संतवाङ्मयातला हा साधा पण अत्यंत अर्थगर्भ अभंगवाक्यप्रचार — “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” — केवळ नैतिक उपदेश देत नाही, तर माणसाच्या आचार-विचारातील सुसंगतीचे मोजमापही करून जातो. बोलणे सोपे असते; मूल्यांची भाषणे करणे, आदर्शांची उदाहरणे देणे, तत्त्वज्ञान मांडणे यासाठी फारसा आत्मसंयम लागत नाही. पण जेव्हा तेच शब्द कृतीत उतरवण्याची वेळ येते, तेव्हा मात्र अनेकांची पावले डगमगतात. म्हणूनच जो मनुष्य जे बोलतो तेच जगतो, त्याच्या पावलांना वंदन करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीने निर्माण केली.
या तत्त्वाचा एक अत्यंत बोलका, आधुनिक काळातील प्रत्यय म्हणजे सुधा मूर्ती यांचे उदाहरण.
सुधा मूर्ती या उत्कृष्ट तांत्रिक बुद्धिमत्तेच्या, स्वावलंबी आणि प्रश्न विचारण्याचे धाडस असलेल्या तरुणी होत्या. त्या काळात टेल्को (Tata Engineering and Locomotive Company) मध्ये महिला अभियंत्यांची भरती होत नव्हती. ही बाब त्यांना अन्यायकारक वाटली. अनेक जण अशा परिस्थितीत तक्रार करून थांबले असते; पण सुधा मूर्तींनी थेट जे. आर. डी. टाटा यांना पत्र लिहिले.
त्या पत्रात त्यांनी प्रश्न विचारला — “जर महिलांकडे तांत्रिक ज्ञान, गुणवत्ता आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर केवळ स्त्री असल्यामुळे त्यांना संधी का नाकारली जाते?”
हा प्रश्न केवळ व्यक्तिगत नव्हता; तो व्यवस्थेच्या मूल्यांनाच आव्हान देणारा होता.
जे. आर. डी. टाटा यांनी त्या पत्राची दखल घेतली. केवळ उत्तर देऊन समाधान मानले नाही, तर सुधा मूर्तींना थेट इंटरव्ह्यूसाठी बोलावले. त्यांच्या उत्तम तांत्रिक ज्ञानामुळे आणि आत्मविश्वासामुळे त्यांची निवडही झाली. हा क्षण स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला.
पण खरा कसोटीचा क्षण पुढे आला.
सुधा मूर्तींना परदेशी शिष्यवृत्तीवर पीएच.डी. करण्याची संधी मिळाली. अनेकांच्या दृष्टीने हा सुवर्णसंधीचा क्षण असता. पण तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना थांबवले. त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले —
“तू टाटा कंपनीला नियम बदलायला भाग पाडलेस. हा बदल केवळ तुझ्यासाठी नव्हता, तर पुढच्या अनेक महिलांसाठी होता. आता जर तूच टेल्को जॉइन केले नाहीस, तर ते चुकीचे ठरेल. You should walk as you talk.”
ही केवळ वडिलांची सूचना नव्हती; ती जीवनमूल्यांची शिकवण होती.
सुधा मूर्तींनी त्या संधीचा त्याग करून टेल्को जॉइन केले. त्यांनी जे बोलले होते, ज्यासाठी लढा दिला होता, त्याच मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कृतीने “बोले तैसा चाले” या उक्तीला केवळ अर्थच दिला नाही, तर ती जिवंत करून दाखवली.
आज समाजात अनेक प्रश्नांवर आपण मोठमोठे शब्द बोलतो — समानता, प्रामाणिकपणा, सामाजिक न्याय, नैतिकता. पण जेव्हा त्याची किंमत मोजायची वेळ येते, तेव्हा आपण मागे सरकतो. अशा काळात सुधा मूर्तींसारखी उदाहरणे आपल्याला आरसा दाखवतात. ती सांगतात की मूल्ये ही केवळ भाषणांची सजावट नसून, ती जगायची असतात.
म्हणूनच “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” हे वाक्य केवळ संतांचे नाही, तर आजच्या काळातही तितकेच लागू पडणारे जीवनसूत्र आहे. जे शब्द आणि कृती यांत अंतर ठेवत नाहीत, जे मूल्यांसाठी स्वतःची सोय बाजूला ठेवतात, त्यांची पावले खरंच वंदनास पात्र ठरतात.
सुषमा ठाकूर