#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६
आपण वापरत असलेल्या माध्यमांची घडणावळ करणाऱ्यांचं अजिबात ऐकायचं नाही, त्यांना हवं तसं तर मुळीच वागायचं नाही हे मी ठरवूनच टाकलंय. वडीलधाऱ्यांशी उद्धटपणा करायचा राहून गेला म्हणून की काय मी जमेल तिथे तो करत असते. जसं की यूट्यूब वर हिस्टरी बंद ठेवणे, व्हॉटस्अप वर रीड रिसीट बंद ठेवणे, अन् कुठलीही जाहिरात स्कीप चा पर्याय आल्यानंतर बघत न राहणे.
आज इतक्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर माझ्या या उद्धटपणाला खंड पडला – तो एका यूट्यूब वरील जाहिरातीमुळे. मी ती बघितली – चक्क पूर्ण बघितली – स्कीप चा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा – जसं मी समोर समोर बघत गेली तसं तसं माझ्या कपाळावरच्या आठ्या वाढून एकमेकीत शिरू लागल्या. तळपायाची थेट मस्तकात गेली.
असं काय होतं त्यात? एक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल शिकवणारा कोर्स. पण मग चिडण्यासारखं काय होतं त्यात? एकूण दोन प्रसंगांची कृत्रिम बुद्धिमत्तेच्याच आधाराने तयार केलेली जाहिरात –
प्रसंग पहिला – एक भारतीय कुटुंबातील परदेशात महाविद्यालयात शिकणारी मुलगी – जेवणाच्या सुट्टीत आपल्या वर्ग मैत्रिणींना भारतीय आई ने तयार केलेली मिठाई देऊ करते – त्या नावं ठेवतात – तिच्या जेवणाला अन् अप्रत्यक्षपणे तिच्या भारतीय वळणाला.
प्रसंग दूसरा – एक कॉर्पोरेट क्षेत्रातील ४५ वर्षांची स्त्री जिचं कामाच्या ठिकाणी ऐकून घेतल्या जात नाही. तिला नोकरीवरून काढून टाकण्याची शक्यता असते आणि तिच्याकडे असतात फक्त २८ दिवस. मग तिला तिची वरिष्ठ अधिकारी बोलवते – तिचं नाव प्रिया असतानाही ती ‘प्राया’ असा उल्लेख करते, तिला एक २८ दिवसांचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंबंधी कोर्स करण्यास सुचविते. २८ दिवस संपतात – एका महत्वाच्या मीटिंग मध्ये ती स्वतःची पात्रता सिद्ध करते अन् एका मोठ्या पदावर विराजमान होते. – इथेही हा कोर्स करण्याच्या आधी तिच्या जेवणबद्दल चा अपमान मात्र तसाच कायम ठेवलेला आहे जसा तो आधीच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या बाबतीत दाखवला गेला.
नेमकं काय दाखवायचं आहे ? की भारतीय लोक कृत्रिम बुद्धिमत्ता स्वत:हून शिकू शकत नाहीत? की भारतीय जेवण खराब असतं? की भारतीय वंशच खुजा वाटतो??
काही मूलभूत प्रश्न मला पडले – दोन्ही उदाहरणे भारतीयांचीच का? इतर लोक सापडले नाहीत का दाखवायला? पाश्चिमात्य देशातले सर्वच सुशिक्षित, सर्वांना सर्वच आईच्या पोटातून येतानाच जमलेलं असतं का? असं असेल तर तुम्हाला भारतीय सीईओ का लागतात? भारतीय तुमच्या संधी हिरावून घेत आहेत हा कडवटपणा कुठून येतो?
तथाकथित लोकशाहीचे स्वयंघोषित पुढारी अशा वेळी शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसून बसलेले असतात. अगदी सहज, लोण्यातून सूरी फिरावी तसा वंशवाद – विशेषत: भारतीयांच्या विरोधात सुरू आहे. व त्याला आळा कसा घालता येईल हे बघण्याची नितांत गरज आहे.