जय गंगे भागिरथी !
हर-गंगे भागिरथी !
चिदानंद-शिव-सुंदरतेची
पावनतेची तू मूर्ती
म्हणुनि घेउनी तुला शिरावर
गाइ महेश्वर तव महती !
जगदाधारा तव जलधारा
अमृतमधुरा कांतिमती
‘शंकर शंकर, जय शिवशंकर’
लहरि लहरि त्या निनादती !
सर्वप्रथम लहानपणी गंगेची स्तुती आजोबाकडून नित्य कानावर पडत असल्याने, तेव्हा ” गंगा म्हणजे काय हो? आणि या गाण्याचा अर्थ काय? ” हा बाल प्रश्न मी त्यांना विचारला होता आणि मग त्यांनी पंचावन्न वर्षांपूर्वी सर्वं गंगेची पूर्ण कथाच मला सांगितलेली..तिचं माझी गंगेची झालेली प्रथम ओळख! अगदी ती काल परवाचीच घटना वाटते. काळ खूपच वेगाने जातो हे मात्र खरे!
माझे आजीचे नावही गंगा होते.आजोबांनी राममंदिर वार्डातील घराचे नावही “गंगासदन” असे ठेवले होते.आजोबांचे नाव सदाशिव आणि आजीचे गंगा हा विलक्षण योगायोग होता.
भागिरथी अलकानंदा
कन्यका हिमालयाच्या..
रंग पाण्याचे वेगळे
देवप्रयागी दिसें आगळे ..
मागे हिरवागार डोंगर
पायथ्याशी राममंदिर..
सुंदर निसर्गाची भव्यता
उतरवे सारा अहंकार..
गोमुखी भागिरथीला
गंगोत्रीचे वरदान..
अक्षय निळेशार
पाणी ते थंडगार..
बद्रीनाथी श्रीविष्णू
रंगाने तो सावळा ..
त्याच्याच रंगात वाहे
अवखळ अलकनंदा..
रंग मिसळता दोन
गंगेला आला श्री रंग..
जल ते पवित्र पावन
मानतो आमुचा धर्म..
बारमाही वाहे गंगा
जीवन ते आम्हास..
भगीरथाने वळवली
ती आमुच्या देशात..
श्रीशंकराच्या जटेतून
गंगा धरेवर अवतरते..
धन्य आपुली संस्कृती
तिच्यातूनी नित्य वाहते..
गंगासागरी मिळताना
अवतार कार्य सरते..
अद्वैता चे रहस्य कोडे
सारे आपोआप उमगते..
जीवन जणू ही गंगा
वाहते ते वेगे प्रवाही..
भेट ईश्वराची होता
सार्थकता ती जीवांची..
अंतिम वेळ येता
गंगाजल मुखात..
अस्थीनाही ओढ
गंगेत विसावण्यास..
गंगेस हरिच्या द्वारी
आरती नित्य होते
हर हर गंगे हा घोष
अवघा घाट दुमदूमवते
चांदीच्या रेखीव मखरात
प्रतिमेस गंगाकिनारी
पुजन, गंगा आरतीस
भक्तांची जमे मांदियाळी
स्वहस्ते गंगाआरतीचा योग ,
मिळाला होता नकळत..
जीवन धन्य धन्य झाले
ठरलो मी एक भाग्यवंत..
खरंतर आज एका ग्रुपवर देवप्रयागाच्या सुंदर चित्रापासून आज लिहिण्यास प्रेरणा मिळाली. निळीशार भागिरथी आणि किंचित गढूळ गडद रंगाची अलकानंदा दोघांचे रंग वेगवेगळे असले तरी यातूनच अमृतासम वाहणारे गंगाजल तयार होते.
*थोडक्यात दोघ विभिन्न स्वभाव असले तरीही जेव्हा ते एकरूप होतात तेव्हा दोनजणांच्या संसारात अमृताची गोडी ही निश्चितच असतें.*
गंगा ही आपली अस्मिता, आपली संस्कृती, आपली जीवनदायीनी, पाप हारिणी, सल्फरयुक्त पाणी असल्याने औषधी गुण देणारी असे अनेक विशेषणांनी अलंकृत असलेली गंगा ही देवते स्वरूप आम्हाला वाटते.आयुष्यात एकदातरी हरिद्वारला जाऊन गंगेच्या पाण्यात डुबकी मारून नकळत झालेली पाप क्षालन करण्याची प्रत्येकाच्या मनात इच्छा असतें.अनेक वर्षांपासून हरिद्वारच्या होणाऱ्या गंगा आरतीत कधीच खंड पडला नाही. हरिद्वारला चारपाच वेळा जाण्याचा गंगेच्या पाण्यात डुबकी मारण्याचा योग आला.. पण शेवटच्या वेळी नशीब विशेष मेहेरबान होते आरतीच्या ठिकाणी जवळ बसलो असल्याने आरती स्वहस्ते करण्याचा योग प्राप्त झाला. *हर हर गंगे!!*
कॉलेजच्या ट्रिप मध्ये नकळत गंगेच्या पाण्यात तिनं टप्प्यात दगड भिरकावताना शेजारी उभ्या असलेल्या आजीने, “गंगाजीको क्यो मार रहे हो.. पाप लगेगा तुमको. ” असे म्हणल्यावर झालेली चूक लक्षात आली, मनोमनी तेव्हाच तिस नमन करून माफी पण मागितली. अशी कोट्यावधी भारतीयांची श्रद्धांस्थान असलेली गंगा नदी ही सर्वांचे आराध्य दैवत आहे . तिच्या तटावर गंगोत्री, देवप्रयाग, हृषीकेश, हरिद्वार, काशी,प्रयागराज …. तर थेट गंगासागर पर्यत अनेक तीर्थ वसली आहेत. आयुष्यात सर्वजण एकदा येथे अवश्य दर्शन करतात.
काशी म्हणजे हिंदू धर्माचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र, काशी विश्वेक्षर इथेच गंगातिरी विराजमान आहेत.
*”सारे तीर्थ बारबार.. गंगासागर एकबार “*
भागिरथी आणि अलकनंदा एक हून गंगा अवतरते सागरास मिळताना तिचे दोन मुख्य प्रवाह होतात भारतातील प्रवाहास हुगळी आणि बांगला देशातील प्रवाहास पद्मा असे म्हणतात.
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता जवळ गंगा (हुगळी) नदीच्या काठावर गंगा सागर मेळा संक्रांतीस भरतो, या ठिकाणी गंगा बंगालच्या उपसागराला मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर गंगा आणि महासागर जिथे मिळतात त्या ठिकाणाला गंगासागर म्हणतात.
असे गंगासागर या तीर्थाच्या दर्शना बाबत म्हणले जाते. मकरसंक्रातीला येथे लाखो भाविक येथे दर्शनास जातात.
पंधरा वीस वर्षांपूर्वी चारधामला गेलो असताना देवप्रयाग उर्फ सुदर्शन क्षेत्र येथे अगदी खाली घाट उतरून संगमापर्यत गेलो होतो.श्री रघुनाथचे नागरी शैलितील मंदिर आणि भव्य विस्तीर्ण अचंबित करणाऱ्या निसर्गात सभोंवती असलेले देवत्व नकळत सर्वांनाच नतमस्तक होण्यास भाग पाडते. अहंकार आपोआप गळून पडतो तेथे गेल्यावर.
गंगेच्या खोऱ्यात भारताचा २५ टक्के भुभाग येतो आणि ४० टक्के भारतीय या पवित्र खोऱ्यात राहतात.आपल्या देशाच्या संस्कृतीची आणि इतिहासाची नाळ गंगेशी जोडली असल्याची ग्वाही या गीतातील ओळी दर्शवितात. इतिहासातील सर्वं घडामोडीची साक्षीदार असलेली गंगा अगदी महाभारतापासून अविरत हिमालयात अवखळपणे तर मैदानात आल्यावर विस्तीर्णस्वरूपात सखोल शांत वाहते आहे . हे वर्णन या गीताच्या ओळी सांगतात.
“गौतम अशोक अकबर ने,
यहा प्यार के फूल खिलाए,
तुलसी ग़ालिब मीरा ने,
यहा ज्ञान के दिप जलाए,
मेरे तट पे आज भी गूँजे,
मेरे तट पे आज भी गूँजे,
नानक कबीर की वाणी
मानो तो मैं गंगा मा हूँ,
ना मानो तो बहता पानी ॥”
गंगेवर श्रद्धेने अशी अनेक अप्रतिमअजरामर गीत भजन लिहिली गेली आहेत त्यातील मला आवडणारे अजून एक गीत ज्यात गंगेचे जन्मापासून तर मुक्तीपर्यत असलेलं आपल्या जीवनातील स्थान विषद केले आहे.
“गंगा तेरा पानी अमृत,
झर झर बहता जाए,
युग युग से इस देश की धरती,
तुझसे जीवन पाए l
हर हर गंगे कहके दुनिया,
तेरे आगे झुकती,
तुझी से हम सब जीवन पाएँ,
तुझी से पाएँ मुक्ति,
तेरी शरण मिले तो मैया,
जनम सफल हो जाए l
गंगा तेरा पानी अमृत,
झर झर बहता जाए,
युग युग से इस देश की धरती,
तुझसे जीवन पाए |”
गंगेच वर्णन करताना शब्द अपुरे पडतात..शेवटी तिच्यात विसावण्याची इच्छा सर्वांचीच असतें. वडिलांनी आजी आजोबांचे अस्थीचे विसर्जन प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर केले होते.. वडिलांचे करताना मी गेलो होतो.
सर्वांना माते स्वरूप वाटणारी ही मोक्षदायीनी गंगा मात्र निरपेक्षपणे फक्त आणि फक्त्त देतच रहाते शेवटी मोक्ष ही तिचं देते.तिच्या खळखळ वाहणाऱ्या प्रवाहात नकळत या गीताचे सूर ऐकू येतात,
“मानो तो मैं गंगा माँ हूँ,
ना मानो तो बहता पानी!”
