पहिली गोष्ट म्हणजे – तुमचा लेखन विषय काय? आजकाल प्रत्येकाला प्रत्येक विषयावर लिहायचं असतं. मनात आलेल्या प्रत्येक विचाराचा तडकाफडकी निचरा करायचा असतो . त्यातून जे काही लिहिलं जातं त्याला लिखाण म्हणू फारतर.
पण तुम्ही कोणताही लेखक अथवा लेखिका पहा – त्यांचे एक तर काही ठराविक विषय असतात. उदाहरणार्थ, अगाथा ख्रिस्तीने प्रामुख्याने रहस्य कथा लिहिल्यात, रणजित देसाईंनी ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्यात. म्हणजे जेव्हा रहस्यकथांचा विषय निघतो तेव्हा त्यात अगाथाचं नाव स्वाभाविकपणे येतं . तसं तुमचा काही विशिष्ट विषय आहे का ?
यालाच समांतर दुसरा प्रकार म्हणजे असे अनेक लेखक आहेत ज्यांनी अनेक विषयांत भरपूर लेखन केले आहे, पण आपली स्वतःची एक विशिष्ट शैली जपून . उदाहरणार्थ आपले पु ल देशपांडे. त्यांनी विविध विषयांवर विविध प्रकारचे लेखन केले असले तरी त्या प्रत्येकाला एक खास पु ल टच आहे . एखादा पट्टीचा वाचक कोणत्याही पुस्तकातील एखाद-दुसरा उतारा वाचून तो पु लंचा आहे हे अगदी सहज सांगेल.
म्हणजेच – लेखक बनायचे असेल तर आपण काही विशिष्ट विषयच हाताळायला हवेत, अथवा अनेक विषय घेऊन त्यात आपली स्वतःची अशी लेखन शैली विकसित करायला हवी.
दुसरी गोष्ट म्हणजे लेखनाकडे विरंगुळा, टाईमपास म्हणून न पाहता त्याला गंभीरपणे घेणे . यात अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत.
उदाहरणार्थ, आपण 'हौशी लेखक' काय करतो तर काही परिच्छेद लिहितो आणि ते प्रसृत करतो. खरा लेखक तसे करणार नाही. तो आधी प्रतिपाद्य विषय नीट ठरवेल, लेखासाठी आधारभूत माहिती गोळा करेल, लेखाचा पहिला मसुदा लिहील, तो दोन-तीनदा वाचेल, त्यात काही बदल करेल, जवळच्या एक-दोघांना वाचायला देऊन त्यांचा अभिप्राय घेईल, मग त्यावर संपादकीय संस्करण होईल आणि मगच तो लेख वाचकापर्यंत पोहोचेल .
म्हणजे लेखन ही निव्वळ एक क्रिया न राहता एक पूर्ण प्रोसेस बनतो… आणि आपली वाटचाल लेखन कलेकडून शास्त्राकडे होते .
तिसरी गोष्ट – आपल्या लेखनावर प्रतिक्रिया आल्या पाहिजेत असं प्रत्येकालाच वाटतं, आणि ते आवश्यकही आहे . प्रतिक्रिया – मग ती अनुकूल असो अथवा प्रतिकूल- ही तुमच्या लेखणीने वाचकांच्या बुद्धीला चालना दिल्याची खूण आहे, आणि माझ्यामते तीच लेखक म्हणून तुम्ही यशस्वी झाल्याची पावती आहे.
शेवटची गोष्ट जी माझ्या मते अगदी फार आवश्यक नसली तरी सांगणं गरजेचं आहे, ती म्हणजे – आपले लेखन अपरिचित लोकांनी पैसे देऊन वाचले पाहीजे.
तुम्ही पाहताच की फेसबुकवर एखाद्याचं लेखन प्रचंड लोकप्रिय असते , लोकं आवडीने वाचतात , शेअरही करतात , . पण त्याच माणसाच्या लेखनाचं पुस्तक छापून आलं की त्याच्या प्रती मात्र अपेक्षेएवढ्या विकल्या जात नाहीत (आणि मग बहुतांश वेळा त्या निरागस आप्तस्वकीयांच्या गळी मारल्या जातात).
आपल्या लोकांकडे रिकामा वेळ भरपूर असला तरी पैसा त्यामानाने महत्त्वाचा असतो…. म्हणूनच तुमचं लेखन वाचण्यासाठी लोकं पैसे मोजायला तयार असतील, तुमचं पुस्तक 'विकलं' जात असेल तर तुम्ही लेखक बनला आहात यावर शिक्कामोर्तब झाले आहे असे मानायला हरकत नाही .
तर, तुम्हाला लेखन एक कला म्हणून पाहायचंय की त्याचं शास्त्र बनवायचं आहे हे प्रथम ठरवायचं आहे आणि त्यानुसार आपलं धोरण बनवायचं आहे .
गौतम सोमण
१७ जानेवारी २०२६
#सुरपाखरू #३०दिवसात३० # जानेवारी२०२६