आठ दिवसांच्या ट्रिप वरून घरी परतल्यावर पटापट कामं सुरू झाली . एकीकडे बॅगा रिकाम्या करणं – कपडे धुवायला टाकणं सुरू असतांनाच मुलानं mail box मधून ढिगभर टपाल आणून टेबलवर ठेवलं . आलेलं टपाल बघणं – त्याची छाननी करणं माझं आवडतं काम आहे . तसं म्हटलं तर येणाऱ्या टपालामध्ये अगदी ९५ टक्के हे बिनमहत्वाचे असते. उरल्या सुरल्या टपालात पण एखादं दुसरं अत्यंत महत्वाचं पत्रं असतं आणि तेही क्वचित. तरी आजच्या ढिगाऱ्यात माझ्यासाठी नुकत्याच झालेल्या वाढदिवसाची दोन शुभेच्छा कार्ड होती. त्यात हातानं लिहिलेला मजकूर होता. हे पाहिलं आणि आजच्या टपाल बघण्याची सार्थता झाली. जसं म्हणतात की कुणाच्या मनात शिरण्याचा रस्ता पोटातून जातो तसा माझ्यासाठी पत्रातून जातो. मी आजवर खूप पत्रं – वेड्यासारखी पत्रं – भारावून पत्रं लिहिली आहेत आणि तेवढ्याच ताकदीनं मला पत्रे आली आहेत. आजकाल पत्रलिखाण कमी होत गेलेलं असलं तरीही माझ्यासारखे पत्रवेडे – पत्रांची जादू अनुभवलेले अनेकजण असतील. आजचं तंत्रज्ञान युग आणि आयुष्याचा अविभाज्य असलेली ही पत्रं याचा मेळ घडवून आणतांना मी आजही अनेकदा छान कागदावर हाताने पत्रं लिहिते आणि फोटो काढून WhatsApp डाकघराच्या पेटीत टाकते. पत्रं हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे की त्यावर अजून एक लिखाण मी नक्कीच करेन. थोरा -मोठ्यांची पत्रे सुप्रसिद्ध असतील . इतिहासाची साक्ष देणारी पत्रे जतन केल्या गेल्या असतील . साहित्यात पत्रांचं विशेष स्थान असेल . पण मला खात्री आहे की खूप कमी पत्रं अशी असतील जिथे एका बाबांनी आपल्या बाळ पिल्लू लेकीला पत्रं लिहिल असेल . अशी भाग्यवान मी आहे . माझ्या आयुष्यात मला आलेले पहिले पत्रं आहे – माझ्या बाबांकडून – मी १ महिना ८ दिवसांची असतांना . त्या पत्रातला मायना – इत्थंभूत मजकूर – सविस्तर हालहवाल – काळजी आणि अतोनात प्रेम आजही बाबा आणि माझ्या संवादात अबाधित आहे . कामाच्या निमित्तानं बाबा पुण्याला गेले होते तिथून मला पाठवलेलं हे पत्रं . कुणाला माहितं होतं तेव्हा की हा असा दूरवरचा संवाद पुढे जाऊन आयुष्यभर भाग असणार आहे . बाबांशी मी कोणत्याही विषयावर निर्धास्तपणे बोलू शकते ,कारण हा विश्वास त्यांनीच तर पहिल्यांदा मला पोहोचता केला . बाबांच्या त्या पत्रात त्यांनी अगदी त्यांच्या नोकरीचे संदर्भ सुद्धा लिहिले होते. खरतर एका बाळाला ‘ न्यू इंडिया ‘ कंपनीमध्ये काय घडतय हे काऊ चिऊच्या गोष्टी एवढं सुद्धा समजणार नव्हतं पण तिथेच जिथे काम करणार त्या कामावर निष्ठा ठेवण्याचं बाळकडू मला मिळालंं . ” पिल्ला तुझी आठवण येते रे ” या विरहापासून ते ” पुण्याचा पाऊस खूप वेगळा आहे – आपल्या नागपूरसारखा नाही ” या अद्ययावत बातम्यांपर्यंत ह्या पत्रानं माझ्याशी गप्पा केल्या आहेत. एक व्यक्ती म्हणून माझं अस्तित्व आहे . माझ्यावर अतोनात प्रेम करणारी माणसं माझ्या अवती भोवती आहेत . रोजच्या व्यवहारात गुंतलेलो असलो तरीही जवळच्यांना जोडून ठेवणही गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी माझा बाबा खंबीरपणे पाठीशी कायम आहे – इतकं सुंदर पत्रं – पहिलं पत्रं मला मिळालं आहे आणि म्हणूनच आज सातासमुद्रापार जेव्हा घरात बिनकामाचा पसारा जास्तं असलेलं ते टपाल येतं ते निवडायला मी सरसावते कारण त्या क्षणी पुन्हा अनुभवते माझं भाग्यवान बालपण आणि माझे लाडके बाबा ! # सुरपाखरू # ३० दिवसात ३० # जुलै २०२६