कालच आम्ही सुकी डॅम परिसरात पावसाळी पर्यटनासाठी गेलो असताना तिथली सर्वत्र पसरलेली “हिरवळ” पाहून मला पावसाळ्यात नेहमीच आठववणारी
_”श्रावणमासी हर्ष मानसी_
_हिरवळ दाटे चोहीकडे_
_क्षणात येती सरसर शिरवे_
_क्षणात फिरूनी उन पडे_ “
या कवितेची पुन्हा आठवण झाली.
ही कविता माहित नसणारा मराठी माणूस विरळाच.. पावसाळ्यात दूर पसरलेली हिरवळ बघताना या ओळी सर्वांनाच सतत आठवतात आणि एक विचार मनात आला बालकवी आज जर इथं असतें तर? अजून एकापेक्षा एक खूप सुंदर कविता लिहिल्या असत्या.
अगदी काही दिवसापूर्वी त्यांची पुण्यतिथी झाली. त्याच्या स्मृतीस वंदन करूया.
माझे कॉलेज जीवनात जळगाव भुसावळ रेल्वेने बऱ्याच वेळा जाणे येणे होत होते येथे रेल्वेने जात असताना भुसावळ मुंबई पॅसेजर भुसावळ सुरत पॅसेंजर या दोन गाड्यांना भादली येथे थांबा होता आणि रेल्वे लाईंनच्या उजवीकडे बालकवी याचे एक दुर्लक्षीलेले छोटे स्मृतीस्थळ उभारले होते.. आता रेल्वेचे बराच विस्तार झालला असल्याने ते आज तिथे आहे की नाही त्याचे कल्पना नाही काळाच्या ओघात ते कदाचित नष्टही झाले असले तरी बालकवींची अजरामर कविता मात्र कायमस्वरूपी चिरंतन राहणार आहे.
कवितेतून सर्वाना आनंदाचे कोडे सोडवणाऱ्याच्या आयुष्यात असं दुर्दैवी अपघात का घडावा?
_आनंदी आनंद गडे_
_इकडे तिकडे चोहिकडे_
_वरती खाली मोद भरे_
_वायूसंगे मोद फिरे_
_नभांत भरला_
_दिशांत फिरला_
_जगांत उरला_
_मोद विहरतो चोहिकडे_
_आनंदी आनंद गडे !_
अशी सुंदर आनंदावरची कविता त्यांनी लिहीली आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे.
_स्वार्थाच्या बाजारात_
_किती पामरे रडतात_
_त्यांना मोद कसा मिळतो_
_सोडुनी तो स्वार्था जातो_
_द्वेष संपला_
_मत्सर गेला_
_आता उरला_
_इकडे तिकडे चोहिकडे_
_आनंदी आनंद गडे_
अस लिहून स्वार्थ आणि आनंद याचे नेमका संबंध कवितेतून समजावला आहे.
बालकवींचा जन्म धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. मराठी कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना इ.स. १९०७ मध्ये जळगाव येथे प्रथमच भरलेल्या महाराष्ट्र कविसंमेलनात ‘बालकवी’ ही पदवी दिली गेली. अवघ्या १७ वर्षांच्या या तरुण कवीने अत्यंत गोड आणि प्रतिभावान कविता मोठ्या सभेत सादर केली, तेव्हा सर्व अवाक झाले होते त्यांच्यातील अफाट बुद्धिमत्ता आणि बालसुलभ रूप पाहून संमेलनाध्यक्ष कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना “बालकवी” ही गौरवास्पद पदवी बहाल केली.
आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या अल्पयुष्यात बालकविंनी लिहिलेल्या मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्या कविता शंभर वर्ष झाली असली तरी अजूनही मराठी रसिक मनावर राज्य करता आहेत.
एका लेखात वाचलेलं आठवतंय,
“बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग होता तो.भादली स्थानकावर झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर त्यांच्या शरिराचे तुकडे त्यांचे स्नेही पोत्यात भरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वहात होते. बालकवींच्या सदर्याकडे हात जाताच लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. सोबत रक कागद ही होता. तो उघडून बघितला तर त्यावर बालकवींची एक अप्रकाशित काळावर सुंदर लिहिलेली कविता होती . बहुदा त्यांची ती शेवटची कविता….असावी.
_घड्याळांतला चिमणा काटा_
_टिक_ टिक् बोलत गोल फिरे_
_हे धडपडते काळिज उडते_
_विचित्र चंचल चक्र खरे!_
_घड्याळातला चिमणा काटा_
_त्याच घरावर पुन्हा पुन्हा_
_किति हौसेने उडत चालला_
_स्वल्प खिन्नता नसे मना!_
आपल्या सुरपाखरांचा थवा या मंचावर ऐश्वर्याताईंनी काही दिवसापूर्वी बालकविच्या “औदूंबर”कवितेचे केलेले सुरेख रसग्रहण वाचण्यात आले.
“आपल्या मनात कधीच न सुकणारी, आपल्याला आनंद देणारी बालकविंच्या कविताची “हिरवळ” प्रेरणादायी आणि निर्मळ आनंद देणारी आहे.
त्या सारस्वतास माझाही मानाचा मुजरा..या शब्दांच्या ओळीतून.
सुंदर काव्यात रेखाटले तुम्ही
हिरवे श्रावणमासाचे हो चित्र..
शतक पूर्ण उलटून गेले त्याला
तरी नाही विरले त्याचे रंग !!
आनंदाचे गणित समजावले
शब्दात तुम्ही हो मोजक्या..
पसरतो अजूनही चोहीकडे
कवितेला तुमच्या हो वाचता!!
“औदुंबरात” रहस्य लिहिले
पाहुनी मानवी जीवनाला..
निसर्ग कविता ती वाटते
भावते ती मन मनाला!!
कविता घड्याळयांच्या काट्याची
खिशात अंती तुमच्या सोबतीला ..
टिकटिक घड्याळाची सुरु होती
तुम्ही का हो उगा थांबला!!
निष्ठुर झाला ईश्वर किती तो
अल्पवय नाही तुमचे पाहिले..
तुमच्या कवितेवर फिदा तोही
स्वर्गलोकीचे आमंत्रण ते धाडीले!!
सुरु असतील खूप मेहफिली
कवितेच्या त्यांच्या इंद्रदरबारीं..
कशा कळतील त्या नवरचना
दुर्दैवी आम्हीहो इथं पृथ्वीवरी!!
मानाचा मुजरा माझाही देतो
तुम्हाला अन सूंदर कवनाला..
वाचल्या त्या खूप कितीदाही
अवीट त्या पिढी अन दरपिढीला!!
जळगाव जिल्ह्याने साहित्य क्षेत्रात जे दोन हिरे दिलेत त्यात पहिले बालकवी आणि नंतरच्या होत्या कवियत्री बहिणाबाई.
बहिणाबाईच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन आज बहिणाबाईंचे नाव उत्तरमहाराष्ट्र विद्यापिठास देऊन त्यांच्या प्रतिभेचा शासनाने यथोचित योग्य सन्मान केला आहे.
बालकवी मात्र दुर्लक्षित राहिले असंच मला वाटत.. याची दखल शासनाने घ्यायला हवी असे वाटते. आज मला कुसुमग्रजाच्या नाशिक येथील घरावर लिहिलेल्या वरच्या पाटीवरची कविता प्रकर्षाने आठवली.
“विजयासाठी कविता
माझी कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती
तिजला परराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा
ती नव्हती बसली
म्हणून नाही खंत
तिजला मरावयाची “
असो.
*”लाखो मराठी रसिकाच्या हृदयात बालकवीच्या कविता घर करून होत्या आहेत आणि पिढ्यान पिढ्या राहतील हे मात्र नक्की.”*
हीच त्यांना खरी आदरांजली आहे.
✍️ हेमंत नाईक
24.07.25