मनात एक विचित्र वेगळी भावना निर्माण होते. पण तिचा चेह-यावरील भाव मात्र अविचल, तेजस, शितल आणि करुणामयी आहेत. नितळ तिच्या मनाचा आरसाच. आता एक तरूण येतो आणि तिला सोबत घेवून विमानतळावर जातो. दोघेही पुण्यात असलेल्या त्याच्या मोठ्या राहत्या घरात येतात. हे घर आहे अगदी सुरूवातीस उल्लेख आलेल्या डॉक्टर अनन्यचं. तिथे त्याच्या आजीच्या डाव्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना निदान एका डोळ्यानी तरी दिसावं त्याकरीता केलं गेलेलं. तर ही जी तरूणी त्याच्यासोबत त्याने आणलेली आहे ती असते नेत्रतज्ञ. डॉक्टर नीरजा कौशिक.
सुवर्ण पदक मिळवलेली कुशल सर्जन म्हणून तर ती त्याला अधिक आवडलेली आहेच. शिवाय संगीत विशारद असून स्वभावाने नम्र, कष्टाळू तसेच मनमिळावू. तिच्याशी तो आपलेपणाने वागत असतो. पण तिच्याशी लग्न करण्याचा त्याचा निर्णय अजून ठरायचा राहिलेला आहे. तसा तो लग्न करण्याच्या बाबतीत एकंदरीत उदासीन आहे असं तो म्हणतो. नीरजाला घरी सोबत आणल्यामुळे तांच्या घरात या दोघांच्या लग्नाविषयी सगळेजण विचार करु लागतात. नीरजाचं एकंदरीत व्यक्तीमत्व सर्वांना भावलेलं असतं. पण सर्वांना एकदम खटकतं ते तिचं डागेल रूप. लहान पिढीचे त्याचे चुलत भाऊ बहिण मोकळ्या मनाने विचार करून यासाठी सरळसरळ आनंदानं तयार असतात. पण आई, वडील, काका, आत्या, काकू यांची मुळात लग्न व्यवस्थेबद्दलची मतमतांतरे ऐकूण अनन्य आणखीन आपण लग्न करावे की मैत्री ठैवावी याबाबत निर्णय घेण्यासाठी अधिक पेचात पडतो.
आपल्या मृदूल स्पर्शानं, गोड हसण्यानं आणि मधुर आवाजातील गाण्यानं नीरजा आजीचं मन आधीच जिंकून घेते. पण अनन्यच्या आईच्या मते स्त्रीचं सुस्वभावी, सुशील असणं जितकं गरजेचं त्या ही पेक्षा सुंदर असणं आवश्यक. कोड असलेली मुलगी सून म्हणून स्विकारणं यासाठी एक घालमेल परिवारात सुरू होते. नीरजा हे समजून घेऊन सर्वांचा निरोप घेऊन बंगलोरला वापस निघते एकटीच अनन्यशिवाय. एका पेशंट मुलीचं रेटीनाचं ऑपरेशन करण्यासाठी तिला येणं भागही पडते म्हणा. त्यावेळी ती तिथून निघताना सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर जे दादा आजोबाच्या भुमिकेत आहेत. ते तिला सांगतात की, नियती आणि इच्छा शक्ती यांचा प्रवास जोडीने चालतो.सत्य दर्शनातून निर्माण झालेली इच्छाशक्ती ही केव्हाही नियती पेक्षा श्रेष्ठ असते.असे श्रीकृष्णाने धर्मराजास एकदा सांगितले होते. थोडक्यात कुणाचाही कुणाला स्विकारण्याचा निर्णय अंत:करणापासून होणे महत्वाचे. दरम्यानच्या वेळात अनन्यच्या आईकडून नीरजासाठी असलेला विरोध निवळतो. आणि अनन्य नीरजाला घरी घेऊन जाण्यासाठी पाठोपाठ बंगलोरला आलेला असतो. तिथे आपण प्रेक्षक सुखावतो.
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडगोळीनी मिळून केलेल्या ज्याकाही चित्रकृती आहेत त्यापैकीच हा एक अतिशय लक्षात राहणारा असा मराठी सिनेमा होय. देविका दफ्तरदार आणि शेखर कुलकर्णी हे कलाकार नवे असले तरी विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष आणि इतर सर्व कलाकार दिग्गज अशीच आहेत.
त्यामुळे या सिनेमातील संवेदना अगदी आपल्या मनाशी भिडणा-या झाल्या आहेत.
अनघा जोशी, नांदेड.
१६.०१.२०२६
१६.०१.२०२६