पूजा भडांगे, सुरपाखराच्या थव्यातल्या एवढीच ओळख. माझा मित्र श्रीधर जहागीरदार यानं त्यांची एक कविता मला पाठवली (शीर्षक नसलेली) *आषाढ पाऊस अंधार ढवळे* अशी पहिली ओळ असलेली.
मी कविता लगेच वाचली. आवडली, परत परत वाचली, आणि श्रीधरनं सुचविल्याप्रमाणे कवितेवर लिहायचं ठरवलं.
कविता मला जशी उमगली ते रेखाटलं आहे. आवडतं का पहा!
****
आषाढ पाऊस अंधार ढवळे
कोणती वेदना प्राणास विसळे?
थेंबथेंब जीव साचला देहात
उरात मावेना विषण्ण एकांत
सैलावला मोह पाण्यात सोडून
वल्हव दुःखाला हात लांबवून
वाऱ्याच्या उरात वादळी वेदना
मातीच्या पायांना पैंजण सोसेना..
कागदी पाऊस शाईत निथळे
अशात कविता भलती उजळे..
मिटून पापणी आठवू कुणाला?
दुःखच पुरते एकाकीपणाला..
आषाढ मनाच्या मातीत कोसळे
त्यातून उमले सुगंधाचे तळे..
वेढून अंधार वेचिला काळोख
अशांत कविते! दाखव ओळख..
– पूजा भडांगे
**********
पंचेंद्रियानं निसर्ग समजतो. ऊन वारा, वादळ, वीज-कल्लोळ, पावसाच्या सरी, धो धो बरसात, हिरवळ, वृक्षवल्लरी, दरवळ… अनुभवत असतो, पण त्याचं खरं उमजणं 'आत' होत असतं. मनात त्याचे तरंग उमटतात, आणि तिथं अर्थघटन उमलतं जातं, अनुभूती घडत असते. आणि ते सारं कवितेतून उतरत असतं.
अशीच एक कविता *पूजा भडांगेंची,* माझ्या समोर आहे. मला ती कशी उमगली, ते असं…
कवि-मानसाला आषाढातला पाऊस वेगळी अनुभूती देत असावा. श्रावणातला पाऊस वेगळं सांगत असावा.
आषाढ पाऊस अंधार ढवळे
कोणती वेदना प्राणास विसळे?
आषाढातला पाऊस अंधार ढवळून काढत असतो. अंतस्थ वेदनेचा आणि पावसाचं नातं असावं. कवि-मनात कुठली तरी ढवळून काढणारी वेदना जागी होते. वेदनेची तीव्रता दर्शवितांना 'वेदनेनं प्राण विसळून जाणं' ही खरंच अद्भुत मांडणी! स्वयंपाक घरातली ही रोजची प्रक्रिया कवितेत अशी बसू शकते, खरंच स्तुत्य. इथूनचं कवयित्रीचं वेगळेपण जाणवायला सुरुवात होते. मनाच्या कोप-या कोप-यातल्या वेदनेचा ठाव घेणं की! ते प्रत्ययास येणं या आषाढ पावसातून, व्वा!
थेंबथेंब जीव साचला देहात
उरात मावेना विषण्ण एकांत
थेंबथेंब जीव साचलं जाणं हे रुपकही वेगळंच! अनुभवाचे थेंब, ते तर साचत जातात… पण तेही (की तेच?) जाणवून देतात एकलेपणा, आणि त्याची विष्ण्णता. 'विषण्ण एकांत' किती अंतर्मुख करणारा शब्द वापरला आहे. व्वा!
सैलावला मोह पाण्यात सोडून
वल्हव दुःखाला हात लांबवून
मोहाला बाजूला सारून प्रवाहात वल्ल्व्हत राहणं भाग असतं. इथंही दुःखाला वल्हवणं ती कल्पनाच किती बोलकी! दुःखातूनही मार्ग निघेल, दुःखाचा स्वीकार आणि त्या सहाय्यानं चल पुढे, हा वेगळाच विश्वास डोकावतो आहे, कवितेतून.
वाऱ्याच्या उरात वादळी वेदना
मातीच्या पायांना पैंजण सोसेना..
वेदना कशी सार्वत्रिक आहे हेच जाणवतं या ओळींतून. किंबहुना कवयित्रिचं संवेदनशील मन निसर्गातली वेदना टीपतं. वा-याच्या मनातही गडद अशा वादळी वेदना. कदाचित कवयित्री आपल्याच वेदना या वा-यात अनुभवत असेल. मातीच्या पायात पैजणे, तीही वेदना दायक…
निसर्गातही कवयित्रीच्या वेदना घर करून बसल्या आहेत.
कागदी पाऊस शाईत निथळे
अशात कविता भलती उजळे.
शाईतून निथळणारा कागदी पाऊस, सुंदर कल्पना. किती छान शब्द योजन. यातून येणारी उजळ कविता, एक मोठा आशावाद!
मिटून पापणी आठवू कुणाला?
दुःखच पुरते एकाकीपणाला..
एकाकीपणाचं दुःख आपणच सहन करायचं असतं. आठवणी कुणाच्या? कशासाठी? हा नैराश्याचा सुर निश्चितच त्रास देणारा…
आषाढ मनाच्या मातीत कोसळे
त्यातून उमले सुगंधाचे तळे..
आषाढाचा पाऊस मनाच्या मातीत कोसळतो आणि त्यातून चौफेर पसरणारा मृद्गंध. एरवी दरवळ जाणवत असतो फक्त इथं तर त्याचं रुपांतर दृष्टिगोचर तळ्यात करून हा आनंद अधिक गडद केला आहे.
वेढून अंधार वेचिला काळोख
अशांत कविते! दाखव ओळख..
अंधारा वेढून काळोख गोळा करणं हे किती सखोल वर्णन आहे त्या अनुभवलेल्या तिमिराचं, तेही अशांत चित्तातून अवतरलेल्या कवितेतून.
कवयित्रीची ओळख पटते आपल्याला. एक संवेदनशील मनाच्या धनी, निसर्गाशी गुंफलेल्या, आषाढाच्या पावसातून व्यक्त होणा-या!
पूजाजींचे शब्द, हळुवार, मोजून मापून मांडलेले, चपखल आणि कवितेत गहिरा अर्थ भरणारे!
अभिनंदन, पूजाजी.
१९ जुले २०२६#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#प्रयोग२०२६
#जुलै२०२६