आमच्या 'राजमान्य राजश्री' म्हणाल्या, “काय उगाच मुलांना वारंवार गरज नसताना बोलावता?” आणि त्यांच्या या साध्या, सहज प्रश्नाने मी अंतर्मुख होऊन विचार करू लागलो. खरंच आहे ते, आपण दिवसातून कितीतरी वेळा मुलांना उगाचच साद घालत असतो. कधी ती हाक सवयीची असते, तर कधी त्यामागे आपली अस्वस्थता असते. त्या हाकेचा कोणताही ठोस परिणाम होणार नाही हे माहित असूनही आपण पुन्हा पुन्हा तोच प्रयत्न करतो आणि अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास अधिकच अस्वस्थ होतो.
आजच्या जगात आवाजांचे जणू प्रदूषणच झाले आहे. घराबाहेर पाऊल टाकले की गाड्यांचे तेच ते कर्णकर्कश आवाज कानावर पडतात. माणसांचे आवाजही आता विविधांगी झाले आहेत—कधी एखाद्याचे शब्द मधुर वाटतात, तर कधी ते इतके असहनीय होतात की माणसाची सहनशक्तीच संपत चालली आहे असे वाटते. या पार्श्वभूमीवर मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ते जुने शब्द रूंजी घालतात:
“तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा…”
पूर्वी नात्यांमध्ये जी सहजता आणि शांतता होती, ती आज जणू लोप पावत चालली आहे. विचारांची ही साखळी तुटतेय की काय, अशी भीती वाटते. काळ आपला प्रभाव दाखवत आहे आणि आपण फक्त त्या बदलांचे असहाय साक्षीदार बनलो आहोत.
शिवरात्रीच्या निमित्ताने मी बाजारात गेलो आणि एक विलक्षण विरोधाभास डोळ्यांसमोर उभा राहिला. भाजीपाल्याच्या दुकानांत फारशी गर्दी नव्हती, पण उपवासाच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मात्र 'तौबा गर्दी' होती. हे पाहून मन पुन्हा अंतर्मुख झाले. पूर्वीचा उपवास हा खऱ्या अर्थाने 'सात्त्विक' असायचा. उपवास म्हणजे शरीराला दिलेली विश्रांती आणि मनाला दिलेली एकाग्रता. ९० च्या दशकात उपवास म्हणजे केवळ वरीचा भात, आमटी किंवा एखादे फळ असायचे. त्यामागे 'श्रद्धा' होती आणि ती श्रद्धा अतिशय साधी, निगर्वी होती.
पण आज चित्र बदलले आहे. ५जी च्या युगात उपवास हा श्रद्धेपेक्षा 'उत्सव' आणि 'मेजवानी' अधिक झाला आहे. साबुदाणा वडा, खिचडी, बटाटा चिप्स, विविध प्रकारचे उपवासाचे पदार्थ इतक्या प्रमाणात उपलब्ध आहेत की, तो उपवास उरतो की मेजवानी, हेच कळेनासे झाले आहे. “नजर को बदलो, नजारे बदल जायेंगे” असे आपण म्हणतो, पण बाजाराचे हे बदललेले स्वरूप पाहून आपली दृष्टी नक्की कोणत्या दिशेला जात आहे, हा प्रश्न उरतोच.
बाजारीकरणाने आपल्या श्रद्धेचेही जणू वस्तूकरण केले आहे. पूर्वी उपवासाचा मूळ हेतू 'इंद्रियांवर ताबा मिळवणे' हा होता, पण आज बाजारीकरणामुळे आपण अधिकच 'उपभोक्ता' झालो आहोत. दिसणारी आणि न दिसणारी ही जी तफावत आहे, ती समाजातील वाढत्या 'असमानतेची दरी' अधोरेखित करते. एकीकडे श्रद्धेच्या नावावर होणारा खर्च आणि दुसरीकडे साध्या भाजीपाल्याकडे फिरवलेली पाठ, हे मानवी मनाच्या बदलत्या तन्मयतेचे लक्षण आहे.
ही आजची पिढी, ज्याला आपण 'जेन झी' म्हणतो, ती या बाजारीकरणाच्या प्रवाहात आपली नौका पुढे नेऊ पाहत आहे. त्यांच्यासमोर जुन्या काळापेक्षा अधिक आव्हाने आहेत, कारण त्यांना एकाच वेळी 'दिखाव्याची माणुसकी' आणि 'विचारांची कट्टरता' या दोन्ही आघाड्यांवर लढावे लागत आहे. अशा काळात आपली श्रद्धा ही केवळ 'पदार्थांपुरती' मर्यादित न राहता ती 'विचारांची शुद्धता' कशी बनेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
९० च्या दशकातले बालपण आणि आजच्या ५जी युगातील 'जेन-झी' मुलांचे जगणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ९० च्या दशकात आमची 'सपोर्ट सिस्टम' (आधार देणारी व्यवस्था) खूप मजबूत होती. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात माणसांचा वावर असायचा आणि संवादही जिवंत असायचा. आज मात्र ही जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. मेट्रो आणि ५जी मुळे जग जवळ आले असले, तरी माणसांमधील 'भावनिक अंतर' वाढले आहे की काय, असे वाटते.
आजच्या पिढीला आपण अनेकदा 'अगाऊ' म्हणतो, पण खोलवर विचार केला तर ते तितकेच 'जबाबदार' (Responsible) देखील आहेत. ९० च्या दशकातील मुलांना बाहेरील जगाची फारशी माहिती नसायची, पण आजची मुले इंटरनेटमुळे जगातील प्रत्येक घडामोडीशी जोडलेली आहेत. त्यांच्यासमोरची आव्हाने आपल्यापेक्षा वेगळी आणि अधिक गुंतागुंतीची आहेत. त्यांना केवळ शैक्षणिक स्पर्धाच नाही, तर 'डिजिटल जगा'तील स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा ताणही सहन करावा लागतो आहे.
पूर्वीच्या काळी ताण हलका करण्यासाठी मैदाने होती, प्रत्यक्ष मित्र होते. आज 'मित्र' सोशल मीडियावर हजारो असले, तरी प्रत्यक्ष संवाद मात्र 'इमोजी' (Emoji) पुरताच मर्यादित झाला आहे. ताणतणावाला सामोरे जाण्यासाठी लागणारा तो जुना कौटुंबिक आधार आज कमी पडतोय, हे वास्तव आहे. तरीही ही नवी पिढी “नव्या मनुतील शूर शिपाई” प्रमाणे मोठ्या धैर्याने ही परिस्थिती पेलत आहे.
प्रशांत चित्रकला जानराव बठ्ठे
#अक्षरयात्री२०२६
#सुरपाखरू